पराभव चिदंबरम यांचा आणि कॉंग्रेसचाही!

0
118
  • ल. त्र्यं. जोशी

ज्या पध्दतीने तपासयंत्रणा विजय मल्ल्‌या, नीरव मोदी, चोकसी मामा आणि आता कार्ती आणि बाबा पी. चिदंबरम यांच्या मुसक्या आवळायला लागलेल्या आहेत, त्यावरुन ही मोहीम आता माध्यमांमधून बाहेर पडली आहे असे म्हणावे लागेल व तीच चिदंबरम प्रकरणाची महत्वाची उपलब्धी आहे.

भारताचे संपुआ काळातील गृहमंत्री आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेच्या निमित्ताने गेल्या आठवड्यात वेगाने घडलेल्या घटना पाहता पंतप्रधान मोदींच्या भ्रष्टाचारविरोधी मोंहिमेला मोठे यश मिळाले आहे असे म्हणावे लागेल. चिदंबरम प्रकरणाचे आणखी बरेच अध्याय पूर्ण व्हायचे आहेत. आता कुठे प्रकरण अंतरिम जामिनापर्यंतच पोचले आहे पण त्यात सी.बी.आय. आणि इडी यांनी मिळवलेल्या यशामुळे तपास संस्थांची विश्वसनीयता आणि मनोधैर्य वाढले आहे आणि तो भ्रष्टाचारविरोधी मोहिमेसाठी एक शुभसंकेतच आहे. या लढाईत केवळ चिदंबरम यांचाच नव्हे तर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाजया ल्युटियन कॉंग्रेसचाही पराभवच झाला आहे ही सामान्य माणसाला दिलासा देणारी बाब आहे. या देशात काहीच होत नाही. विशेषत: भ्रष्टाचारविरोधी मोहीम ङ्गक्त माध्यमात चालविली जाते असा आतापर्यंत समज होता, पण ज्या पध्दतीने तपासयंत्रणा विजय मल्ल्‌या, नीरव मोदी, चोकसी मामा आणि आता कार्ती आणि बाबा पी. चिदंबरम यांच्या मुसक्या आवळायला लागलेल्या आहेत, त्यावरुन ही मोहीम आता माध्यमांमधून बाहेर पडली आहे असे म्हणावे लागेल व तीच चिदंबरम प्रकरणाची महत्वाची उपलब्धी आहे.

खरे तर चिदंबरम पितापुत्रांच्या भ्रष्टाचाराच्या कथा गेल्या दोनेक वर्षांपासून चर्चेत आल्या आहेत, पण प्रत्येक वेळी त्यांनी न्यायालयातून आदेश मिळवून आपल्यावरील कारवाई टाळण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. तपास यंत्रणांची टांगती तलवार डोक्यावर असतानाही कार्ती परदेशवार्‍या करीत होता, तर चिदंबरम हसतमुखाने न्यायालयातून बाहेर पडत होते. पण या आठवड्यातील घटनांनी त्यांचा तो तोरा जमिनीवर आणला आहे. एकेकाळी देशाचे अर्थ आणि गृहमंत्रिपद सांभाळणार्‍या भ्रष्टाचार्‍याला त्याच्या काळात नेमण्यात आलेले, बढती देण्यात आलेले अधिकारी सगळे अडथळे पार करीत त्याला कायद्यासमोर शरण यायला भाग पाडू शकतात, आपल्या कोठडीत डांबू शकतात हा तपास यंत्रणांना प्राप्त झालेला विश्वास तर उल्लेखनीयच आहे, कारण त्यातून चांगले काम करण्याचा संदेश प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोचणार आहे. कॉंग्रेस आणि तिचे तळवे चाटणारे काही ल्युटियन्स यांना या प्रकरणात मोदी आणि शहा यांचा हात दिसतो. पण न्यायालयांनी तो केव्हाच ङ्गेटाळून लावला आहे. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीनअर्ज ङ्गेटाळताना दिल्ली उच्च न्यायालयाने तर निकालपत्रातच त्याचा उल्लेख केला आहे. चिदंबरम वरील कारवाई तहकूब करण्यासाठी कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद, अभिषेक मनुु सिंघवी यांची सर्वोच्च न्यायालयात झालेली असङ्गल आदळआपटही तेच सूचित करते आणि गुरुवारी दिल्लीतील सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीशांनी चिदंबरम यांना कोठडीची हवा खायला पाठवून तोच संदेश दिला आहे. चिदंबरमची पाठराखण करणार्‍यांना वाटते की, हे सगळे मोदी – शहाच घडवून आणत आहेत. एका अर्थाने ते बरोबरही आहे, कारण तपासयंत्रणांना खंबीरपणे योग्य कारवाई करण्यासाठी त्यांनीच मोकळीक दिली आहे. पण त्यानंतरचे असलेले यश हे तपासयंत्रणांचेच आहे, याबद्दल शंका असण्याचे कारण नाही, कारण कारवाई करताना प्रत्येक क्षणी आपल्या विजयाकडे लक्ष ठेवावे लागते. त्या संदर्भातील निर्णय त्या क्षणीच घ्यावा लागतो. त्यासाठी मोदी शहा नोटस काढून देत नाहीत. चिदंबरम यांनी घराचे ङ्गाटक बंद केल्यानंतर भिंतीवरुन उड्या मारुन आत शिरुन त्यांचे बखोटे पकडायचे की, नाही हे यंत्रणेला त्या क्षणी ठरवावे लागते. त्यावेळी त्यांना बोलायलाही वेळ नसतो. एवढ्या सगळ्या प्रयत्नांनंतर चिदंबरम हाती लागले नसते तर यांनी यंत्रणेला दोष द्यायलाही मागेपुढे पाहिले नसते. दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर २७ तास भारताचे माजी गृहमंत्री ङ्गरार झाले होते. त्यामुळे तपासयंत्राणांनाच त्यांच्या यशाचे श्रेय देणे क्रमप्राप्त आहे.

आयएनएक्स मिडिया प्रकरणी तर हे सारे प्रकर्षाने समोर आले आहे. वास्तविक चिदंबरम पितापुत्रांनी या प्रकरणात केलेल्या चुका त्यांच्या वेळीच कशा लक्षात आल्या नाहीत, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण चिदंबरम हे अतिशय निष्णात असे वकील आहेत, हे सर्वांनाच ठाऊक आहे. ते आपण पकडले जाऊ शकतो याचा विचार न करता ह्या चुका करु शकतात यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही. पण आपले कुणीश्ी, काहीही बिघडवू शकत नाही, झालेल्या चुका आपल्यालाच सावरायच्या आहेत किंबहुना सावरायची वेळच येणार नाही अशा गुर्मीत जेव्हा मनुष्य जातो तेव्हा तो अशा चुका करून बसतो. प्रत्येक गुन्हेगार कोणती तरी चूक करुनच जातो व तीच त्याला महागात पडते, असे पोलीस नेहमी म्हणतात. त्याचा प्रत्यय या निमित्ताने आला आहे. आपला मनी ट्रेल पकडला जाऊ शकतो हे काय कार्तीला समजत नाही? त्या संदर्भात अर्थमंत्री असलेल्या आपल्या बाबांचा पत्रात उल्लेख करायला नको हे काय त्याला कळत नाही? तोही म्हणे हुशार वकील आहे. पण एक वेळ सत्तेची नशा चढली म्हणजे असेच होणार. असे म्हणतात की, तपास यंत्रणा जेव्हा कोठडीत ते पत्र चिदंबरम यांना दाखवत होत्या त्यावेळी त्यांनी त्या पत्राकडे पाहण्यास देखील नकार दिला. ते आपल्या बचावासाठी त्या पत्राकडे डोळेझाक करु शकतात, पण म्हणून सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीशांनीही तसेच करावे अशी अपेक्षा कशी करता येईल?
चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीच्या निमित्ताने गुरुवारी त्या न्यायालयात झालेले युक्तिवाद, प्रतियुक्तिवाद तर न्यायालयीन इतिहासांमध्येच नोंदविले जातील. अशी प्रकरणे जेव्हा सर्वोच्च न्यायालयात चर्चिली जातात तेव्हा माध्यमे त्यांचे जवळपास थेट प्रक्षेपण करतात. त्यासाठी वार्ताहरांची साखळीच तयार केली जाते व जणू काय आपण न्यायालयीन कारवाईच पाहत आणि ऐकत आहोत असा प्रेक्षकांना भास होतो. पण असे भाग्य आतापर्यंत एकाही उच्च न्यायालयाला प्राप्त झालेले नाही. ते गुरुवारी दिल्लीतील सीबीआय न्यायालयाला प्राप्त झाले. अगदी क्षणाक्षणाची माहिती दिवसभर टाइम्स नाऊ व रिपब्लिक या वाहिन्यांवरुन दिली जात होती. देशातील पहिल्या क्रमांकाचे कॉंग्रेसी वकील एकीकडे आणि भारताचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता दुसरीकडे असा तो सामना होता. तो ज्यांनी प्रत्यक्ष पाहिला असेल ते खरोखरच धन्य आहेत. म्हणूनच अभिषेक मनु सिघवी यांचा युक्तिवाद संपल्यानेतर कार्तीने मोठ्या झोकात ट्वीट करुन त्यांची भलावण केली. त्यावेळी त्याला काय माहीत की, तुषार मेहतांसारखा शेरास सव्वाशेर दुसरीकडे आहे? न्यायालयात प्रवेश करतांना चिदंबरम यांच्या चेहर्‍यावर छद्मी हास्य होते पण बाहेर पडतांना त्यांचा चेहरा साङ्ग पडला होता व ते झाकण्याचा त्यांचा प्रयत्नही त्यातून दिसत होता.

अर्थात न्यायालयीन लढाई हा या प्रकरणातील एक भाग आहे आणि जोपर्यंत तपास पूर्ण होऊन, आरोपपत्र दाखल होऊन प्रकरणात साक्षीपुरावे, युक्तिवाद होत नाहीत व न्यायालयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत काहीही खरे मानण्याचे कारण नाही. पण तपास यंत्रणांनी चिदंबरम यांना अटक करण्याच्या प्रकरणात आणि त्यांची कोठडी मिळविण्याच्या टप्प्यापर्यंत निर्णायक विजय मिळविला आहे याबद्दल वाद नाही. या प्रकरणी चर्चा सुरु असताना एका कॉंग्रेस नेत्याने ‘जोपर्यत आरोप सिध्द होत नाहीत तोपर्यंत चिदंबरम हे निर्दोषच आहेत’ असा दावा भारतीय न्यायप्रणालीतील तत्वाचा हवाला देऊन म्हटले होते, पण ते चूक आहे. चिदंबरम एकेकाळी देशाचे गृह व अर्थमंत्री होते. त्यांच्या विरुध्द जेव्हा तपासयंत्रणांकडे तक्रारी झाल्या, तेव्हा ते संशयित बनले आणि आता त्यांच्या अटकेनंतर व कोठडीत गेल्यानंतर ते आरोपी बनले आहेत. सी.बी.आय. न्यायालयाने गुरुवारच्या निर्णयात त्यांचा ‘ऍक्युज्ड’ म्हणूनच उल्लेख केला आहे, हे नाकारता येणार नाही.

पण या प्रकरणाला केवळ न्यायालयीन आयामच नाही, तर राजकीय आयामही आहे व तोही तेवढाच महत्वाचा आहे. गेल्या एक वर्षापासून आयएनएक्स मिडिया आणि एअरसेल्स प्रकरणाची चर्चा सुरु आहे. त्यांची चौकशी सुरु आहे व अधिक चौकशीसाठी तपास यंत्रणा कार्ती आणि चिदंबरम यांना तपासासाठी बोलावत आहेत. ते तारखांवर हजर राहतात, पण योग्य माहिती देण्याचे टाळतात. दोघेही वकील असल्याने ती कशी टाळायची हे त्यांना सांगण्याची गरज नाही. म्हणूनच त्यांनी या दोघांच्याही कोठडीचौकशीची मागणी केली. पण प्रत्येक वेळी त्यांना न्यायालयातून दिलासा मिळत गेला. त्यामुळे कॉंग्रेसने ङ्गार गंभीरपणे तक्रार केली नाही. पण गेल्या आठवड्यात दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज ङ्गेटाळला आणि तिला या प्रकरणाचे गांभीर्य कळले. हे प्रकरण कुठपर्यंत जाऊन पोचू शकते याची तिला भीती वाटू लागली. म्हणूनच ती चिदंबरम यांना केवळ निष्णात वकील देऊनच थांबली नाही, तर प्रत्यक्षपणे चिदंबरम यांच्या बाजूने मैदानात उतरली. राजकीय हस्तक्षेपाचे आरोप करू लागली. दिल्ली उच्च न्यायालयानेच तो आरोप ङ्गेटाळला याकडे लक्ष द्यायलाही तिला वेळ मिळाला नाही.

२७ तासांच्या भूमिगत अवस्थेनंतर चिदंबरम यांनी कॉंग्रेस महासमितीत प्रकट होणे, पत्रकारांना संबोधित करणे हे यासंदर्भात खूप बोलके आहे. राहुल आणि प्रियंकापासून सर्वांनी चिदंबरम यांच्या पाठीशी उभे राहणे पसंत केले. चिदंबरम यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तपास यंत्रणांनी त्यांच्याविरुध्द भरपूर पुरावे गोळा केले आहेत. त्यामुळे चिदंबरम यांना पाठिंबा म्हणजे भ्रष्टाचाराला पाठिंबा असा संदेश लोकांपर्यंत जाऊ शकतो याचे भानही त्यांना राहिले नाही. आपल्या नेत्याला दिलासा देण्यासाठी त्याला नैतिक पाठबळ देणे वेगळे आणि त्याच्या अहारी इतक्या स्पष्टपणे जाणे वेगळे. कारण कायदेशीर लढाई त्या नेत्यालाच लढावी लागत असते. पण तेवढे भानही कॉंग्रेसला राहिले नाही. जणू काय या घोटाळ्यातील पैसे कॉंग्रेसच्या खजिन्यातच जमा झाले आहेत एवढ्या तीव्रतेने ती चिदंबरम यांच्यासोबत राहिली आहे. त्याचे राजकीय परिणाम होणे अपरिहार्य आहे.
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे यावेळी कॉंग्रेसचा एकही मित्र पक्ष चिदम्बरम यांच्या मदतीला धावलेला नाही. आतापर्यत बहुतेक विरोधी पक्ष कॉंग्रेसला साथ देण्याचा प्रयत्न म्हणा वा देखावा म्हणा, भासवत होते पण यावेळी शरद पवार, ममता बॅनर्जी, स्टॅलिन, चंद्रबाबू, लालुपुत्र, केजरीवाल, सीताराम येच्युरी वा डी.राजा यांच्यापैकी एकानेही चिदम्बरम यांच्यावर अन्याय होत असल्याचा गळा काढला नाही. हरयाणा प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षाने तर या कारवाईचे समर्थन केले आहे. त्यामुळे संपूर्ण कॉंग्रेस कदाचित नाही, पण कॉंग्रेसमधले ल्युटियन्स तेवढे उघडे पडले आहेत व तेच या प्रकरणाचे खरे महत्त्व आहे.अर्थात ही मंडळी इतक्या सहजपणे स्वस्थ बसायची नाहीत, पण प्रकरण न्यायालयात चघळत ठेवणे एवढेच त्यांच्या हातात आहे.