सामान्य रोगातील हिताहार

0
227
  •  डॉ. भिकाजी घाणेकर

एका टोकाला एखाद्या व्यक्तीला विशिष्ट खाद्यपदार्थ बाधक ठरून उद्भवणारा ‘ऍलर्जी’सारखा रोग हा केवळ तो बाधक पदार्थ वर्ज्य करूनच बरा होतो. तर लठ्ठपणा, अपुर्‍या आहारामुळे आलेली कृशता, अथवा विशिष्ट पोषणद्रव्ये न मिळाल्याने न्यूनताजन्य रोग बरे होण्यात आहाराचा वाटा मोठा व महत्त्वाचा असतो.

आपल्या दैनंदिन व्यवहारात आहाराचे महत्त्व मोठे आहे. आपले आरोग्य, शक्ती व सुख यावरच अवलंबून असते. आहारात कमी जास्त बदल झाल्यास शारीरिक व क्वचित मानसिक रोगही होऊ शकतात. तसेच विशिष्ट रोगांत रोजच्या आहारात बदल करून पथ्याचे खावे लागते. बहुतेक सर्व रोगांत खाण्यापिण्यात बदल करणे अभिप्रेत असले तरी पथ्य आणि रोगनिवारण यातील विशिष्ट संबंध रोगानुसार मीअधिक असू शकतो. एका टोकाला एखाद्या व्यक्तीला विशिष्ट खाद्यपदार्थ बाधक ठरून उद्भवणारा ‘ऍलर्जी’सारखा रोग हा केवळ तो बाधक पदार्थ वर्ज्य करूनच बरा होतो. तर लठ्ठपणा, अपुर्‍या आहारामुळे आलेली कृशता, अथवा विशिष्ट पोषणद्रव्ये न मिळाल्याने न्यूनताजन्य रोग बरे होण्यात आहाराचा वाटा मोठा व महत्त्वाचा असतो. मधुमेहासारख्या विकारात औषधापेक्षा अन्नाचेच महत्त्व असून ज्यात पथ्याहाराचे महत्त्व अल्प आहे. असे रोग दिवसेंदिवस वाढत, मोठा धोका निर्माण झाला आहे. उदाहरणार्थ रक्तदाब वाढणे, हार्ट ऍटॅक (काळजाचा), मेंदूचा ‘स्ट्रोक’, मूत्रपिंडाचे आजार, यकृताचे आजार, हाडांचे इत्यादी.
१. ‘फ्ल्यू’सारख्या अल्पकालीन ज्वरातील आहार ः-
बहुतेक सर्व तापांत उष्मांक, पाणी, प्रथिने, खनिज द्रव्ये, जीवनसत्त्वे, इ. शरीराची गरज वाढलेली असते. रोग्याला पूर्ण विश्रांती देऊन पुरेसे पाणी, दूध, चहा, कॉफी, बर्लीपाणी, संत्री, मोसंबीचा रस, लिंबूपाणी इ. रूपाने तापातील पाण्याची वाढती गरज भागवावी. दर तीन- तीन तासांनी थोडे थोडे खाण्यास दिल्यामुळे खाल्लेले नीट पचते. वाढत्या उष्मांकांची गरज ग्लुकोज किंवा साखर देऊन पुरी करावी. ताप मामुली असल्यास नेहमीच्या आहारातील वरण भात, भाजी, फळ, सवयीनुसार थोडे फार भुकेप्रमाणे खाण्यास हरकत नाही. तापाबरोबर जुलाबही होत असेल तर फक्त द्रव्य आहारच घ्यावा. कडधान्य, सूप, गोड ताक, भाताची पेज इ. प्यावे.

२. विषमज्वरातील आहार – ‘‘टायफाईड’’ (दिसांचो जोर- कोंकणी) दूषित पाणी आणि दूषित अन्न यामुळे हा रोग व्हायचा. आता या रोगावर प्रभावी औषध व अत्यंत प्रभावी लस (व्हॅक्सीन) उपलब्ध असतात. हा रोग जास्त प्रमाणात होत नाही. ही लस फक्त कुठेही हा रोग आढळल्यास त्याच ठिकाणी करण्यात येते.

३. अतिसार विकारातील आहार ः-
हा विकार बालकात जास्त प्रमाणात आढळतो. याची लागण जी मुलं ९ महिन्यांपूर्वी जन्मतात तसंच ज्यांना आईचे दूध, स्वच्छता, कुपोषण इत्यादी उपलब्ध नसेल त्याच मुलांमध्ये हा विकार जास्त प्रमाणात आढळतो.
अतिसार सुरू झाल्यावर शक्य तितक्या लवकर ओ.आर.एस. सुरू करावे. त्याचे पाउच फार्मसीत मिळतात. अंगणवाडी शिक्षिका (आशा) ः हे पावडर पाण्यात मिसळून थोड्या थोड्या वेळाने चमच्याद्वारे मुलांना द्यावे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)े याला अतिसारावर एक लस- वॅक्सीन म्हणून संबोधले आहे.
ओआरएस उपलब्ध नसेल तर एका कपात किंवा ग्लासांत शुद्ध नितळ पाणी घ्यावे. त्यात दोन चमचे (लहान) साखर व चिमूटभर मीठ घालून त्याचा घोळ करावा. हा घोळ ओआरएस सारखाच द्यावा. याच औषधाने अतिसार बरा होतो.
जर उलटी येत असेल तर मात्र डॉक्टरला दाखवून त्यावर इलाज करावा. अंगणवाडी शिक्षिकांना या संबंधी ३ महिने प्रशिक्षण देण्यात येते. प्रथमोपचार, लस, अन्नाची माहिती, आरोग्य शिक्षण इत्यादी.

४. काविळीच्या आजारातील आहार ः-
सांसर्गिक यकृतदाह हे सामान्यतः या विकाराचे कारण असते. आजार्‍याची भूक कमी होणे, ओकार्‍या, मळमळ, अरुची ही लक्षणे दिसतात. त्यामुळे रुचकर, तोंडाला चव आणणारे पातळ पदार्थ अल्प प्रमाणात द्यावे. फळांचा रस, उसाचा रस, ग्लुकोज, सरबत असे पदार्थ द्यावे. ओकारी येत असेल तर डॉक्टरला दाखवावे. काहीवेळा हॉस्पिटलात नेऊन तिथे ग्लुकोजची ड्रीप- सलाईन द्यावी लागते.
चहा, कॉफी तसेच मसालेदार, तेलकट, लोणची, चटण्या, पापड चमचमीत पदार्थ देऊ नये.

५. बद्धकोष्ठ विकारातील आहार ः-
मलावरोधाची तक्रार सामान्यतः आढळणारी असून अशी अनेक लक्षणे व भावना बद्धकोष्ठ जडलेल्या व्यक्तीत आढळतात की त्यांचा व शौचास साफ न होणे याचा सुतराम संबंध नाही. वेळेवर नियमित शौचास जाण्याची सवय महत्त्वाची आहे. शौचास जाण्याच्या सवयीत फरक झाला तर लगेच तिकडे लक्ष दिले पाहिजे. अनेक रोगांत मलावरोध हे एक लक्षण आढळते. हे रोग वगळल्यास इतरत्र आढळलेला हा विकार आहारातील भरभरीतपणाच्या अभावामुळे उद्भवला आहे असे मानावे. अशा व्यक्तींनी रोजच्या आहारात भरपूर पालेभाज्या, फळफळावळ, कच्च्या कोशिंबिरी, काकडी, पेरू, टोमॅटो, गाजर, कांदा, मुळा असे पदार्थ शक्यतो कच्चेच म्हणजे न शिजवता खावेत. चहा- कॉफी, दूध, दुधाचे पदार्थ (खवा, पेढे, बर्फी इत्यादी वर्ज्य करावे)े. मात्र दिवसातून तीन वेळा गरम पाणी प्यावे. त्या पाण्यात थोडा मध, मीठ, लिंबूही घालावे. शक्यतो सकाळच्या जेवणात केवळ उकडलेल्या भाज्याच खाव्यात. रोज ठरलेल्या वेळी शौचास जावे. टाळाटाळ करू नये.

६. जठर-व्रण विकारातील आहार (पेप्टीक अल्सर वा ड्युओडेनल)
जठरात किंवा पक्वाशयात व्रण होऊ शकतो. हे दोन्ही प्रकार पथ्यपाण्याच्या दृष्टीने सारखेच आहेत. या रोगात मुख्यतः दाह उत्पन्न न करणारा साधा आहार घ्यावा. तोही थोडा थोडा व अर्थातच चार-पाच वेळा घ्यावा म्हणजे त्यायोगे आम्लता काबूत राहते. या विकारात दूध हे सर्वोत्तम व आदर्श असून ते भरपूर घ्यावे.
उकडलेले बटाटे, दूध, भोपळा, पिकलेली केळी, शिरा, उकडलेले सफरचंद इ. आलटून पालटून खावे, चहा, कॉफी टाळावी. सिगरेट, विडी, घुटका, दारू इ. व्यसने म्हणजे विष आहे.

७. पचनेंद्रियाविषयी काळजी ः-
१. समतोल आहार नियमितपणे घ्या. फळे व भाजीपाला आहारात नित्य असू द्या. त्यामुळे जीवनसत्त्वे तर मिळतीलच पण पचनेंद्रियांच्या स्नायूंना आकुंचनाची चालना देण्यासाठी आवश्यक असलेली काष्ठतंतूसारखी
(सेल्युलोज) भरभरीत द्रव्येही त्यामुळे उपलब्ध होतील.
२. फार मसाल्याचे व तेलकट पदार्थ टाळा.
३. माश्या व धूळ यांपासून संंरक्षण करण्यासाठी अन्नावर नेहमी झाकण ठेवा.
४. खाण्यापिण्यापूर्वी हात नेहमी साबणाने स्वच्छ धुवा.
५. ताजे व गरम अन्न खा.
६. जेवताना आग्रह टाळा.
७. नियमित वेळीच खाण्याची सवय ठेवा.
८. पचनास मदत व्हावी व मलावरोध टळावा म्हणून पाणी व इतर पेये योग्य प्रमाणात पिण्याचा नियम ठेवा.

अन्नभेसळीचे दुष्परिणाम –
वाढत्या लोकसंख्येबरोबर सतत चालू असलेली अन्नधान्य टंचाई व वाढती महागाई यांना लोकांना सतत तोंड द्यावे लागत आहे. त्याच्या बर्‍याच दुष्परिणामांपैकी एक महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे सतत वाढत्या प्रमाणांत होत असलेली अन्नभेसळ. अपुर्‍या व निकस आहाराचे दुष्परिणाम मुले व तरुण मंडळींच्या शरिरवाढीत व आरोग्यात मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेतच. या जोडीला आता ही वाढती अन्नभेसळ. ही भेसळ केल्यावर स्वस्त वाटणार्‍या या पदार्थामुळे भेसळीसाठी वापरलेला माल हा काही वेळा विषारी असू शकतो व त्यामुळे आरोग्य बिघडण्याच्या संभव असतो.
भेसळीची काही उदाहरणे ः पूर्वीच्या काळी घडलेली – १. बेसनांत केसरी ऊर्फ लाखी डाळीच्या पिठाची भेसळ करण्यात येते. ही डाळ सतत काही महिने खाली तर त्यामुळे ‘लॅथिरिझम’ नावाचा रोग होतो. या रोगाने ‘पंगूपणा’ येतो. पाय लुळे पडतात. त्यावर औषधे नाही हे महत्त्वाचे.
२. दुधात घट्टपणा व वजन आणण्याकरता रताळ्याचे पीठ मिसळण्यात येते.
३. दुधाची बासुंदी अगर रबडी यात व लस्सीमध्ये टीपकागदाचे तुकडे मिसळण्यात येतात.
४. महाग विकल्या जाणार्‍या तेलात कमी प्रतीचे व स्वच्छ तेल मिसळण्यात येते.
अन्नभेसळ करणे हा सामाजिक गुन्हा व नैतिक पाप आहे. अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ साली पार्लमेंटमध्ये पास करण्यात आला.
कायद्याची व नियमांची आर्थिक परिस्थितीनुसार अंमलबजावणी करतात. त्यासाठी विशिष्ट संख्येत भेसळ प्रतिबंधक अधिकारी किंवा फूड-इन्स्पेक्टर नेमण्यात आले आहेत.

मसाले, लोणची, पापड, मिरची पूड, सुगंधी सुपारी, हळद, तूप, लोणी या पदार्थावर जास्त प्रमाणात भेसळ होत असते.
अन्नभेसळीच्या थोडाही संशय आल्यास स्थानिक आरोग्यखात्याचे किंवा अन्नतपासणी करणार्‍या अधिकार्‍यांचे लक्ष वेधावे.