योगश्चित्तवृत्तिनिरोधः

0
302
  • पंकज अरविंद सायनेकर

प्रत्येक कर्माचा खोलवर परिणाम होत असतो. सर्व जुनी कर्मे मेंदूमध्ये साठवली जातात. हे कर्माशय पुढे जाऊन स्मृती बनतात आणि स्मृती म्हणजे पाच चित्तवृत्तींपैकी एक. आम्ही इथे वृत्ती नाहीशा करण्याबाबत बोलत आहोत आणि ‘स्मृती’ ह्या वृत्तीमुळे सर्व वृत्ती पुन्हा जिवंत होतात.

जसे एखादे फळ फांदीला चिकटलेले असते, फांदी झाडाला आणि झाड त्याच्या मुळांना; त्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील कर्मफल आयुष्याला जोडलेले असतात, जे भूतकाळातील कर्मावर अवलंबून असतात. त्याचप्रमाणे कर्माशय दुःखाच्या मुळाशी अवलंबून असतो. आम्हाला जर का फळे नकोत, तर ते झाड नष्ट झाले पाहिजे, आणि झाड नष्ट करण्यासाठी मुळांवर हल्ला केला पाहिजे. तसेच, जीवनातील कर्मफळे नाहीशी करण्यासाठी मुळापासून नष्ट करणे आवश्यक आहे. ही मुळे म्हणजेच क्लेश, दुःख, अविद्या इत्यादी. आम्ही रोज ज्या गोष्टी करतो, जे काम करतो, त्या सगळ्यांची नोंद होते. शरीर ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवते, ज्याची ‘संस्कार’ म्हणून नोंद होते. सर्व विविध संस्कारांचा साठा म्हणजे ‘कर्माशय’. कर्माशय सोप्या पद्धतीने विसरले जाऊ शकत नाही. प्रत्येक कर्माचा खोलवर परिणाम होत असतो. सर्व जुनी कर्मे मेंदूमध्ये साठवली जातात. हे कर्माशय पुढे जाऊन स्मृती बनतात. आणि स्मृती म्हणजे पाच चित्तवृत्तींपैकी एक. आम्ही इथे वृत्ती नाहीशा करण्याबाबत बोलत आहोत आणि ‘स्मृती’ ह्या वृत्तीमुळे सर्व वृत्ती पुन्हा जिवंत होतात.

कर्माशयाचे तीन भाग असतात. पहिला भाग हा जमा झालेले संस्कार, ज्यांना साठ्यातील संस्कार (भूतकाळातील कर्मामुळे जन्मलेले संस्कार) असेही म्हणता येईल. दुसरा भाग, ज्यामधून आम्ही नवीन कर्म करण्यास प्रवृत्त होतो आणि त्या कर्मांपासून नवीन कर्म निर्माण होतात आणि काही काळानंतर पहिल्या भागात स्थलांतरित होतात. आपल्या संपूर्ण जीवनकालात करण्यात येणारी कर्मे ही तिसर्‍या भागात गणली जातात. ह्या सर्वांना ‘प्रारब्ध’ म्हटले जाते. कर्माशयाचे तीनही भाग ‘कारण शरीर’ याच्याशी जोडलेले असतात. ‘कारण शरीर’ ज्याचा उल्लेख वेदांतामध्ये केला गेला आहे. हे एक सूक्ष्म कण आहे जो मनोमय कोशापेक्षाही सूक्ष्म आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

कर्माशयाची संकल्पना एका उदाहरणातून समजून घेऊ. एक शेतकरी धान्याच्या गोदामातून एक पिशवी धान्य घेऊन येतो, ज्याची त्याला आवश्यकता आहे. (हा कर्माशयाचा पहिला भाग झाला). धान्याची पिशवी घेऊन हा शेतकरी शेती करण्यासाठी जातो, जिथे हे धान्य तो रुजत घालणार आहे. (वर्तमान कर्म, म्हणजेच कर्माशयाचा दुसरा भाग). त्या धान्यापासून काही काळानंतर नवीन पीक येणार ज्याला ‘विपाक’ असे म्हटले जाते. आता नवीन आलेले पीक, पुन्हा धान्याच्या गोदामात जाईल आणि ही प्रक्रिया अशीच चालू राहील. कर्म आणि कर्माशयाच्या बाबतीत असेच आहे. आता हे धान्याचे गोदाम म्हणजे कर्माशय, धान्य आणि ज्या गोष्टी किंवा प्रक्रिया त्या धान्यावर करतो ते म्हणजे कर्म.
ह्या सर्वांपासून मुक्त होण्यासाठी जे आवश्यक आहे ते म्हणजे योगश्चित्तवृत्तिनिरोधः|
ज्याचा अर्थ, चित्ताच्या वृत्तींचा नाश करणे, निरोध करणे.
(क्रमशः)