सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधानांच्या अनुपस्थितीवरून खर्गे यांची टीका

0
23

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 नागरिकांना प्राण गमवावे लागल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत केली जात आहे. विरोधकांनीही या प्रकरणात सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 56 इंचाच्या छातीचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने जी सर्वपक्षीय बैठक बोलावली, त्या बैठकीला पंतप्रधानच गैरहजर होते हे देशाचे दुर्दैव आहे, अशी टीका खर्गे यांनी केली.

जयपूरमध्ये काल संविधान वाचवा रॅली काढण्यात आली, त्या दरम्यान खर्गे बोलत होते. आमच्यासाठी देश प्रथम येतो. धर्म, जात किंवा पक्ष नंतर आहे. आपण सर्वांनी देशासाठी एकता दाखवली पाहिजे. तसेच मोदी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उपस्थित राहायला हवे होते. या हल्ल्यानंतर सरकारने कोणतेही पाऊल उचलले तरी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय हितासाठी त्यांच्यासोबत उभा राहील, असेही खर्गे यावेळी म्हणाले.

आमची अशी इच्छा होती की या बैठकीत पंतप्रधानांनी त्यांच्या योजनेबद्दल सांगावे आणि लोकांकडून सूचनाही घ्याव्यात. याशिवाय, आम्ही पक्षाची बैठकही बोलावली, त्यामध्ये आम्ही सर्वजण सरकारसोबत असल्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे खर्गे म्हणाले. आम्ही सरकारला असेही सांगितले की या कठीण काळात, आपण सर्वजण एकत्र येऊ आणि सरकार जे काही पाऊल उचलेल त्याला पाठिंबा देऊ. पण हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे की सर्व पक्षांचे लोक त्या बैठकीला गेले, पण पंतप्रधान मोदी आले नाहीत, हे लाजिरवाणे आहे. जेव्हा देशाचा स्वाभिमान दुखावला जातो तेव्हा तुम्ही बिहारमध्ये निवडणुकीसाठी भाषणे देता; मात्र दिल्लीत महत्त्वाच्या बैठकीला येऊ शकत नाही. दिल्ली बिहारपासून लांब आहे का? तुम्ही मोठमोठ्या बाता मारता, माझ्याकडे 56 इंचाची छाती आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, मी लढेन, मी घरात घुसेन. तुम्ही त्या दिवशी बिहारच्या ऐवजी सर्वपक्षीय बैठकीत आला असता, तर सर्वांना कळले असते की तुमचे नियोजन काय आहे, तुम्ही काय करणार आहात, तुम्हाला आमच्याकडून कोणती मदत हवी आहे. सर्व पक्षाचे लोक मदत करायला तयार आहेत, तरीही तुम्ही तिथे लक्ष देण्याचा प्रयत्नही केला नाही, असेही खर्गे म्हणाले.