सत्तरीतला मित्रमेळा

0
237
  • श्रीकृष्ण दामोदर केळकर (मु. नानोडा-अस्नोडा)

 

खरं तर डॉ. आशीर्वाद व आशूने आपल्या वडिलांना त्यांच्या जीवनातील एक अत्युच्च क्षण अनुभवण्यास दिला होता. अरविंदना आणखी बळ मिळाले. नवजीवन जीवन जगण्याचे… बाकीच्या वर्गबंधूंच्या वाढदिवसाला जाण्याचे… एक नवीन उत्साह… एक नवीन आशा…

देव्हार्‍यातल्या समईमधली ज्योत मंद करून शयनगृहात येत असताना मधल्या सगळ्या लाईटस् बंद करून आली. दिवसभराच्या कामाच्या दगदगीने कॉटवर अंग ठेवले, तोच मानेखाली हात घालत हळूवारपणे त्याने आपल्या बाहूपाशात खेचले.

‘‘आशू… ए आशू…ऽऽ एक कल्पना आली आहे!!’’

‘‘हे बघा, कल्पना बिल्पना काही नको, मला जाम झोप येत आहे.’’

‘‘अगं, काय ते ऐकून तरी घेशील?’’

‘‘हं सांगा!’’

‘‘अगं, बाबांचा वाढदिवस येतो आहे पुढच्या महिन्यात, तो सुद्धा सत्तरावा!’’

‘‘अरे व्वा! खरंच, बाबा सत्तर वर्षांचे झाले?’’

‘‘होय तर, पण तो आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने साजरा करुया का?’’

‘‘हो ना… करुया की. सकाळी शहरातल्या वृद्धाश्रमाला भेट, मग दुपारी अनाथाश्रमाला भेट आणि संध्याकाळी मंदिरात हरिपाठाला सर्वजण जमतात तिथे आपण छानशी पार्टी देऊया.. हो की नाही….?’’

‘‘अगं हे असं सर्वचजण करतात. पण मला हे थोडंसं वेगळंच करायचं आहे.’’

‘‘म्हणजे??’’ हळूहळू निद्रादेवी दूर व्हायला लागली.

‘‘आम्ही आमच्या बाबांचा सत्तरावा वाढदिवस त्यांच्या शाळेमधल्या दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांबरोबर साजरा करायचा आहे.’’

‘‘काय?’’

‘‘अगं होय. ही फक्त कल्पना तुला सांगितली. आता तुझ्या हिरव्या की लाल निर्देशावर अवलंबून आहे.’’

‘‘अरे व्वा! खूपच चांगली कल्पना आहे तुझी!! मला ही तुझी कल्पना खूप आवडली.’’ असं म्हणून संपूर्ण शयनगृह हिरवंगार करून टाकलं.

दुसर्‍या दिवशी सकाळी…

डॉ. आशीर्वाद लोकसेवेसाठी आपल्या क्लिनिकमध्ये गेले. घरी आशूच्या मनात तेच तेच विचार येत होते. बाबांचा वाढदिवस.. तोसुद्धा त्यांच्या दहावीच्या विद्यार्थ्यांबरोबर.

‘‘ए आशू, काही मदत करू का?’’

‘‘नको बाबा, हं जरा तो मला तुपाचा डबा द्या बरं.’’

‘‘हो देतो देतो. संपूर्ण आयुष्य काम करण्यात गेलं. सूनबाई, असं रिकामं राहवत नाही.’’

‘‘हो बाबा’’, असं म्हणून चपातीवर तूप लावून सुरळी करून दिली. ‘‘बाबा तुम्हाला साखर हवी असेल तर बाजूच्या डब्यात आहे.’’

‘‘अगं तू दिल्याने साखरेची गरजच नाही आशू.’’

‘‘बाबा पुरे हं,’’ असं म्हणून पोळ्या लाटत राहिली.

‘‘बाबा, एक विचारावेसे वाटते.’’

‘‘हं, विचार तू!’’

‘‘बाबा तुमची शाळा कुठली?’’

‘‘कशाला गं?’’

‘‘असंच!!’’

‘‘माझी शाळा खूप दूर, सत्तरी तालुक्यात. खूप जुनी शाळा. आजचे मोठमोठे साहित्यिक त्याच शाळेतून लहानाचे मोठे झाले. म्हणून आम्हाला त्यावेळी या शाळेचा खूप खूप अभिमान वाटायचा. गोवा स्वतंत्र होण्यापूर्वी ती शाळा एका जमीनदाराच्या वाड्यात चालायची. मग गोवा स्वतंत्र झाल्यानंतर मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांच्या आवाहनला प्रतिसाद देऊन त्या परोपकारी जमीनदाराने जमीनीसकट तो वाडा शाळा म्हणून सरकारला उदारहस्ते दान करून टाकला. मग तिथे भव्य इमारत सरकारने बांधली.’’

‘‘बाबा, त्यावेळी कितीजण होते तुमच्याबरोबर?’’

‘‘असतील २५-३० जण, आता हे सर्व कुठे असतील कोण जाणे??’’ असं म्हणून पालथ्या हाताने अंगठा पापण्यांवरून डोळ्यांवर फिरविला.

दुपारी जेवण आटोपून आशू गाडी घेऊन त्या गावाच्या शाळेकडे निघालो.

शाळेची भव्य इमारत, मोठे पटांगण, भरपूर हिरवाई असलेली तालुक्यातील आदर्श शाळा, शाळा सुटलेली. पण कार्यालयीन स्टाफ व मुख्याध्यापक होते.

‘‘नमस्कार, सर!! मी डॉ. आशीर्वाद यांची मिसेस आशू आणि जलविभागाचे निवृत्त इंजिनियर अरविंद यांची सून!’’

‘‘व्वा! छान, इंजिनियर अरविंदसाहेबांना कोण ओळखत नाही. त्यांच्या निवृत्तीवेळी झालेला जाहीर सत्कार सर्वांच्याच आठवणीत आहे. खूपच सालस, निस्पृह, सचोटीने वागणारे व्यक्तिमत्त्व. बरं, कसे आहेत अरविंदसाहेब आणि डॉक्टरसाहेब काय म्हणतात? बरे आहेत ना?’’

‘‘हो सर, थोडी माहिती पाहिजे होती.!!’’

‘‘कसली गं?’’

‘‘बाबा याच शाळेत शिकलेत ना?’’

‘‘हो’’

सर…. असं म्हणून थोडावेळ शांत राहिली.

‘‘अगं, तुला काय पाहिजे ते बिनधास्तपणे सांग.’’

वातावरण थोडंसं सैलसर झालं.

‘‘सर, आम्ही बाबांचा सत्तरावा वाढदिवस इथल्या शाळेतील बाबांच्या दहावीच्या विद्यार्थ्यांबरोबर साजरा करण्याचा ठरविला आहे. साधारणपणे १९६३-६४ साल असावं बाबांच्या दहावीचं. जर तुमच्याजवळ त्या सालचे रेकॉर्डस उपलब्ध असतील तर या सर्व विद्यार्थ्यांची नावे, पत्ते मिळू शकतील?’’

‘‘आशू तुझी कल्पना फार छान आहे. मी हे असतील का ते पाहतो. मी तुला जरुर कळवीन. त्यासाठी तुझा भ्रमणध्वनी क्रमांक दे. मी स्टाफला सांगून माहिती मिळवतो. बरं?’’

‘‘खूप खूप आभारी आहे सर तुमची!’’

‘‘अगं आभार कसले, फार मोठं योग्य काम करते आहेस तू!’’

‘‘बरंय सर, निघते मी.’’

मग दोन दिवसांनी आशूचा भ्रमणध्वनी वाजला.

‘‘नमस्कार, मी पाटील सर. तुझं काम सक्सेस. एवढं जुनं रेकॉर्ड मिळालं. ये तू पाहिजे तेव्हा!’’

‘‘सर, मी आजच येते.’’

तिकडून पाटील सर मंद मंद हसले.

आशु दुपारीच तिकडे शाळेत पोहोचली.

‘‘बस आशू, हा घे १९६३ सालचा १०वीच्या बॅचचा रेकॉर्ड. २८ मुलं व ४ मुली अशांची नावे आहेत. आता ती कुठे असतील? आणि कितीजण असतील याचा तुला शोध घ्यावा लागेल.’’

‘‘हो सर, खूप आभारी आहे तुमची!’’

असं म्हणून हस्तांदोलन करून खुषीने आशू निघाली.

दुसर्‍या दिवशी…

‘‘बाबा, तुम्हाला शाळेतले दिवस आठवतात का हो?’’

‘‘थोडे – थोडे अंधुकसे आठवतात. आमचा त्यावेळी बर्‍यापैकी दहाएक जणांचा ग्रुप होता. आतासारखे मोबाईलमध्ये डोके खुपसून रहायचो नाही. आम्ही खरे खरे मैदानावर खेळायचो, बोरे खायचो, काजू भाजून खायचो, जांभूळ, करवंद खूप खायचो. नारायण, वासुदेव, हरी, केशव अशी नावे आठवतात.’’

बाबा हळूहळू आठवणी सांगत होते. आशू व्हॉटस्‌ऍप, फेसबुक याद्वारे सर्वांचे पत्ते शोधण्याचा प्रयत्न करीत होती. हळूहळू एक-दोनावरून पंधराएक जणांचे पत्ते मिळाले.

‘‘आपण केशव नाडकर्णी का?’’

‘‘हो.’’

‘‘मी आशू, तुमचे वर्गबंधू अरविंद यांची सून.’’

‘‘अरे व्वा! कसा आहे अरविंद आमचा?’’

‘‘खूप खूप मजेत आहेत.’’

‘‘मूलं किती गं त्याला?’’

‘‘एकच. डॉक्टर आशीर्वाद.’’

‘‘व्वा!’’

‘‘प्रसिद्ध सर्जन आहेत ते शहरातले.’’

‘‘व्वा! छान छान! पण हरामखोर साला, त्यावेळी म्हणत होता आपण लग्न झालो की एक अख्खी क्रिकेट टीम उभी करीन म्हणून. पण कुठे काय? हा हरामखोर बॅडमिंटनच खेळू शकला. ह.. ह… ह…ऽऽऽ’’

आशू खूप खजिल झाली.

‘‘काका, आम्ही बाबांचा सत्तरावा वाढदिवस पुढच्या महिन्याच्या १ एप्रिलला करायचं ठरवलं आहे. कारण बाबांची जन्मतिथी पण तीच आहे.’’

‘‘हो, माहीत आहे, लुच्च्या साला आम्हाला प्रत्येकवेळी वाढदिवसाला एप्रिलफुल करायचा, हरामखोर.’’ केशवकाकांचं ऊर भरून आला होता. एवढ्या जिवलग दोस्ताच्या वाढदिवसाला जायचे म्हणून.

आशूने प्रयत्न करून जवळजवळ १८ जणांचे पत्ते मिळवून १ एप्रिलला बाबांच्या वाढदिवसाचे निमंत्रण दिले.

सर्वचजण जाम खूष होते. जवळजवळ ५२ वर्षांनी एकत्र जमणार होते. सगळ्यांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या होत्या. रामकृष्णाला तर अर्धांगवायूचा झटका आलेला. पण त्यांना अरविंदच्या वाढदिवसाचे निमंत्रण मिळताच झटक्यात चांगला झाला. त्यांची सौभाग्यवती यशोदेला हा सुखद आनंद मिळाला. जे हरी वर्षभर घरात बसून वरच्या हरीची वाट बघत बसून होता, त्याला आमंत्रण मिळताच घरातच नाचू लागले. हर्षभरित होऊन दररोज सकाळी मॉर्निंगवॉकला जाऊन ताजेतवाने होऊ लागले. सर्व मित्रगणांच्या आयुष्यात एक नवीन पहाट उगवू पाहत होती.

आणि तो दिवस उजाडला…

हयात असलेले सर्वजण अरविंदच्या घरी त्यांची मुलं त्यांना आणून पोचवित होते. आशू सर्वांना ओवाळीत घरात घेत होती. सर्वांना योग्य तो मानसन्मान देत स्थानापन्न होण्याची आग्रहाने विनंती करीत होती. बाबांचे डोळे आनंदाश्रुंनी भरून आले होते. त्यांच्यासाठी हे सर्व सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे होते. अनपेक्षित जे मनात नव्हे… स्वप्नातसुद्धा नव्हे… ते प्रत्यक्षात अवतरले होते. श्रीराम- भरताची भेट तर १२ वर्षांनी झाली होती, इथे प्रत्यक्ष वर्गबंधूंची भेट ४ तपांनी होत होती. सगळेजण आनंदाने बेभान झाले होते. बेधुंद होत वयाचा विचार न करता जणूकाय दहावीच्या वर्गातच बसून बोलतो आहोत, दंगामस्ती करतो आहोत, असे करीत होते.

‘‘अरे, तुझी ती वासंती, शरयू, अनुसूया कुठे असतात रे?’’

होय रे, एवढी वर्षे झाली तरी नातवंड, पतवंड होऊनसुद्धा त्या मनातून अजून जात नाहीत. त्या कोणाच्या राशीला असतील कोण जाणे!’’

‘‘अरे, तुझा मुलगा काय करतो?, अरे तू सून, जावई आणलास की नाही?… अरे तुझे ते देव आनंदसारखे केस असलेले कुठे गेले रे?, पार शेट्टी झालास ना रे तू, व्यायाम काय नेटाने करतोस की काय, आता कसला व्यायाम डोंबलाचा.. अरे तो चष्मेवाला बुधाजी कुठे रे?… अरे हा काय मीच तो… माझ्या मुलाने मला अमेरिकेला नेऊन कायम चष्म्याशिवाय दिसायची सोय करून दिली… बघ मी किती तुमच्यापेक्षा तरुण दिसतोय ते… ’’ असं म्हणून टी-शर्टच्या बाह्या वर सरकवून दाखविले… ‘‘बरं झालं, अरविंदच्या सूनेनं आपल्या बायकांना आणू नका म्हणून सांगितले, नाहीतर आमचं पितळ उघडं पडलं असतं…’’, असं म्हणून सगळ्यांनी एकमेकांच्या हातावर हात देत हा क्षण एन्जॉय केला.

७० नंबरचा केक आणण्यात आला. सत्तर पणत्या पेटविण्यात आल्या. सगळ्यांनी मिळून केक कापला व सगळे एकमेकांना केक तोंडात भरवत भरवत गाणी गात, हसत खेळत होते. सगळेजण आपापली स्कील दाखविण्याचा प्रयत्न करीत होते. रोमांचकारी क्षण हृदयस्पर्शाने अनुभवत होते. सगळ्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. सर्वजण जाम खूष होते. संध्याकाळ झाली तरी पाय हालत नव्हते. ज्यावेळी प्रत्येकाला न्यायला त्यांची नातवंडे, मूले आली, त्यावेळी पावले उचलणे भागच होते. जीवन, वेळ काळ, थांबत नसतो, जो थांबतो तो तिथेच राहतो, जो चालतो तो चालतच राहतो, चरैवेंती चरैवेंती.

तिन्हीसांज होत होती. सर्वजण म्हणत होते, आपल्या जीवनाची तिन्हीसांज पण अशीच उत्स्फूर्त, रोमांचकारी, आनंददायी, विनादुःख, विनाश्रम, उत्तम आरोग्याने नटू दे. असं म्हणत अरविंदला कुशीत घेत पाठीवरून हात फिरवित आशू-आशिर्वादला आशिर्वाद देत आयुष्याची नवीन पहाट सजविण्यासाठी आपापल्या घरकुलात परतत होते.

खरं तर डॉ. आशीर्वाद व आशूने आपल्या वडिलांना त्यांच्या जीवनातील एक अत्युच्च क्षण अनुभवण्यास दिला होता. अरविंदना आणखी बळ मिळाले. नवजीवन जीवन जगण्याचे… बाकीच्या वर्गबंधूंच्या वाढदिवसाला जाण्याचे… एक नवीन उत्साह… एक नवीन आशा… जगण्याचे बळ देत होते… देत होते…