पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्ली (94) यांचे काल वृद्धापकाळाने सोलापुरातील राहत्या घरी निधन झाले. प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक, अवघे जीवन वनविद्येचा अभ्यास आणि लेखनासाठी समर्पित करणारे व्यासंगी संशोधक व वनाधिकारी म्हणून मारुती चितमपल्ली यांची ओळख होती. दरम्यान, नुकतेच 30 एप्रिलला राष्ट्रपती यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
मारुती चितमपल्ली यांनी वन खात्यात 36 वर्षे सेवा केली. त्या काळात देशभर संशोधकवृत्तीने भटकंती केली. त्यांनी एकूण 5 लाख किलोमीटर प्रवास केला. मारुती चितमपल्ली यांना 13 भाषांचे ज्ञान होते. त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत त्यांनी पर्यावरणाशी संबंधित मोठी माहिती मिळवली. त्या माहितीची नोंद केलेल्या आणि 30 वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या आहेत. डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत त्यांनी पक्षीकोश, प्राणीकोश आणि मत्स्यकोशाचे लेखन पूर्ण केले.
अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन विषद करणारी 25 पेक्षा जास्त पुस्तके चितमपल्ली यांनी लिहिली. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून सतत कार्यरत हा सकारात्मक विचाराचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली, असे त्यांचे वर्णन केले जाते. 2006 मध्ये सोलापुरात झालेल्या 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवावर गुरुवार दि. 19 जून रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. दुपारी 1 वाजता राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार असून, त्यांच्यावर रूपा भवानी मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात भावजय, दोन पुतणे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.