संसदेच्या इमारत उद्घाटनावर 19 विरोधी पक्षांचा बहिष्कार

0
14

संसदेच्या नव्या इमारतीचे येत्या 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. मात्र या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय 19 विरोधी पक्षांनी घेतला आहे. नवीन संसद भवन इमारतीचे उद्गाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे अशी भीमिकाया विरोधी पक्षांनी घेतली आहे. बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या विरोधी पक्षांमध्ये काँग्रेससह महाराष्ट्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही समावेश आहे. राष्ट्रपतींना या कार्यक्रमातून बेदखल करणे हा लोकशाहीचा अपमान आहे अशी भूमिका घेत या विरोधी पक्षांनी एकत्रित निषेधपत्र जाहीर केले आहे.

ज्या हुकुमशाही पद्धतीने नव्या संसदेची निर्मिती केली जात आहे याबद्दल आमचे काही आक्षेप आहेत. या कार्यक्रमातून राष्ट्रपतींनाच बेदखल केले जात आहे आणि हा लोकशाहीचा अपमान आहे असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. ही तर महिला आदिवासी राष्ट्रपती बनण्याची सर्वसमावेशक प्रकिया ज्या लोकशाहीने घडवून आणली त्याचाही अनादर होत असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाविषयी राहुल गांधी यांनी एका ट्टिटद्वारे या भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले पाहिजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्हे असे म्हटले होते. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी संसद भवनाचे उद्घाटन करण्यस विरोधकांनी विरोध दर्शवला.
ज्येष्ठ काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसदेचे उद्घाटन करणे हे घटनेला धरुन नाही अशी भूमिका मांडली होती. या सोहळ्यापासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना दूर ठेवणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही ट्वीटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींना या सोहळ्याला का बोलावले नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे.

17 पक्षांचा सहभाग
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला भाजपव्यतिरिक्त वायएसआर काँग्रेस, बीजेडी, बसपा, एलजेपी, टीडीपी, अपना दल (सोनेलाल), अकाली दल, शिरोमणी अकाली दल (अमृतसर), एजेएसयू, एआयडीएमके, एआययूडीएफ, जेडीएस, मिझो नॅशनल पार्टी, नागा पीपल्स फ्रंट, एनडीपीपी, आरएलपी. आणि एसकेएमचे खासदार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री सरमा यांची विरोधकांवर टीका
या निर्णयावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंतबिस्वा सरमा यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षनेत्यांचे उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घालणे निश्चित होते असे सांगून नवीन संसद भवनाच्या बांधकामालाही विरोधकांनी विरोध केला होता. विरोधी पक्षांनी कधीच विचार केला नव्हता की ही इमारत इतक्या लवकर पूर्ण होईल. सर्व काही विरोधकांसाठी बाऊन्सरसारखे घडले आहे. केवळ चेहरा वाचवण्यासाठी बहिष्कार टाकण्याचे नाटक विरोधी पक्ष करत आहेत. वीर सावरकरांच्या जन्मदिनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे, हे देखील त्यांच्या निषेधाचे एक कारण असल्याची टीका मुख्यमंत्री सरमा यांनी केली आहे.

सरकारकडून जोरदार तयारी
दरम्यान, सरकार मात्र 28 मे च्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करतआहे. संसद उद्घाटनाची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे.

राजदंडाची स्थापना करणार

दक्षिणेतल्या ऐतिहासिक चोल साम्राज्याचा राजदंडही नव्या संसदेत स्थापित केला जाणार असल्याची माहिती अमित शहांनी दिली आहे. सत्तेचे हस्तांतर करण्यासाठी हा राजदंड दिला जायचा. ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा राजदंड पंडित जवाहरलाल नेहरु यांना दिला होता. नव्या संसदेत अध्यक्षांच्या खुर्चीजवळ हा राजदंड स्थापित केला जाणार आहे.