ताटी उघडा ज्ञानेश्वरा…!

0
18
  • रमेश सावईकर

संत मुक्ताबाईंची पुण्यतिथी वैशाख वद्य दशमी तिथीला, गुरुवार दि. 22 मे रोजी साजरी झाली. यानिमित्त मुक्तानगर, जळगाव येथे भक्तगणांची अलौट गर्दी जमली. अशा या मराठी साहित्यातील संतश्रेष्ठ कवयित्री तथा स्त्री-सद्गुरू मुक्तांबाईंना ही शब्दसुमनांजली!

निवृत्ती-ज्ञानेश्वरांपेक्षा वयाने लहान असलेली पण संतमंडळात मोठे स्थान व अधिकार असलेली कवयित्री म्हणून संत मुक्ताबाई ओळखल्या जातात. ज्ञानेश्वरादी भावंडे व इतर संतांच्या सहवासात राहून त्यांनी अभंगरचना केली. संत ज्ञानेश्वरांना त्यांनी गुरू मानले. पंढरी माहात्म्य, नाममाहात्म्य व संतसमागम या विषयांवर मुक्ताबाईंची अभंगरचना आहे.
नाम मंत्रें हरि निज दासां पावे। ऐकोनी घ्यावें झडकरी॥
अशा शब्दांत मुक्ताबाईंनी नाममहिमा सांगितला आहे. सगुण-निर्गुण या कल्पनांच्याही पुढे जाण्याचे सामर्थ्य मुक्ताबाईंच्या ठिकाणी आहे. त्या ‘मुक्ताई’ या नावाने प्रसिद्ध आहेत.

निर्गुणाची सैज सगुणाची बाज। तेथें केशीराज पहुडले॥
अशी कल्पना त्या करतात. योगमार्गाविषयी त्यांनी लिहिलेले अभंग हे गूढ आहेत. त्यांनी आपल्या अभंगांतून समाजाला ज्ञान व मार्गदर्शन दिले. त्यांचे अभंग आजही लोकांना प्रेरणा देतात. वारकरी चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
संत मुक्ताबाईंचा जन्म आपेगाव (महाराष्ट्र) येथे इ.स. 1279 मध्ये झाला. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताई ही चार भावंडे होत. विठ्ठलपंत कुलकर्णी हे त्यांचे वडील व रुक्मिणी आई. या चारही भावंडांना बालपणी खूप कष्टांना सामोरे जावे लागले. मुक्ताईने तिचे बालपण तिच्या कुटुंबासह महाराष्ट्रात भटकंती करण्यात घालविले.
मुक्ताबाईंनी आपले परात्पर गुरू असणाऱ्या गोरक्षनाथांची आपल्या साधनेच्या आधारावर योगमार्गाने भेट घेतली. ‘ताटीचे अभंग’ लिहून संत ज्ञानेश्वरांना लेखनप्रवृत्त केले. योगी चांगदेवांचा अहंकार छोट्या मुक्ताबाईचे अलौकिक ज्ञान बघून गळून पडला. त्यांनी मुक्ताबाईंना आपले गुरू मानले.

संत नामदेवांच्या जीवनाच्या दृष्टीनेही संत मुक्ताबाई यांचे प्रबोधन महत्त्वाचे ठरले. नाथ संप्रदायातील सद्गुरू पदावर आरूढ झालेल्या मुक्ताई या महाराष्ट्रातील पहिल्याच स्त्री-सद्गुरू होत्या. ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईंना सांगितले-
आठवे समाधिचे अंग आले तुज। आता नाही काज आणिकांसी।
ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यामधील हे संवाद ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेली ‘सनद’ या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यानंतर विसोबा खेचर शरण आले. शुद्धिपत्र मिळविण्यासाठी चारही भावंडे पैठणास गेली तेव्हा मुक्ताबाईंबद्दल पैठणकरांची प्रतिक्रिया महत्त्वपूर्ण अशी होती-
हे तिन्ही अवतार तीन देवांचे।
आदिमाता मुक्ताई मुक्तपणे अवतरली॥
मुक्ताबाईंचा ‘ब्रह्मचित्कळा’ या नावानेदेखील सन्मान झाला.
एकदा ज्ञानेश्वर रागाने दरवाजे बंद करून घरात बसले. ते काही केल्या दार उघडेनात. तेव्हा संत मुक्ताबाईंनी त्यांची समजूत काढण्यासाठी अभंगरचना केली. ते अभंग ‘ताटीचे अभंग’ म्हणून प्रसिद्ध आहेत. मुक्ताबाईंच्या मनातील सारे आर्त या अभंगातून व्यक्त झाले आहेत.
रागे भरवे कवणांशी। आपण ब्रह्म सर्वदेशी॥
या शब्दांत तिने ज्ञानेश्वरांची समजूत घातली व लेखनप्रवृत्त केले.
मजवरी दया करा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा॥
संत जेणें व्हावें। जग बोलणे साहावें॥
तरीच अंगी थोरपण। जया नाही अभिमान॥
थोरपण जेथे वसें। तेथे भूतदया असें॥
योगी पावन मनाचा। साही अपराध जनाचा॥
विश्व रागे झाले वन्ही। संती सुखे व्हावे पाणी॥
असा ज्ञानेश्वरांना एका अर्थाने उपदेश केला आहे. भावनेची कोवळीक तिच्या या ताटीच्या अभंगातून पदोपदी जाणवते. तिच्या इतर अभंगांत काव्य नाही असे नाही, पण ‘ताटीचे अभंग’ तिच्या सर्व रचनेत ‘भावोत्कट’ म्हणून उठून दिसतात.
भक्तिमार्गाशिवाय योगमार्गाचा अनुभव सांगणारे काही कूट (गूढात्मक) अभंगही तिने लिहिले आहेत.
मुंगी उडाली आकाशीं। तिणें गिळिलें सूर्याशीं॥
थोर नवलाव जाहला। वांझे पुत्र प्रसवला॥
विंचु पाताळाशी जाय। शेष माथां वंदी पाय॥
माशी व्याली घार झाली। देखोन मुक्ताई हांसली॥
हा मुक्ताबाईंचा अभंग तिच्या कूट रचनेचे उदाहरण म्हणता येईल.
विश्वाकडून होणारी टीका सहन करण्याची क्षमता संतांमध्ये असायला हवी. आपल्या अभंगात त्या म्हणतात-
संत जेणे वाहवे। जग बोलणे सोसावे॥
त्यांच्या 41 अभंगांपैकी ‘ताटीचे अभंग’ वगळता बाकी अभंगांतून भक्तिमार्गाविषयी मार्गदर्शन आहे.
संत नामदेव जेव्हा ज्ञानेश्वरादी चार भावंडांच्या भेटीस आले तेव्हा सर्वांनी त्यांना वंदन केले. मात्र मुक्ताबाईने त्यांना नमस्कार करण्यास मनाई केली. ‘सद्गुरूविना परमार्थाची प्राप्ती नाही’ हे त्यांना कळावे यासाठी मुक्ताबाईंचा प्रयत्न होता. गुरू गोरक्षनाथ यांच्या थापटण्याच्या प्रसंगातून नामदेवांना स्वतःचे अपुरेपण लक्षात आले आणि पुढे ते विसोबा खेचर यांना शरण गेले. ‘लहानपणी मुक्ताबाई जैसी सणकांडी’ असा उल्लेख नामदेवांनी केला.
नामदेवांच्या परीक्षेच्या निमित्ताने मुक्ताई यांच्या योगसामर्थ्याची प्रचिती भावंडांना आली. मुक्ताई ‘माय’ या स्वरूपात वंदनीय झाली. या प्रसंगामध्ये मुक्ताबाई यांना गोरक्षनाथकृपेचा अनुभव आला. अमृत संजीवनी लाभण्याचा हा अनुभव होता. याच प्रसंगी त्यांना ‘चिरकाल अभंग शरीरा’चे वरदान मिळाले होते.
तीर्थयात्रेवरून परतल्यावर अल्पावधीतच ज्ञानेश्वरांनी समाधिस्थ होत असल्याचा आपला निर्णय भावंडांकडे बोलून दाखविला आणि सर्व भावंडे त्यासाठी सिद्ध झाली. प्रथम ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतली. त्यानंतर सोपान यांनी सासवड येथे समाधी घेतली.
निवृत्तीनाथ आणि नामदेव व इतर भक्तगण यांच्या समवेत संत मुक्ताबाई आपेगावी पोचल्या. तेथून पुढे वेरुळ, घृणेश्वर येथे जाऊन मुक्काम केला. पुढील वाटचालीत त्यांनी ‘ज्ञानबोध’ ग्रंथाची निर्मिती केली.

मुक्ताबाई वैशाख वद्य दशमी, इ.स. 1297 या दिनी तापी तीरी स्वरुपाकार झाल्या. त्यांची समाधी महत्‌‍नगर कोथळी (जळगाव जिल्हा) येथे आहे. त्या एदलाबाद नगराचे नामकरण मुक्तानगर असे करण्यात आले. दरवर्षी वैशाख वद्य दशमी तिथीला मुक्ताबाईंची पुण्यतिथी मुक्तानगर, जळगाव येथे हजारो भक्तगण, विशेषतः वारकरी एकत्र येऊन साजरी करतात.

पांडुरंग माहात्म्य वर्णन करणारे अभंग, नामपर अभंग, मुक्तास्थिती वर्णनपर अभंग, संवादात्मक अभंग, कूट रचना याप्रमाणे त्यांच्या अभंगांचे वर्गीकरण करता येईल.
मुक्ताबाईंचे संख्येने अल्प म्हणजे फक्त बारा ‘ताटीचे अभंग’ हे समृद्ध अभंग पुढे ‘ज्ञानेश्वरी’ ऊर्फ ‘भावार्थदीपिका’ या ग्रंथाचे प्रेरणास्तोत्र बनले.
‘तुम्ही तरुनी विश्व तारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा॥’ अशी विनवणी मुक्ताई ज्ञानेश्वरांना करतात. परिणामतः शुद्ध ज्ञानापासून वंचित झालेल्या जनसामान्यांमध्ये ‘ब्रह्मविद्येचा सुकाळ’ करण्याची प्रतिज्ञा करून ज्ञानेश्वर ज्ञानप्रदानाला उद्युक्त झाले, एवढे सामर्थ्य मुक्ताबाईंच्या अभंगात होते.
संत मुक्ताबाईंची पुण्यतिथी वैशाख वद्य दशमी तिथीला, गुरुवार दि. 22 मे रोजी मुक्तानगर, जळगाव येथे साजरी झाली. त्यानिमित्ताने मराठी साहित्यातील संतश्रेष्ठ कवयित्री तथा स्त्री-सद्गुरू मुक्तांबाईंना ही शब्दसुमनांजली!