स्वबळ ते आघाडी

0
42

कॉंग्रेस पक्ष कोणत्याही पक्षाशी युती वा आघाडी करणार नाही, स्वबळावर आगामी गोवा विधानसभा निवडणूक लढणार असे छातीठोकपणे आजवर सांगत आलेले कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडुराव आणि स्थानिक नेते आता समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याची भाषा करेपर्यंत नरमलेले दिसत आहेत. हा परिणाम अर्थातच तृणमूल कॉंग्रेसच्या गोव्यातील आगमनाचा आहे. तृणमूल गोव्यात केवळ आपले राजकीय अस्तित्व निर्माण करण्याच्या उद्देशाने अवतरलेला नाही, तर राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधकांची एकजूट करण्यासाठी आलेला आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ह्या परिस्थितीत स्वबळाचा आग्रह कायम ठेवला तर केवळ मतविभाजनाचीच नव्हे, तर कॉंग्रेस पक्ष एकाकी पडण्याची आणि बाजूला फेकला जाण्याची शक्यता निर्माण झालेली होती. त्यामुळे सर्वांसोबत जाण्याचा शहाणपणाचा निर्णय घेण्यापर्यंत कॉंग्रेस नेतृत्व आलेले आहे. विरोधकांची एकजूट बांधण्याचे श्रेय तृणमूलच्या हाती जाऊ नये आणि राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाची आपली जागा कायम राहावी हाही त्यामागील हेतू आहेच. विरोधकांची एकजूट करण्याचे श्रेय इतरांकडे जाऊ न देता ते स्वतःच्या हाती ठेवले तर इतर पक्षांना जागा सोडण्याच्या बाबतीत आपल्याला अधिक वाव मिळेल हे शहाणपण कॉंग्रेस नेतृत्वाला नक्कीच आहे.
आपले राज्यातील एक प्रमुख पक्ष म्हणून असलेले स्थान अबाधित राखायचे असेल तर येत्या निवडणुकीत अधिकाधिक जागा मिळवून आपले गमावलेले स्थान पुन्हा प्राप्त करण्याची धडपड कॉंग्रेसला करावी लागणार आहे. विरोधी मतांचे विभाजन हा आत्मघात ठरेल. आमदारांची संख्या विचारात घेता कॉंग्रेस आज संभाव्य विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याचा दावा करण्याच्या स्थितीत नाही, परंतु पक्षाचे गोव्यातील आजवरचे स्थान विचारात घेऊन इतर समविचारी पक्षांना त्याला ते स्थान बहाल करावे लागणार आहे. याचे कारण इतर विरोधी पक्षांपेक्षा कॉंग्रेसचे अस्तित्व जवळजवळ सर्व मतदारसंघांमध्ये आहे. त्यांचा पारंपरिक मतदार सर्वत्र आहे.
सर्व भाजपविरोधी पक्षांनी एकत्र लढावे ही आग्रही मागणी कॉंग्रेसचे काही नेते सोडल्यास भाजपविरोधकांकडून सातत्याने होत आलेली आहे. कॉंग्रेसचे काही स्थानिक नेते केवळ स्वार्थापोटी यासंदर्भात तडजोडीला नकार देत आले होते. गोवा फॉरवर्डसारखा गेल्या निवडणुकीत चमकदार कामगिरी करून दाखवलेला अगदी समविचारी पक्ष युतीसाठी हाका मारत असतानादेखील ज्या प्रकारे त्याला खेळवत ठेवले गेले, त्यातून कॉंग्रेसविषयी एक नकारात्मक संदेश जनतेमध्ये गेला आहे. उशिरा का होईना हे शहाणपण कॉंग्रेस नेतृत्वाला आलेले दिसते.
समविचारी पक्षांची आघाडी बनवण्याचा विचार जरी दिनेश गुंडुराव यांनी बोलून दाखवलेला असला तरी प्रत्यक्षात अशी आघाडी गुंफणे हे मुळीच सोपे नाही. विविध पक्षांचे आणि नेत्यांचे राजकीय स्वार्थ तर त्यात दडलेले आहेतच, परंतु अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवारीसंदर्भात तीव्र संघर्ष उफाळण्याची आणि बंडाळीची शक्यताही मोठी आहे. त्यामुळे खरोखरच अशा प्रकारची आघाडी करायची असेल तर नेत्यांतील सामंजस्य आणि तडजोड ह्याच्याविना ते कदापि शक्य होणार नाही. कॉंग्रेस नेतृत्वाची त्याला तयारी आहे का याचा विचार आधी केला जावा. अन्यथा युतीचा घोळ घालून आणि कालापव्यय करून शेवटच्या क्षणी सर्वांचा घात केल्याचे पातक माथी आल्यावाचून राहणार नाही.
मुळात निवडणूकपूर्व आघाडीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आता फारच थोडा वेळ हाती उरलेला आहे. कॉंग्रेससोबत येण्यास गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेस राजी होईल, परंतु श्रेष्ठत्वाचा अहंकार कॉंग्रेसला बाजूला ठेवावा लागेल. सर्वत्र स्वबळावर लढण्यासाठी जोरदार तयारी केलेला आम आदमी पक्ष या आघाडीत सामील होईल की नाही साशंकता आहे. मगो पक्ष हा कितीही झाले तरी भाजपचा समविचारी पक्ष आहे. त्यामुळे तो शेवटच्या क्षणी भाजपशी हातमिळवणी करू शकतो, परंतु एकूण वातावरण सरकार विरोधात आहे असे जाणवले तर विरोधकांच्या बाजूनेही राहू शकतो. विरोधकांचे एकत्र येणे कठीण जरूर आहे, परंतु ते एकत्र आले तर भाजपासाठीही येणारी निवडणूक कठीण बनेल हेही तितकेच खरे आहे!