आरसीबीच्या विजयी मिरवणुकीवेळी घडली दुर्घटना; 33 जण जखमी; उपचार सुरू
आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाच्या जल्लोषाला काल गालबोट लागले. विजेत्या आरसीबी संघाची विजयी मिरवणूक पाहण्यासाठी झालेल्या तुफान गर्दीमुळे चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर मोठी चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये 11 चाहत्यांचा मृत्यू झाला, तर 33 जण जखमी झाले.
या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, ही विजयी मिरवणूक काढण्याबाबत आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती, तसेच आयोजनात आमचा कोणताही सहभाग नव्हता, असे बीसीसीआयने स्पष्ट केले.
आरसीबीने आयपीएलच्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव करुन चषकावर नाव कोरले होते. तब्बल 18 वर्षांनी आरसीबीने मिळवलेल्या विजेतेपदामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. त्यामुळेच काल बंगळुरुत असंख्य चाहते चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी जमले होते.
बंगळुरुच्या विमानतळावर उतरल्यानंतर आरसीबीचा संघ प्रथम विधान सौधा येथे पोहोचला, जिथे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून संपूर्ण संघाचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विधान सौधा ते चिन्नास्वामी स्टेडिअमपर्यंत आरसीबीच्या संघाची खुल्या बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात येणार होती. त्यामुळे स्टेडियमच्या प्रवेशद्वारासह बाहेरील परिसरात विराट कोहलीसह टीमची एक झलक पाहण्यासाठी लोकांची तुडुंब गर्दी झाली होती. याच दरम्यान प्रचंड गर्दीमुळे धक्काबुक्कीचा प्रकार घडला. याशिवाय एका नाल्यावरील स्लॅब कोसळला आणि सगळ्यांचा गोंधळ उडाला. तसेच पोलिसांनी काही प्रमाणात गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केल्याचेही दिसून आले. मात्र या गर्दीत काहीजण खाली पडले. त्यांच्या अंगावरून लोक जात होते. त्यात 11 चाहत्यांना आपला प्राण गमवावा लागला. तसेच अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर स्टेडियममध्ये आयोजित खेळाडूंचा सत्कार 10 मिनिटांतच आटोपता घेण्यात आला.