मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर तोडगा निघण्याची शक्यता
फोंडा मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून आपण भारतीय जनता पक्षाचे काम पुढे नेत आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळण्याची आशा होती; पण पक्षश्रेष्ठींनी रितेश नाईक यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे पक्ष कार्यकर्ते नाराज बनले आणि आपल्याला देखील त्याचा धक्का बसला. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी कार्यकर्ते घरासमोर जमले होते. यासंबंधी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे राज्यात परतल्यानंतर चर्चा करून तोडगा निघण्याची शक्यता असल्याची माहिती नगरसेवक विश्वनाथ दळवी यांनी दिली.
भाजपने रितेश नाईक यांना फोंड्यातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी विश्वनाथ दळवी यांच्या घरासमोर एकत्रित येऊन त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. पक्षाचा निर्णय मान्य करावा लागतो. पक्षाने घेतलेल्या निर्णयामुळे कार्यकर्ते नाराज झाले, तरी पक्षाचा निर्णय मान्य करावा लागणार असल्याचे विश्वनाथ दळवी यांनी सांगितले.