वाहतूक नियमभंग; वाहनचालकांकडून १२ दिवसांत ५६ लाखांचा दंड वसूल

0
9

राज्यातील वाढत्या वाहन अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक पोलीस विभागाने वाहतूक नियमभंग करणार्‍यांवर कारवाईसाठी राबविलेल्या १२ दिवसाच्या खास मोहिमेत ७५१९ वाहनधारकांकडून सुमारे ५६ लाख रुपये दंड वसूल केला आहे. या महिन्यात १२ दिवस राबवलेल्या विशेष मोहिमेत हा दंड वसूल करण्यात आला.

वाहतूक पोलीस विभागाकडून ही मोहीम १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान राबविण्यात आली होती. या मोहिमेत भरधाव वाहन चालविणार्‍या ७०१ वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला. त्यांच्याकडून ७ लाख ५ हजार रुपये वसूल करण्यात आले.
तसेच हेल्मेट परिधान न करणार्‍या २२७१ दुचाकी चालकांना दंड ठोठावण्यात आला असून, त्यांच्याकडून २२ लाख ७१ हजार रुपये वसूल करण्यात आले.. कारमध्ये सीटबॅल्टचा वापर न करणार्‍या ६७६ जणांकडून ६ लाख ७६ हजार रुपये वसूल करण्यात आले.
धोकादायक, नो पार्किंगच्या जागेत वाहने पार्क करणार्‍या ३८७१ वाहनचालकांकडून १९ लाख ४४ हजार रुपये वसूल करण्यात आले. मद्याच्या नशेत वाहन चालविणार्‍या १०१ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली.