सेवानिवृत्तीनंतरची आर्थिक तजवीज

0
201
  • शशांक मो. गुळगुळे

तुम्ही पेन्शनधारक असाल तर महिन्याला निश्‍चित ठरावीक उत्पन्न मिळू शकते. पेन्शन वृद्धांना स्वावलंबी बनवते. म्हणून वृद्धापकाल स्वावलंबी असण्यासाठी ‘पीएफ आहे ना, बस झाले!’ हा विचार सोडून या आणि सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी पुरेशी तरतूद करा.

पगारदारांच्या पगारातून दरमहा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी- ज्याला संभाषणात ‘पीएफ’ म्हणून संबोधले जाते, तो- कापला जातो व त्यात तितकीच रक्कम मालकही घालतो व सेवानिवृत्तीनंतर हा निधी सेवानिवृत्तीपश्‍चात जीवन जगण्यासाठी परत मिळतो. नोकरीत असताना मृत्यू झाल्यास हा निधी कायदेशीर वारसास मिळतो. पण सेवानिवृत्तीनंतरचे जीवन जर सुसह्य व्हावे, स्वावलंबी असावे असे वाटत असेल तर नुसती ‘पीएफ’मधली गुंतवणूक पुरेशी नाही. वृद्धापकाली वाढीव वैद्यकीय खर्च, प्रवास खर्च व अन्य खर्च भागवून सुस्थितीतील जीवन जगायचे असल्यास फक्त पीएफवर अवलंबून चालणार नाही.

‘पीएफ’ हे पारंपरिक गुंतवणुकीचे साधन आहे. पीएफमधून मिळालेला निधी सेवानिवृत्तीदार बँकेत ठेवतात. पण देशाच्या काही आर्थिक कारणांस्तव बँकाचे ठेवींवरील व्याजदर फारच कमी झाले आहेत. त्यामुळे जे नुसत्या पीएफवर अवलंबून आहेत अशा व्यक्ती आता आर्थिक अडचणीत आल्या आहेत. पीएफ ही अत्यंत सुरक्षित गुंतवणूक आहे. ही केंद्रशासनाची योजना आहे. संपूर्णतः करमुक्त आहे. यावर मिळणारे व्याज, या खात्यात जमा होणारे व्याज व मुदतीअंती मिळणारी रक्कम पूर्णतः करमुक्त आहे.

पीएफ हे ‘डेट प्रॉडक्ट’ आहे. पीएफमध्ये जमा होणारा निधी हा प्रामुख्याने सरकारी कर्जरोखे, सरकारी बॉण्डस् यांत गुंतविला जातो म्हणून ‘डेट प्रॉडक्ट’ आहे. डेटमधील गुंतवणुकीवर जोखीम कमी असते, पण परतावाही कमी मिळतो. पीएफचा फार कमी प्रमाणात वाटा शेअर वाजारात गुंतविला जातो. पीएफचा निधी जर फार मोठ्या प्रमाणात शेअरबाजारात गुंतविला गेला तर चलनवाढीवर मात करणारा परतावा मिळू शकेल.
पूर्वी पीएफचा निधी शेअरबाजारात गुंतविलाच जात नसे. २०१५ पासून काही प्रमाणात निधी शेअरबाजारात गुंतविला जाऊ लागला. २०१५ मध्ये अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत निधीत जितकी वाढ होईल त्याच्या ५ टक्के रक्कम शेअरबाजारात गुंतविण्यास परवानगी देण्यात आली. २०१७ मध्ये शेअरबाजारात १५ टक्क्यांपर्यंत निधी गुंतविण्याची परवानगी देण्यात आली. पीएफचा निधी एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) यात सेन्ट्रल पब्लिक सेक्टर एन्टरप्राईजेस (सीपीएमई), इटीएफ व भारत २२ इटीएफ यांच्यात गुंतविला जातो. म्हणजे सरकारी कंपन्यांत, सार्वजनिक उद्योगातील कंपन्यांच्या शेअरमध्ये प्रामुख्याने गुंतविला जातो. खाजगी उद्योगांच्या शेअरमध्ये गुंतविला जात नाही. जाणकारांच्या मते चांगल्या खाजगी उद्योगांच्या शेअरमध्ये पीएफचा निधी गुंतवणूक करण्यास परवानगी मिळाली तर हा निधी चलनवाढीहून जास्त परतावा भविष्य निर्वाह निधीधारकांना देऊ शकेल.

२०१९-२० या आर्थिक वर्षात पीएफवर मिळणारा व्याजदर ८.५० टक्के होता, तर २०१८-२०१९ या वर्षी तो ८.६५ टक्के होता. व्याजदर ठरविण्यासाठी एक ‘बॉडी’ आहे. अगोदरच्या वर्षाहून निधीत किती वाढ झाली व त्या आर्थिक वर्षात किती उत्पन्न मिळाले याचा विचार करून ही ‘बॉडी’ पीएफ त्या आर्थिक वर्षासाठी किती व्याजदर देऊ शकतो याची शिफारस केंद्रीय अर्थखात्याला करते. या बॉडीवर नोकरदारांचे, मालकांचे व शासनाचे प्रतिनिधी असतात.
पगारातून पीएफ कापला जाण्याचे प्रमाणही फार कमी आहे. दर महिन्याला पगाराच्या १२ टक्के रक्कम कर्मचार्‍याच्या पगारातून कापली जाते व तितकीच रक्कम मालकाकडून समाविष्ट केली जाते. जर कर्मचार्‍याचा पगार रुपये पंधरा हजारांपेक्षा जास्त असेल तर मालकाला जास्त पगाराच्या १२ टक्के हिस्सा देण्याचे बंधन नाही. अशावेळी १५ हजार रुपयांहून अधिक पगार असणार्‍याच्या पीएफ खात्यात मालकाकडून फक्त १८०० रुपये जमा होणार. त्यामुळे सेवानिवृत्तीच्या वेळी फार मोठी रक्कम जमा होत नाही. काही आस्थापनांत, कंपन्यांत ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी योजना असते. यात मालक सहभागी नसतात. कर्मचार्‍याच्या पगाराच्या ८.३३ टक्के रक्कम या खात्यात जमा होते व पीएफवर जेवढे व्याज मिळते तेवढेच व्याज या ऐच्छिक पीएफवर मिळते. पीएफवर अजूनही बँकांच्या किंवा पोस्टाच्या बचतखात्यापेक्षा जास्त दराने व्याज मिळत आहे.

काही काही कंपन्यांत व सरकारी नोकरीत सेवानिवृत्तीच्या वेळी ‘ग्रॅज्युईटी’ दिली जाते. पण ही सोय खाजगी कंपन्यांत नाही. पी.एफ. हा हक्क आहे, पण ‘ग्रॅज्युईटी’ हा हक्क नाही. नोकरीत तुमचे वर्तन, तुमची वागणूक, तुमचा रेकॉर्ड चांगला नसेल तर अशा कर्मचार्‍याला ‘ग्रॅज्युइटी’ नाकारण्याचा पूर्ण अधिकार मालकाला आहे.
पीएफवर अवलंबून वृद्धापकाल सुसह्य होणार नाही व आता ऍन्टी-बायोटिक्स औषधे व प्रगत वैद्यकीय शास्त्र, तसेच खाण्यापिण्याच्या पद्धतीत झालेले बदल यामुळे आयुष्य वाढलेले आहे. ६० व्या वर्षी निवृत्त झालेली व्यक्ती जर ८५ व्या वर्षी वारली तर त्याला २५ वर्षांसाठी आर्थिक तरतूद करायला हवी. प्रत्येकाला सेवानिवृत्तीनंतर २० ते ३० वर्षे हातात पुरेपूर पैसे असतील अशी तरतूद करायला हवी.

बँकांपेक्षा जास्त व्याज देणार्‍या गुंतवणूक योजना वरिष्ठांसाठी उपलब्ध आहेत. त्या म्हणजे- वरिष्ठ नागरिक बचत योजना- ७.४ टक्के व्याज, प्रधानमंत्री वय वंदन योजना- ७.४ टक्के व्याज, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ)- ७.१ टक्के व्याज, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना- ६.६ टक्के व्याज. दीर्घमुदतीचा, सुरक्षित, करमुक्त, प्राप्तीकर कायदा नियम ८० सी अन्वये करसवलत देणारा ‘प्रॉजेक्ट’ म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीपीएफ. नोकरीत असताना सुमारे ४५ व्या वर्षी हे खाते उघडावे. या खात्याची मुदत १५ वर्षे आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीच्या वेळी या खात्याची मुदतपूर्ती होईल आणि हातात पीएफ, शिवाय पीपीएफची भरभक्कम रक्कम येईल.
सेवानिवृत्तीनंतर येणारे सगळे पैसे एकत्र करून त्यानंतर ते कुठे गुंतवायचे याचा निर्णय घ्यावा. मुलांना-मुलींना लगेच पैसे वाटू नयेत. असे पैसे वाटणार्‍यांना बरेच वाईट अनुभव आलेले आहेत. तरुणपणी शेअरबाजारात ट्रेडिंग करावे. त्यावेळी जोखीमही घेता येते व नुकसान सोसण्याची मनःस्थितीही असते. शेअरबाजारच्या ट्रेडिंगमध्ये तरुणपणी भरपूर पैसे कमवून म्हातारपणी ऐषोआरामाचे जीवन जगलेलेही भरपूर आहेत. पण शेअर बाजारात ट्रेंडिंग करताना शेअरबाजारचा अभ्यास हवा. शेअरबाजारला पर्याय म्हणून म्युच्युअल फंड योजनांत गुंतवणूक करण्यासही हरकत नाही. शेअरबाजाराच्या ट्रेडिंगमध्ये चांगला परतावा मिळतो याचा पुरावा म्हणजे फ्रँकलिन इंडेक्स एनएसई निफ्टी फंडने गेल्या २० वर्षांत १३ टक्के परतावा दिला.

जीवनमानात सतत होत असलेले बदल, असाध्य रोगाची/रोगांची बाधा, हॉस्पिटलची येणारी फुगीर बिलं, चलनवाढीमुळे होणारी महागाई… परिणामी प्रत्येक गोष्टीसाठी मोजावी लागणारी वेळोवेळी किंमत! या सर्वांवर मात करण्यासाठी नोकरीत असतानाच योग्य निर्णय घेऊन, योग्य गुंतवणूक करून, सेवानिवृत्तीनंतर मिळणार्‍या निधीची योग्य गुंतवणूक करून सेवानिवृत्तीनंतर हातात पुरेसा पैसा असावा यासाठी दक्ष राहावे. सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक कारणांचा विचार ४० ते ४५ व्या वयापासून करावा. आपल्याला देवाने भरपूर आयुष्य दिले आहे असा सकारात्मक विचार करून आर्थिक निर्णय घ्यावेत. सेवानिवृत्तीनंतर शेअरबाजारातील ट्रेडिंग पूर्ण न थांबवणारेही बरेच आहेत. पण या वयावर हाराकिरी करू नये. विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. सध्या तरी शेअरबाजार वर आहे.
सेवानिवृत्तीनंतर सरकारी कर्मचार्‍यांना पेन्शन मिळते, पण खाजगी कंपन्यांत ही सोय नाही. अशांसाठी नॅशनल पेन्शन सिस्टीम (एनपीएस), ‘अटल’ पेन्शन योजना या सरकारपुरस्कृत पेन्शन योजना आहेत. कमी उत्पन्नधारकांसाठी अटल पेन्शन योजना चांगली आहे. याशिवाय विमा कंपन्यांच्याही पेन्शन योजना आहेत. तुम्ही पेन्शनधारक असाल तर महिन्याला निश्‍चित ठरावीक उत्पन्न मिळू शकते. पेन्शन वृद्धांना स्वावलंबी बनवते. म्हणून वृद्धापकाल स्वावलंबी असण्यासाठी ‘पीएफ आहे ना, बस झाले!’ हा विचार सोडून या आणि सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी पुरेशी तरतूद करा.