भलते प्रश्न

0
7

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताची काही विमाने पाकिस्तानने पाडल्याची अप्रत्यक्ष कबुली दिल्याने काँग्रेस नेत्यांना जितं मयाचा आनंद झालेला दिसतो. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लगोलग कंठ फुटला आणि त्यांनी कारगील युद्धानंतर झालेल्या चौकशीप्रमाणे ऑपरेशन सिंदूरसंबंधी रीतसर चौकशी केली जावी मागणी पुढे केली आहे. आजवर काँग्रेस नेते राहुल गांधी पाकिस्तानच्या सुरांत सूर मिळवत आले होते. भारत दहशतवादी तळांवर हल्ला करणार असल्याची पूर्वसूचना पाकिस्तानला दिली गेली होती आणि त्यामुळे पाकिस्तानने भारताची विमाने पाडली असा कंठशोष राहुल गांधी करीत आले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्याबाबत खुलासा केला की पाकिस्तानला हल्ल्यानंतर तसे कळवले गेले होते. परंतु एकीकडे ऑपरेशन सिंदूरचा राजकीय लाभ उठवण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आणि दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरवरून भाजप सरकारला खिंडीत पकडण्याची काँग्रेसची धडपड याची तिकडे पाकिस्तान मात्र मजा लुटतो आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच रात्री भारताच्या तीन राफेल विमानांसह सहा विमाने पाडली गेल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केला होता. भारताचे डीजीएमओ अवधेशकुमार भारती यांनी मात्र ऑपरेशन सिंदूरसंबंधी माहिती देताना, आपले सर्व वैमानिक सुखरूप परत आल्याचे सांगितले होते. त्यामुळे अनिल चौहान यांनी काही विमाने पाडली गेल्याची अप्रत्यक्ष कबुली दिल्याने खर्गे यांनी युद्धाचे धुके आता दूर होते आहे अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. परंतु चौहान पुढे जे म्हणाले ते अधिक महत्त्वाचे आहे. त्यांनी सांगितले की आमच्या दृष्टीने किती विमाने पडली हे महत्त्वाची नाही, तर त्यापासून आपण काय शिकलो आणि त्यावर काय उपाययोजना केली हे अधिक महत्त्वाचे आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या रात्री म्हणजे सात मे रोजी भारताने दहशतवादी तळांवर हल्ला केला. पाकिस्तानला अर्थातच भारताकडून काही आक्रमक पाऊल उचलले जाईल ह्याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे तो तयारीत असणारच. त्यासाठी भारताने काही आम्ही हल्ला करणार आहोत अशी पूर्वसूचना देण्याची गरज नव्हती. पहिल्याच रात्री झालेल्या धडक कारवाईत आपली काही विमाने जर शत्रूकडून खरोखरच पाडली गेली असतील, तर त्याचा एवढा बाऊ करण्यासारखे काय आहे. युद्धामध्ये दोन्ही बाजूंनी कमीअधिक हानी ही होतच असते. परंतु ज्याअर्थी आपले सर्व वैमानिक सुखरूप परत आले असे सरकारतर्फे सांगितले गेले, त्या अर्थी पाकिस्तानच्या ह्या प्रतिहल्ल्यात आपल्याबाजूने प्राणहानी झाली नाही असे मानायला वाव आहे. शिवाय आपल्या कारवाईत दहशतवाद्यांची जी बडी बडी मुख्यालये उद्ध्वस्त झाली ते यश निश्चितच मोठे आहे. त्यानंतरच्या टप्प्यात भारताने थेट पाकिस्तानचे लष्करी तळ लक्ष्य केले आणि मोठी हानी घडवली. म्हणजेच भारताने पहिल्या रात्री केलेल्या चुका सुधारल्या आणि त्यांची पुनरावृत्ती पुढील तीन दिवसांत झाली नाही. अनिल चौहान यांनी हेच सूचित केले आहे. डीजीएमओच्या पत्रकार परिषदेत अवधेशकुमार भारती एका प्रश्नावर फार सुंदर वाक्य बोलून गेले होते. ऑपरेशन सिंदूरच्या टीशर्टस्‌‍वरही ते वाक्य आज पाहायला मिळते. आमचे काम लक्ष्य भेदणे हे आहे, मृतदेह मोजणे नव्हे असे अवधेशकुमार सहजगत्या बोलून गेले होते. अनिल चौहान म्हणतात त्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूरने एक नवी लाल रेषा आखली आहे, जिचे भान पाकिस्तानला यापुढील काळात निदान काही काळ तरी ठेवावेच लागणार आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादी हल्ले थांबतील असे नव्हे. परंतु त्याचे अत्यंत आक्रमक उत्तर भारताकडून दिले जाईल हे भान एव्हाना पाकिस्तानला आणि पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांना आलेले असेल. हा जो संदेश भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे दिला तो अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार आहे. ऑपरेशन सिंदूर ही भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्या पराक्रमाची गाथा आहे. त्याचे राजकीय भांडवल भाजपने करू नये आणि त्या पराक्रमावर शंका घेण्याचे पाप काँग्रेस व अन्य विरोधी पक्षीयांनीही करू नये. सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटवेळी विरोधकांनी पुरावे मागितले होते. ह्यावेळी सैन्यदलांनी स्वच्छ, स्पष्ट पुरावे सादर केले आहेत, ज्यावर कोणीही शंका घेऊ शकणार नाही. त्यामुळे काँग्रेसने भलतेसलते प्रश्न विचारून स्वतःचे हसे करून घेऊ नये. काँग्रेस नेत्यांच्या तुलनेत असदुद्दिन ओवैसींनी पाकिस्तानविरुद्ध जी भूमिका घेतली आहे ती अतिशय प्रशंसनीय आहे. देशोदेशी जाऊन ओवैसी पाकिस्तानचा पर्दाफाश करीत आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्यदलांनी दाखवलेल्या पराक्रमाचे कौतुक करण्याऐवजी आपापल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी त्या मोहिमेचा वापर करणे मतलबीपणाचे निदर्शक आणि अत्यंत लाजिरवाणे व सवंगपणाचे आहे.