![BJP leader Smriti Irani in Ahmedabad](https://navprabha.com/wp-content/uploads/2018/10/Smriti_Irani.jpg)
नवी दिल्ली
केरळमधील शबरीमला मंदिरातील महिला प्रवेशावरून देशभरात गाजावाजा सुरू असतानाच केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्री स्मृती ईराणी यांनी या विषयावर केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. एका कार्यक्रमावेळी ईराणी यांना या संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिसवाल केली की तुम्ही रक्ताळलेले सॅनिटरी पॅडस् मित्राच्या घरी नेऊ शकाल काय?
ईराणी पुढे म्हणाल्या की मंदिरात जाऊन प्रार्थना करण्याचा सर्वांनाचा हक्क आहे. मात्र मासिक पाळीच्या काळात त्या स्थितीत तुम्ही देवाच्या मंदिरात कशा काय जाणार असा सवालही त्यांनी केला. जर आपण मित्राच्या घरी रक्ताळलेले सॅनिटरी पॅडस्सह जाऊ शकत नसाल तर मग तुम्ही तशा स्थितीत देवाच्या मंदिरात कसे जाणार असे त्या म्हणाल्या. आपले हे विचार हे आपले वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालय व अन्य एका संस्थेच्या कार्यक्रमावेळी ईराणी बोलत होत्या.
महिलांना येणारी मासिक पाळी सर्वसामान्य नैसर्गिक बाब असून त्या अवस्थेत महिलांनी मंदिरात जाण्याचा व प्रार्थना करण्याचा हक्क कसा बजावू शकतात असा सवाल त्यांनी केला. प्रार्थनेचा हक्क प्रत्येकाला आहे. मात्र विटंबना करण्याचा नाही, असे मत त्यांनी मांडले.
सर्वोच्च न्यायालयाने महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार बहाल केला आहे.
आपण हिंदू धर्मिय असून एका पारशी व्यक्तीशी विवाह केला. माझ्या मुलांना मी झोराष्ट्रीयन परंपरा शिकवते. जेव्हा मी माझ्या लहानग्या बाळाला घेऊन अग्यारीमध्ये गेले तेव्हा मी बाळाला पतीकडे दिले. कारण मला तिथे उभ्या राहू नये असे सांगण्यात आले. नंतर माझे पती बाळाला घेऊन अग्यारीमध्ये गेले. याचे कारण हे की पारशी धर्मियाशिवाय तेथे अन्य धर्मियाने येऊ नये असा नियम आहे. तो नियम मी पाळला. अजूनही पाळते असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या रोखठोक मतप्रदर्शनामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार होण्याची शक्यता आहे.