हरवत चाललेली माणुसकी!

0
2928

– रश्मिता राजेंद्र सातोडकर

भूतलावर सर्व गोष्टी निर्माण करताना देवाने माणूसदेखील निर्मिला आणि या मानवाला सगळ्या प्राणीमात्रांपेक्षा कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला मेंदूदेखील दिला. आपण २१ व्या शतकात प्रवेश केला आणि गेल्या दशकापासून ते आत्तापर्यंत आम्ही आमचा देदीप्यमान विकास केलेला आहे. पण हा विकास होत असताना खरंच या माणसाला माणूसपण राहिलंय का? हा प्रश्‍न मनामध्ये मात्र थैमान घालू लागला आहे.अमानुष कृत्याचं दर्शन आपल्याला वृत्तपत्र व वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा डोळ्यांसमोर येतं तेव्हा मन अस्वस्थ होऊन जाते. बलात्कारासारखं निंदनीय कृत्य, स्त्रीयांवरील वाढत चाललेले अत्याचार, माणुसकीच्या नावाला काळीमा फासणार्‍या या सर्व गोष्टी कधी थांबणार आहेत? म्हणूनच आजची स्त्री अबला की सबला हा प्रश्‍नदेखील निरुत्तरीत आहे. प्रत्येक माणूस विचारी असतो. माणसाला मेंदू असतो अन् त्या मेंदूत अक्कल ही असतेच. पण त्या अकलेचं आज खोबरं झालेलं आहे.

आपल्याला हव्या हव्या असलेल्या गोष्टी आज आपल्या पायांजवळ लोटांगण घालीत असतात. अशा सुखासीन माणसांना रस्त्यावर भीक मागून पोट भरणारी बालके कशी काय दिसतील? त्यांच्यातही माणूस नावाचा प्राणी आहे हे कसं दिसेल? त्यांचं जीवन कोणी फुलवूच शकणार नाही का? त्याचबरोबर आज अनेकांचे देह व्यसनांनी जखडलेले आहेत. ते मुक्त होऊच शकणार नाहीत का? आणि जर होत असतील तर मग कसे आणि केव्हा?? डॉ. अनिल अवचट (बाबा) यांनी मुक्तांगणामधून हे कार्य सुरू केलेलं आहे. पण अशा मुक्तांगणाची आज गावागावांतून खरी गरज आहे.
माणूस किती जगतो याला महत्त्व नाही तर त्यापेक्षा तो कसा जगतो याला फार महत्त्व आहे. आयुष्यातील खडतर प्रवासाने यश संपादन होत असते. सर्वप्रथम विद्यार्थी घडत असताना शिक्षकांनी त्यांच्यासमोर आदर्श ठेवला पाहिजे. त्याचबरोबर आई-वडिलांनी चांगले संस्कार पेरणे गरजेचे आहे. पालकांनी बेजबाबदार न राहता त्यांच्यामध्ये चांगले विचार बिंबवणे खूप गरजेचे आहे. माणसाची सर्वांत महत्त्वाची गरज नुसते शिक्षण नाही, त्याचे चारित्र्य आहे. नुसतेच पुस्तकी ज्ञान न घेता चारित्र्य संवर्धन होणेही गरजेचे आहे. त्याने स्वत:चे रक्षण होत असते.
आपल्या भारतात अनेक युगपुरुष होऊन गेले, त्याचबरोबर नारीशक्तीनेही आपले अस्तित्व व सामर्थ्य जनमानसात उमटवलं. त्यातलेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, मदर तेरेझा, सावित्रीबाई फुले आदी महान व्यक्ती आहेत. या सर्वांनी स्वत: चंदनाप्रमाणे झिजून इतरांच्या आयुष्याला व इतरांना सुगंध दिलेला आहे. आजही अशा विचारसरणीची माणसं आहेत; पण ती मात्र हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढीच. बाबा आमटे, मंदाकिनी आमटे, महिन्याकाठी गलेलठ्ठ पगार घेऊन ऐश-आरामात घरी बसू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. झिजणार्‍या जीवांना नवजीवन देण्याचं काम त्यांनी आपल्या श्रमातून केलं. याचं कारण अशाच माणसांना माणुसकीतील माणूसपण कळलं होतं. आणि हे जेव्हा प्रत्येक मानवाला कळेल तेव्हा माणुसकी हरवलेला या समाजात खरा माणूस म्हणून ओळखला जाईल.
……….