लोकसभेत 400 पेक्षा अधिक जागा ः मुख्यमंत्री

0
22

सभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला परत एकदा देशातील जनता जिंकून आणेल हे आज झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले असून लोकसभेत भाजपला 400 पेक्षा अधिक जागा मिळतील असा विश्वास काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

‘सबका साथ और सबका विकास’ हा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा नारा तसेच त्यांनी सुरू केलेल्या योजना जनतेला पसंत पडल्या असल्याचे भाजपला मिळणाऱ्या पाठिंब्यावरून स्पष्ट होत आहे. या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे सर्व केंद्रीय मंत्री तसेच मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ येथील नेते अभिनंदनास पात्र असल्याचे सावंत यांनी सांगितले.
मध्यप्रदेशातील मिळालेला विजय हा तर डोळे दिपून टाकणारा असून त्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे योगदान हे फार मोठे असल्याचे ते म्हणाले. राजस्थानमध्येही लोकांना भाजपला भरभरून पाठिंबा देऊन विजयी केल्याचे सांगून तेथे घोटाळ्यांसोबतच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे लोकांनी काँग्रेसचे सरकार पाडल्याचे सावंत म्हणाले.
छत्तीसगढमध्येही अनेक घोटाळे झाल्यामुळे तेथेही लोकांनी भाजपला निवडून आणल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दक्षिणेकडील तेलंगणा राज्यातही आता भाजपला मते मिळू लागली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

विकासामुळे विजय ः श्रीपाद

खासदार व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा चौफेर विकास केलेला असून त्यामुळेच पक्षाला राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगढ येथे विजय प्राप्त झाल्याचे सांगितले. भाजपने 2014 साली सत्तेवर आल्यापासून देशात मोठ्या प्रमाणात विकास केला. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही त्या राज्यांतही भाजपने विकासकामे केल्याचे ते म्हणाले. भाजपचा 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोठा विजय होईल, असे नाईक म्हणाले. पक्षाचे नेते दामू नाईक यांनी पक्षाच्या विजयाविषयी आनंद व्यक्त केला.