आजवर नक्षलवाद्यांचा अभेद्य गड राहिलेल्या अबुझमाडच्या जंगलामध्ये दोन डझनांहून अधिक नक्षल्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणांना नुकतेच यश आले. ह्या कारवाईमध्ये तब्बल पाच कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नंबाला केशव राव ऊर्फ बसवराजू हा बडा नक्षलवादी नेताही मारला गेला. भारतातील नक्षलवादी चळवळीला 31 मार्च 2026 पर्यंत पूर्णपणे संपविण्याचा विडा उचललेल्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना मिळालेले हे खरोखरच मोठे यश म्हणावे लागेल. राज्याराज्यांतून आलेले नक्षलवादी अबुझमाडच्या आपल्या पारंपरिक बालेकिल्ल्यामध्ये रात्री एकत्र जमले होते. छत्तीसगढच्या नारायणपूर जिल्ह्यात येणारे हे घनदाट जंगल नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणूनच आजवर ओळखले जायचे. छत्तीसगढचा नारायणपूर जिल्हा, दांतेवाडा आणि बिजापूर जिल्हा ह्या तिन्हींच्या सीमा जेथे एकत्र येतात त्या भागामध्ये हे घनदाट जंगल पसरलेले आहे. त्याच्या अतिदुर्गम भागामध्ये शेकडो गुहा आहेत, जेथे बडे बडे नक्षलवादी नेते आजवर सुरक्षित राहात आले. मात्र, आता त्यांच्याभोवती सुरक्षा यंत्रणांचे पाश कसोशीने आवळले जाताना दिसत आहेत. म्हणूनच वयाच्या तारुण्यामध्ये नक्षलवादी चळवळीत सामील झालेला आणि तीन तीन सुरक्षा घेऱ्यांमध्ये राहून आजवर अजेय ठरलेला बसवराजूसारखा नक्षली नेता वयाच्या सत्तरीत का होईना ह्या कारवाईत मारला गेला. नक्षलवादी चळवळीतील एवढ्या मोठ्या नेत्याचा खात्मा करण्यात जवळजवळ तीस वर्षांनंतर यश आले आहे. इतर काही बडे नेते आता अबुझमाडच्या अधिक घनदाट भागात पळाले आहेत. हे नक्षली जेव्हा डोके वर काढतात, तेव्हा त्यांच्यापाशी काहीही दयामाया नसते. त्यांनी आजवर जे क्रौर्य दाखवले आहे, ते पाहिल्यास ह्यांचा मुकाबला गोळीला गोळीनेच उत्तर देऊन करावा ही भूमिका सुरक्षादले घेत असतील तर नवल नाही. दांतेवाडामध्ये काही वर्षांपूर्वी राखीव पोलीस दलांच्या वाहनांना सापळ्यात अडकवून केल्या गेलेल्या भूसुरुंग स्फोटांत तब्बल 76 जवानांचा बळी गेला होता. झिरमा घाटीतल्या हल्ल्यात ह्या नक्षल्यांनी निवडणुकीच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे स्थानिक नेतृत्वच संपवून टाकले होते. त्यामुळे अशा क्रौर्याच्या कहाण्यांनीच ज्यांचा इतिहास भरला आहे, त्या नक्षलवाद्यांसाठी कोणी आसवे ढाळणार नाही. एकेकाळी ह्या नक्षलवादी चळवळीने आपल्या देशाला मधोमध उभा चिरणारा रेड कॉरिडॉर तयार केलेला होता. जिल्ह्यांमागून जिल्हे नक्षलवाद्यांच्या प्रभावाखाली चालले होते. गेल्या काही वर्षांत त्या नक्षलीप्रभावित जिल्ह्यांमधून त्यांना हुसकावून लावण्यात आपल्या सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळते आहे. आता केवळ सहा जिल्हे नक्षलवादाने अतिप्रभावित मानले जातात. नक्षलवादग्रस्त जिल्ह्यांची संख्या केवळ 19 आहे. सुरक्षा दलांना मिळणाऱ्या यशाचे कारण नक्षलवाद्यांचा स्थानिक पाठिंबा कमी होत चालला आहे हेच आहे. अन्यथा सुरक्षा दलांच्या प्रत्येक हालचालीचे निरोप नक्षल्यांना तात्काळ पोहोचवले जायचे. त्यामुळे ही दले तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांच्यासाठी नक्षल्यांचे भूसुरूंग सज्ज असायचे. गेल्या काही वर्षांत परिस्थिती पालटते आहे. स्थानिक नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या कामी सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात असल्याने रस्ते, बँका, बाजार, शाळा, आरोग्यकेंद्रे यांच्या सुविधा, रोजगाराच्या सुविधा ह्या नक्षलप्रभावित भागांमध्ये निर्माण होऊ लागल्या आहेत. शिवाय सुरक्षा दलांमध्ये पूर्वी समन्वयाचा अभाव असे, परंतु ऑपरेशन ग्रीनहंटनंतर प्रत्येक मोहिमेमध्ये विविध सुरक्षा दलांमध्ये मोठा समन्वय दिसतो. त्यामुळे अत्यंत नियोजनबद्धरीत्या नक्षल्यांचा मुकाबला करणे शक्य झाले आहे. पुढील वर्षापर्यंत नक्षलवादच संपुष्टात आणण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला असल्याने सुरक्षा दलांनी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. परिणामी ह्या वर्षी आतापावेतो म्हणजे गेल्या दीडशे दिवसांतच तीनशेच्या वर नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यापैकी 183 एकट्या बस्तर जिल्ह्यात मारले गेले आहेत. यापूर्वी संपूर्ण वर्षभरामध्ये एवढे नक्षलवादी मारले जात असत. नक्षलवाद हा निश्चितपणे देशविघातक आहे आणि त्याचा नायनाट झालाच पाहिजे. मात्र, नक्षलवाद संपवण्याच्या नादात निष्पाप आदिवासींना लक्ष्य तर केले जात नाही ना हेही पाहणे गरजेचे असेल. सुरक्षा दलांच्या एवढ्या मोठ्या कारवाईचा परिणाम म्हणून शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात येण्याचा विचारही नक्षल्यांमध्ये बळावू लागला आहे हे स्वागतार्ह आहे. एकीकडे त्यांच्याभोवती पाश आवळत असताना दुसरीकडे शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात येण्याची संधीही सरकारने त्यांच्यासाठी खुली ठेवली आहे. गोळीला नाहक बळी पडण्यापेक्षा शरणागती पत्करून मुख्य प्रवाहामध्ये सामील होण्यातच नक्षल्यांचे हित असेल.