विषवल्लीचे बीज

0
107

पंजाबमध्ये अमृतसरच्या सुवर्णमंदिरात नुकत्याच खलिस्तानच्या घोषणा पुन्हा घुमल्या. अनेक वर्षे शांत असलेला पंजाब पुन्हा अशांत करण्याची स्वप्ने पाहणार्‍या खलिस्तानवाद्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची ही निशाणी आहे. शीख पंथ हा नेहमीच एक लढवय्या पंथ म्हणून ओळखला जातो. इतिहासकाळात त्याचा जन्मच मुळी परकीय आक्रमणे परतवून लावण्यासाठी झाला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, इतकेच काय, अगदी गोव्याच्या मुक्तीलढ्यामध्येही या पंजाबी वीरांनी आपली बलिदाने हिरीरीने दिलेली आहेत. आपल्या सैन्यदलांचे बाहू म्हणूनच शीख समुदायातील शूर वीरांकडे पाहावे लागेल. आजही ते सैन्यदलांमध्ये निधडेपणाने सामील होत असतात. अतुल्य पराक्रमाचे दर्शन घडवीत असतात. परंतु या जन्मजात लढवय्येपणाला देशद्रोहाचे वळण देण्याचे कारस्थान काही वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या पाठबळावर रचले गेले आणि पंजाबात आकांत मांडला. ते सारे रक्तरंजित पर्व सुदैवाने संपुष्टात आले. नुकत्याच निधन पावलेल्या के. पी. एस. गिल किंवा आपल्या ज्युलिओ रिबेरोंसारख्या ‘सुपरकॉप’चे त्यात महत्त्वाचे योगदान होते. गिल यांच्याकडे जेव्हा पंजाबचे पोलीस प्रमुखपद आले, तेव्हा तेथील दहशतवादाने शिखर गाठले होते. परंतु निधडेपणाने आणि कल्पकतेने त्यांनी त्याचा कणाच मोडून काढला. ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’च्या वेळी जसे दहशतवाद्यांनी सुवर्णमंदिर संकुल हे आपले वास्तव्यस्थान बनवले होते, तसाच गिल यांच्या काळातही त्यांनी तेथे डेरा टाकला होता. परंतु इंदिरा गांधींनी ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ द्वारे त्या परिसरात रणगाडे घुसवण्याची घोडचूक केली आणि शीख धर्मभावनेला अपमानित केले, तशी चूक गिल यांनी केली नाही. त्यांनी आपल्या ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर’ मध्ये केवळ त्या परिसराची वीज, पाणी आणि इतर रसद तोडली. तेथे तळ ठोकलेल्या दहशतवाद्यांनी उद्वेगाने त्या परिसराची केलेली नासधूस दूरचित्रवाणी वाहिन्यांमुळे जनतेपर्यंत गेली आणि खलिस्तानवादी आम जनतेची सहानुभूती गमावून बसले. दहशतवादाची नांगी त्यांनी ठेचली आणि त्यांना पुन्हा डोके वर काढू दिले नाही. जे दहशतवादी शरण आले, त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले. हळूहळू खलिस्तानचा विषय शांत होत गेला. गेली अनेक वर्षे त्यामुळे खलिस्तानचा विषय हा विदेशांत, विशेषतः शीख मोठ्या प्रमाणात असलेल्या कॅनडासारख्या देशात अधूनमधून उपस्थित केला जायचा. तेथून काही मंडळी भारतात पुन्हा घातपात घडवण्याची दिवास्वप्ने पाहायची. परंतु येथे लोकशाही प्रक्रियेत लोकांना रस निर्माण झाल्याने दहशतवादाचे समर्थन कमी होत गेले आणि लोक हळूहळू खलिस्तानची मागणी विसरले. पाकिस्ताननेही आपले लक्ष पंजाबऐवजी काश्मीरवर केंद्रित केले आणि तेथे नव्याने आकांत मांडला. आज पंजाब अमली पदार्थांचे मोठे केंद्र बनलेला आहे. नुकताच त्यावर ‘उडता पंजाब’ हा चित्रपट येऊन गेला. त्यातील चित्रण अतिरंजित असेल, परंतु सीमेपलीकडून पंजाबी शीख युवकांना व्यसनांच्या नादी लावून त्यांचा पुरुषार्थ संपविण्याचा डाव पाकिस्तानने आखलेला आहे आणि दुर्दैवाने खुशालचेंडू शीख तरूण त्याला बळी पडत आहेत. इंदिरा गांधींच्या राजवटीत पंजाबात पसरलेला दहशतवाद, तो मोडून काढण्यासाठी त्यांनी केलेले ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’, त्याचे भयावह परिणाम, हा सगळा इतिहास केवळ इतिहासाच्या पुस्तकात राहायला हरकत नव्हती, परंतु अजूनही खलिस्तानचे भूत डोक्यावर स्वार झालेली मंडळी आहेत आणि ती पुन्हा पंजाब पेटवण्याचे मनसुबे रचत आहेत. सुवर्णमंदिरात दिल्या गेलेल्या घोषणा त्याचीच निशाणी आहे. हा धोक्याचा इशारा मानला गेला पाहिजे. वेळीच या उठावाला मुळासकट ठेचून काढले गेले नाही, तर पुन्हा ही विषवल्ली रुजेल, फोफावेल!