महाराष्ट्रात महाआघाडीत फूट पडण्याची शक्यता

0
2

विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटपाचा घोळ अद्याप मिटलेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 29 ऑक्टोबर रोजी संपत आहे, पण महाविकास आघाडी घटक – काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांमधील 10 ते 12 जागा वाटपावरून मतभेद टोकाला पोहोचले असून आता अखिलेश यादव यांचा सपा पक्ष आपले उमेदवार स्वतंत्रपणे उभे करण्याच्या तयारीत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव नाखूश आहेत. सपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांनी शनिवारी महाविकास आघाडीकडे पक्षासाठी पाच जागांची मागणी केली होती. पण महाविकास आघाडीकडून काहीही उत्तर आले नाही. महाराष्ट्रात 288 जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्ष काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना प्रत्येकी 90 जागा मिळाल्या आहेत.

या जागावाटपावर सपाचे अबू आझमी यांनी सपाने मागणी केलेल्या पाच जागांकडे महाविकास आघाडी दुर्लक्ष करत असून त्यामुळे आम्ही आता 20 जागा लढवण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. सपा पूर्वी 12 जागांची मागणी करत होती, याची आठवणही आझमी यांनी करून दिली.