राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना मागणीचे निवेदन
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल शिष्टमंडळासह राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त रमेश वर्मा यांची भेट घेऊन बोगस मतदार नोंदणी विरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. यावेळी सिद्धार्थ कुंकळ्येकर, केशव प्रभू, नवीन पै रायकर व पुंडलिक राऊत हे भाजप नेते उपस्थित होते.
सदर शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्तांकडे चुकीच्या मार्गाने नोंदणी झालेल्या मतदारांना मतदारयाद्यांतून वगळण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली. दामू नाईक यांनी यावेळी रमेश वर्मा यांना मतदारयाद्यांवर करडी नजर ठेवण्याची मागणी करतानाच एखाद्या मतदारयादीत मतदारांचा आकडा अचानक वाढल्याचे आढळून आल्यास त्याबाबत चौकशी करण्याचे, तसेच अवैधरित्या जर कुणांची नावे यादीत समाविष्ट केल्याचे दिसून आल्यास तात्काळ आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली.
गोव्यात अवघे 11.8 लाख एवढे मतदार असून, मतदारयाद्यांत चुकीच्या मार्गाने जर कुणाची नावे घुसवण्यास आल्यास ती काढून टाकणे कठीण नाही. काही नावे बोगस असू शकतात, तर काही मतदारांनी दोन ठिकाणी मतदार म्हणून नावनोंदणी केलेली असू शकते, असेही नाईक यांनी रमेश वर्मा
यांना सांगितले.
मतदारयाद्यांत जी नवी नावे घालण्यात आलेली असतील, त्याबाबत खातरजमा केली जावी. ती अन्य मतदारसंघातील मतदारांची तर नाहीत ना हे पाहणे गरजेचे असल्याचेही नाईक यांनी सांगितले.