मुख्यमंत्र्यांकडूनच संचारबंदीचे उल्लंघन ः कामत

0
132

बुधवारी विठ्ठलापूर-साखळी येथील पुलाचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत उद्घाटन करत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सामाजिक अंतराचे भान ठेवले नाही. राज्यात १४४ कलम लागू आहे. मात्र, काल मुख्यमंत्र्यांनी स्वत:च या कलमाचा भंग केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री कोविड महामारीच्या काळात जनतेला कसला संदेश देऊ पाहत आहेत, असा प्रश्‍न विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना हे शोभते काय, असा प्रश्‍नही त्यांनी केला आहे.

शेकडो लोकांच्या हजेरीत पुलाचे उद्घाटन करण्याची गरज होती काय असा प्रश्‍न करून नंतर शेकडो लोकांसह पुलावरून चालत जाऊन तुम्ही लोकांना कसला संदेश देत आहात, असा प्रश्‍न करून नेत्यांनी ‘बोले तैसा चाले’ या नीतीचा अंगीकार करायला हवा, असे कामत यांनी म्हटले आहे. राज्यातील भाजप सरकार संवेदनशील नाही हे यावरून स्पष्ट होत असल्याचे कामत यांनी म्हटले आहे.

लोकांनी जमावबंदीचा भंग केल्यास मुख्यमंत्री त्यांना कोणत्या तोंडाने जाब विचारतील, असा प्रश्‍नही कामत यांनी केला.