शर्मीला इरोम ः एक वज्रनिर्धार

0
186
  • ज. अ. रेडकर
    (सांताक्रूझ)

६२ वर्षीय वृद्धेला आणि १८ वर्षीय निरपराध तरुणाला गोळ्या घालून ठार केल्याचा संताप येऊन शर्मिलाने आपले उपोषण सुरु केले त्यावेळी ती २८ वर्षांची युवती होती. तीन दिवसांनंतर तिला आत्महत्येचा प्रयत्न केला असा आरोप ठेवून अटक करण्यात आली. ते साल होते सन २०००.

भारतीय लोकांचे काही सांगता येत नाही. त्यांची सामाजिक स्मरणशक्ती कमालीची कमकुवत आहे. जे तळपते त्याच्या मागे धावण्याची वृत्ती भारतीयांमध्ये आहे. नेते असोत अथवा अभिनेते, ते जोपर्यंत सर्वोच्च स्थानी असतात तोपर्यंतच ते त्यांच्या पुढे गोंडा घोळतात. एकदा दृष्टीआड झाले की सगळे विसरून जातात.

आज याची प्रकर्षाने आठवण होण्याचे कारण म्हणजे शर्मीला इरोम हिचा १४ मार्च रोजी येऊन गेलेला ४९ वा वाढदिवस! शर्मीला इरोम हे नाव आपण एव्हाना पार विसरूनदेखील गेला असाल कारण आज ना ती गडगंज संपत्ती बाळगून असणार्‍या कुणा उद्योगपतीची भार्या आहे ना ती आजची कुणी चमचमती तारका! परंतु सन २००० ते २०१६ हा काळ तिने गाजवला तो आपल्या दीर्घकालीन उपोषणाने. पण आज तिला तिच्या ४९ व्या वाढदिवसाला सोशल मिडीयावर ना कुणी शुभेच्छा दिल्या ना कुणी तिचे अभीष्टचिंतन केले. कारण माणूस एकदा दृष्टीआड गेला की सृष्टी बदलते. उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात आणि मावळत्याला विसरून जातात. ही जगाची रीतच बनून गेली आहे.

कोण आहे ही इरोम शर्मीला? ती आहे इरोम नंदा आणि इरोम ओंग्बी या मणिपुरी दाम्पत्याची कन्या. १४ मार्च १९७२ रोजी मणिपूर राज्याची राजधानी असलेल्या इम्फाळ शहरालगतच्या कांग्पाल या गावातील! अगदी सर्वसामान्य कुटुंब! शर्मीला बंडखोर व स्वाभिमानी वृत्तीची. कुणावर अन्याय झाला तर पेटून उठणारी. केंद्र सरकारने त्यावेळी आतंकवादी कारवाया रोखण्यासाठी उत्तर-पूर्वेकडील सात राज्यासाठी ‘आर्म फोर्सड् स्पेशल पॉवर ऍक्ट १९५८’ लागू केला होता. त्या सात राज्यांपैकी मणिपूर हे एक राज्य. या कायद्याचा वापर करुन सेनाधिकारी कुणाच्याही घरात अचानकपणे घुसायचे. कुणालाही अटक करायचे व त्यांना संशयित आतंकवादी किंवा देशद्रोही ठरवायचे. निरपराध लोकांना पकडून त्यांचे हाल हाल करायचे, अनेकांना गोळ्या घालून ठार करायचे. एकदा तर बसची वाट पाहणार्‍या ६२ वर्षीय वृद्धेला आणि १८ वर्षीय तरुणाला गोळ्या घालण्यात आल्या, ज्याला राष्ट्रीय शौर्य पदक प्राप्त झाले होते. या घटनेने शर्मीला इरोम पेटून उठली आणि हा घातकी कायदा मागे घेण्यासाठी तिने महात्मा गांधीजींचे उपोषण अस्त्र उगारले. अहिंसावादी गांधीजी हे तिचे आदर्श होते.

६२ वर्षीय वृद्धेला आणि १८ वर्षीय निरपराध तरुणाला गोळ्या घालून ठार केल्याचा संताप येऊन शर्मिलाने आपले उपोषण सुरु केले त्यावेळी ती २८ वर्षांची युवती होती. तीन दिवसांनंतर तिला आत्महत्येचा प्रयत्न केला असा आरोप ठेवून अटक करण्यात आली. ते साल होते सन २००० आणि तिची निर्दोष मुक्तता झाली ती ९ ऑगस्ट २०१६. तब्बल १६ वर्षे तिने अन्नपाणी घेतले नाही. सलाईनच्या द्रवावर ती जगली. तिने प्रतिज्ञा केली होती की, जोपर्यंत हा घातकी कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत न मी अन्न सेवन करणार, न पाणी पिणार, न केंस विंचरणार न आरशात पाहणार. हा काळा कायदा मागे घेतला तरच मी माझ्या आईच्या हाताने घास भरवून घेईन व उपोषण संपवीन.
राष्ट्रपति, पंतप्रधान यांना पत्रे पाठवून तिने हा घातकी कायदा मागे घेण्याची विनंती केली. पण सरकार ढिम्म राहिले. शर्मीला इरोमाला १९ ऑगस्ट २०१४ रोजी तुरुंगातून सोडण्याचे आदेश कोर्टाने दिले परंतु पुन्हा २२ ऑगस्ट २०१४ रोजी मधल्या केवळ दोन दिवसांच्या अवधीनंतर पूर्वीच्याच आरोपाखाली तिला फेर अटक झाली व १५ दिवसांसाठी तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

ती तुरुंगात असताना तिला २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहण्याची गळ दोन प्रबळ पक्षातर्फे करण्यात आली परंतु तिने नकार दिला. देशद्रोही कृत्याच्या आरोपात तिला अटक झाल्याने कायद्यानुसार तिला मतदानाचा देखील अधिकार नव्हता मग ती निवडणूक तरी कशी लढविणार होती?
२ नोव्हेंबर २००० रोजी वर उल्लेख केलेल्या ६२ वर्षीय वृद्धेला आणि १८ वर्षाच्या शौर्यपदक विजेत्या तरुणाला ठर करण्यात आले तेव्हां तिचे टाळके फिरले आणि ती सन २००० साली मानवाधिकार चळवळीत सामील झाली.
५नोव्हेंबर २००० रोजी ती उपोषणाला बसली. दरवर्षी कोर्ट तिची सुटका करीत असे आणि सेनाधिकारी तिला फेर अटक करीत असत. २००४ साली ती प्रकाशात आली. लोकांची आयकॉन ठरली. २ ऑक्टोबर २००६ रोजी तिने राजघाटावर जाऊन राष्ट्रपित्याला अभिवादन केले आणि त्याच संध्याकाळी तिने जंतर-मंतर इथे आपले विरोध प्रदर्शन सुरु केले. दिल्लीस्थित कॉलेज तरुण व मानवाधिकार चळवळीत असणारा एक गट तिच्या समर्थनार्थ पुढे आला.
६ऑक्टोबरला तिला दिल्ली पोलिसांनी अटक केली.

देशातील आणि विदेशातील मानवाधिकार संघटनांनी तिच्या दीर्घकालीन उपोषणाची दखल घेतली. २०१४ साली ‘सर्वात दीर्घकाळ उपोषण करणारी जगातील पहिली महिला’ असा तिचा गौरव त्यावर्षीच्या महिला दिनाच्या दिवशी करण्यात आला. २०११ साली मानवाधिकार संघटनेने व तत्सम संघटनांनी ‘शर्मीला इरोम वांचवा’ ही मोहीम सुरु करुन १०० महिलांनी त्यासाठी मानवी शृंखला केली. याच वर्षीच्या डिसेंबर महिन्यात पुणे विद्यापीठाने ३९ मणिपुरी तरुणींसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती जाहीर केली. शर्मीला त्यावर्षी ३९ वर्षांची झाली होती. पुणे विद्यापीठाने तिचा असा गौरव केला होता. २००७ साली तिला ग्वांग्जु पुरस्कार, २००९ साली मेइल्लामा पुरस्कार, २०१० साली जीवन गौरव पुरस्कार आणि रवींद्रनाथ टागोर शांती पुरस्कार, २०१३ साली कर्तव्याची जाणीव असणारा कैदी अशा प्रकारचा तिचा गौरव जागतिक माफी देणार्‍या संस्थेने केला.

ऑक्टोबर २०१६ साली तिने पीपल्स रीसर्जन्स आणि जस्टीस अलायन्स
(झठग) या स्थापना केली. २०१७ साली होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत ती उतरली. परंतु ज्या लोकांच्या हक्कासाठी तिने जीवतोड उपोषण केले आणि शारीरिक हाल सोसले त्याच लोकांनी तिला निघृणपणे पराभूत केले. जिंकून आलेल्या उमेदवाराला १८६४९ तर शर्मीला इरोमला केवळ ९० मते मिळून तिची अनामत रक्कम जप्त झाली. लोकांचा किती हा कृतघ्नपणा म्हणायचा?
शर्मीला १७ ऑगस्ट २०१७ रोजी आपला ब्रिटीश मित्र डेसमंड अंथोनी याच्याशी विवाहबद्ध झाली आणि १२ में २०१९ रोजी आपल्या वयाच्या ४७व्या वर्षी तिने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. एकीचं नाव निक्स शक्ती आणि दुसरीचं ऑटम तारा (मराठीत आपण तिला ‘शरदचांदणी’ म्हणू) आज शर्मीला म तामिळनाडूतील कोडाईकॅनॉल इथे आपल्या ब्रिटिश पतिसह आणि दोन जुळ्या मुलींसह राहते.
अशा या वज्रनिर्धारी कणखर महिलेला उशिरा का होईना आपण तिच्या ४९ व्या वाढदिवसासाठी हार्दिक शुभेच्छा देऊया!