एआयमुळे नोकरीच्या नव्या संधी निर्माण होतील : मोदी

0
1

>> पॅरिसमधील आर्टिफिशअल इंटेलिजन्स परिषदेत घेतला सहभाग; 100 देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी

आज एआय ही काळाची गरज आहे. काळ बदलतो आहे त्याचप्रमाणे रोजगाराचे स्वरुपही बदलते आहे. एआयमुळे रोजगारावर संकट निर्माण होऊ शकते, अशी चर्चा ऐकू येत आहे; पण इतिहास आपल्याला हेच सांगतो की कुठलेही तंत्रज्ञान नोकऱ्यांवर संकट निर्माण करू शकणार नाही. उलट एआयमुळे नोकरीच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास पंतप्रधार नरेंद्र मोदींनी पॅरिसमधील एआय परिषदेत व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असून, सोमवारी रात्री उशिरा ते फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एआय’ अर्थात आर्टिफिशअल इंटेलिजन्स परिषदेत भाषण केले. तसेच त्यांनी द्विपक्षीय चर्चाही केली. या परिषदेत 100 देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी झाले आहेत.
आमच्याकडे जगातील सर्वात मोठी युवा प्रतिभा आहे. आम्ही लोकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्था तयार केली आहे. आमचे सरकार खासगी सेक्टर्सच्या मदतीने पुढे वाटचाल करत आहे. एआयचे भविष्य खूपच चांगले आहे आणि त्यामुळे सगळ्यांचे हित होणार आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणांत पुढे म्हणाले, एआय कोड फॉर ह्युमॅनिटी लिहितो आहे. एआयमुळे लाखो लोकांचे आयुष्य बदलणार आहे. एआय आपल्या समाज, अर्थव्यवस्था आणि सुरक्षा या आघाड्यांना सकारात्मक पद्धतीने बदलतो आहे. एआयबाबत काही जोखमीचे मुद्दे आहेत. त्यावर विचारमंथन झाले पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे, असेही मोदींनी सुचवले.
एआयमध्ये हजारो लोकांचे आयुष्य बदलण्याची ताकद आहे. समाज आणि सुरक्षा या दोन घटकांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आवश्यकता आहे, असेही मोदी म्हणाले.