‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो

0
288

समग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत केल्यानंतर त्यांच्या वडिलांनी शेवटी गोव्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्या गोमंतकीय असल्याच्या पार्श्‍वभूमीविषयी ते सांगत होते. आरोग्यसेवा क्षेत्रात त्यांना अपेक्षित बदलांविषयी झालेल्या चर्चेचा हा गोषवारा….

अगदी चिंतामुक्त किशोरवयापासून मित्रांसोबत केलेली मौजमस्ती, तसेच हॉटेल व्यवस्थापन शिकत असतानाच्या केलेल्या पार्ट्या आणि त्यानंतर जीवनशैली प्रशिक्षकापर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास आपल्यासमोर मांडताना श्री. ल्यूक कुतिन्हो म्हणाले, ‘‘मी गोव्यातच शिकलोय आणि प्रामुख्याने माझे बरेचसे आयुष्य मी गोव्यात घालवलेय. नव्वदच्या दशकाच्या शेवटचा काळ आणि २००० च्या सुरुवातीच्या काळात गोवा हा आज आहे त्यापेक्षा खूप वेगळा होता आणि पार्ट्या आणि क्लब्जमध्ये घालवण्याचा तारुण्याचा एक मोठा कालखंड मी इथे घालवला. तरीसुद्धा तो आयुष्याचा एक टप्पा होता आणि आपण सगळेच गरजेनुसार सतत फिरत असतो. कारण जर आपण एकाच टप्प्यावर स्थिर राहिलो तर आपली प्रगती होणार नाही. म्हणूनच मी चांगल्या प्रकारे प्रवाहाबरोबर राहिलो आणि पदार्थ विज्ञान आणि आहारशास्त्रातल्या माझ्या आवडीचा मी पाठपुरावा केला जे मी इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिकलो’’.

मी आरोग्यसेवा आणि आहाराच्या क्षेत्राकडे वळण्याचे प्रमुख कारण म्हणजे आरोग्यसेवेच्या क्षेत्रामध्ये असलेली मोठी पोकळी होय असे ते म्हणाले. त्याबद्दल तपशीलवार सांगताना ते म्हणतात, ‘‘आरोग्यक्षेत्रात इतक्या मोठ्या संख्येने डॉक्टर्स, आहारतज्ज्ञ, औषधतज्ज्ञ, व्यायामतज्ज्ञ, सेंद्रीय आणि हितकर पदार्थविज्ञान उपलब्ध असताना रोगांची संख्या तर कमी होताना दिसतच नाही, उलट ती वाढतेच आहे. या घडीला सार्‍या जगात मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार, कर्करोग आणि इतर जीवनशैलीच्या आजारांच्या बाबतीत भारताचा पहिला नंबर लागतो. मग प्रश्‍न असा विचारावासा वाटतो की आमच्यात सुधारणा का होत नाही?’’
नंतर त्यांनी आजच्या सदोष पद्धतीकडे बोट दाखवत म्हटले की आज प्रत्येक लक्षणाकरिता औषध आहे पण त्या लक्षणांचे मूळ कारण शोधले जात नाही. पुढे ते म्हणाले, ‘‘मी औषधांच्या विरोधात नाही, उलट माझ्या संस्थेमध्ये तर जगातील आणि देशातील उत्कृष्ट डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली काम करणारी वैद्यकीय कमचार्‍यांची चमू आहे आणि जेव्हा गरज असते त्यावेळी आपण औषधांवर विश्‍वास ठेवतोच’’.

औषधे आणि जीवनशैलीतील बदल या दोन्ही विषयांवर एकत्रितपणे बोलताना ते म्हणाले, ‘‘जेव्हा मोठ्या संख्येत लोकांना केवळ चुकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेह होतो, तेव्हा ती गोष्ट आपल्यासाठी खरोखर लाजिरवाणी आहे. ही गोष्ट समजणे खूप महत्त्वाचे आहे की टाईप-२ डायबिटीज आणि थायरॉइडसुद्धा १००टक्के बरे होतात आणि हे आपली जीलशैली बदलल्याने शक्य होते’’.
सविस्तरपणे सांगायचे झाले तर, एकत्रित औषधे म्हणजेच इंटिग्रेटिव्ह मेडिसीनमध्ये सगळ्या पद्धतींमधील उत्कृष्ट ते निवडायचं असतं, मग ते ऍलोपॅथी असू दे, पर्यायी औषध, आहार, आध्यात्मिक उपचार, इत्यादी कोणतेही असो आणि त्यांचा उपयोग एखाद्याच्या फायद्यासाठी करताना जीवनशैलीत आवश्यक ते बदल करायचे. ‘‘एकत्रित औषधांचा उपयोग करून आम्ही रोगांची संख्या कमी होताना पाहिली आहे’’, असे त्यांनी सांगितले.

आरोग्यसेवा क्षेत्रातील कोणती एक गोष्ट तुम्ही बदलवू इच्छिता असे विचारल्यावर स्पष्टपणे त्यांनी उत्तर दिले- ‘माईंडसेट’ म्हणजे ‘मानसिकता’!
‘‘बर्‍याच लोकांना, ‘तुम्ही तुमची गोळी घ्या.. तुम्हाला बरे वाटेल’…असा विश्‍वास ठेवण्यास शिकवले जाते. पण हे सत्यापासून फार दूर आहे. त्यांचे तपासणीचे निष्कर्ष भलेही चांगले येतील कारण औषधांमुळे त्यांची लक्षणे दबलेली असतात. पण सत्य हेच असते की ते नंतरही गोळ्या घेत राहतात आणि त्यांच्या रोगाची स्थिती तशीच राहते. लोकांनी आता जागे व्हायला पाहिजे आणि हे समजून घ्यायला हवे की ऍलोपॅथी ही एक कुबडी आहे; ती निश्‍चितपणे तुम्हाला मदत करेल आणि तुमचा जीव वाचवेल; पण त्याचबरोबर तुम्हाला तुमची मानसिकता आणि जीवनशैलीसुद्धा बदलावी लागेल.’’
सोशल मिडिया किंवा बातम्या ऐकून प्रभावित न होता, एखाद्याने आपले आयुष्य आणि आरोग्य संतुलित ठेवणे हे आज खूप महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

त्यानंतर कुतिन्हो, रोग बरे होण्याच्या आणि होऊ न देण्याच्या संदर्भातील चार स्तंभांबद्दल सांगत होते जे आहेत- आहार, व्यायाम, झोप आणि ताण. आहाराविषयी बोलताना त्यांनी डाएटिंगच्या फॅडला विरोध केला व म्हणाले, ‘‘आहार किंवा भोजन हे अगदी व्यक्तिगत आणि प्रत्येकाचे वेगळे असते. आपण दुसर्‍याच्या आहाराचे अनुसरण करू शकत नाही.’’ जास्तीत जास्त नैसर्गिक पदार्थ खाणे आणि जंक आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ कमी खाणे, यावर भर देणे हाच उत्तम आरोग्याचा मार्ग आहे असे त्यांनी सांगितले. ‘‘तुमचा आहार अगदी साधा- सात्विक ठेवा आणि तुमच्या विटामिन-डी३ आणि बी१२च्या पातळ्या तपासा’’, असे ते पुढे म्हणाले.

व्यायामाच्या संदर्भात, त्यांनी खूप जोर देऊन म्हटले की मानवी शरीराला व्यायामाची गरज आहेच कारण ते आरामासाठी बनवलेलेच नाही आणि ते म्हणाले, ‘‘हालचाल हे शरीराकरिता औषध आहे आणि त्याला तुमची आवड बनवण्याची गरज नाही. तुम्ही ऍथलेट असल्याशिवाय किंवा तुम्हाला तुमचे शरीर सौष्ठव वाढवायचे असल्याशिवाय, तुम्हाला जिमचे सदस्यत्व घेण्याची काहीही जरुरी नाही. जरी तुम्ही केवळ चाललात आणि दीर्घ श्‍वसनाबरोबर योग केला, तरी ती खूप मोठी गोष्ट आहे.’’ व्यायामाच्या वेळापत्रकामध्ये यशस्वी होण्यासाठी निरंतरता आणि शिस्त यांची खूप गरज असते, ज्यामुळे अति-व्यायामापासूनही सावध राहता येईल.

झोपेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी चांगल्या आणि भरपूर झोपेचे फायदे सविस्तररीत्या सांगितले. ‘‘लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही झोपेत असता तेव्हा सगळ्यात सुखाच्या अवस्थेत असता आणि प्रत्येकाची झोपेची गरज ही वेगवेगळी असते. महत्त्वाचे काय आहे की झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला किती ताजेतवाने वाटते? दोन ते तीन रात्रीं सतत ्‌झोप न झाल्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती ६०-७० टक्क्यांनी कमी होऊ शकते, असे ते म्हणाले.

त्यांचा असा विश्‍वास आहे की वामकुक्षी ही खूप प्रभावी पद्धत आहे, फक्त अट एकच की ती ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ नसावी. रात्रपाळी करणार्‍यांनी त्यांच्या झोपेचे व्यवस्थापन कसे करावे, ह्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘माझे प्रामाणिक मत असे आहे की दीर्घ काळासाठी रात्रपाळीचे काम करणे सोडून देण्याचा प्रयत्न करा, कारण काही काळानंतर ते तुमच्यासाठी नुकसानदायीच ठरेल. आणि हे जर शक्य नसेल, तर दिवसालाच तुमची रात्र बनवा आणि जेवढी आवश्यक असेल तेवढी झोप घ्या.’’

भावनिक आरोग्याच्या विषयावर बोलताना ते म्हणाले, ‘‘आज कोणताही डॉक्टर तुम्हाला सांगेल की ताण तुम्हाला मारतो. अर्ध्याअधिक हृदयाच्या समस्या, कर्करोगासहीत, ह्या जुनाट ताण-तणावामुळे होतात. जर तुमचा आजार हा जुनाट ताणतणावामुळे झालेला असेल तर कितीही औषधे घेतली तरी उपयोग होणार नाही. मग तुम्हालाच तुमचा ताण योग्य प्रकारे हाताळावा लागेल.

मि. ल्यूक यांनी निरनिराळ्या प्रश्‍नांना उत्तरे देताना विविध विषयांना उजाळा दिला आणि खूप मौलिक टीप्स दिल्या….
‘‘खूप गंभीर अवस्थेच्या रुग्णांशी बातचित करताना, मला हे ज्ञान झाले की आपले जीवन हे मर्यादित आहे, त्यामुळे त्याला वाया घालवू नका. त्यापेक्षा लोक तुमची आठवण काढतील असे काही करा. तुमच्या करिअरच्या बाबतीत महत्वाकांक्षी रहा पण तुमच्या करिअरचे किंवा पैशाचे गुलाम बनू नका. जीवनात कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल- तर तुमचे कुटुंब, नातेसंबंध, प्रेम, भावभावना आणि अनुभव. तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या आणि जीवनाचा आनंद घ्या.’’ त्यांनी जीवनात समाधानी होण्यासाठी आपण समाजाकडून जे काही घेतलंय त्याची परतफेडही करायला सांगितले, ‘‘जेव्हा तुम्ही परत काही देता तेव्हा तुम्ही लोकांच्या जीवनाला किंमत देता आणि तोच जास्त सुंदर भाव आहे. परत देण्यासाठी मार्ग शोधा आणि बघा, फरक पडेल.
समारोप करताना गोव्यातील तरुणांना उद्देशून ते म्हणाले, ‘‘प्रत्येक गोवेकरामध्ये प्रतिभा आहे. संपूर्णपणे यशस्वी झालेल्या गोमंतकीय व्यक्तींना मी जगभरात पाहिलंय आणि मला त्यांचा अभिमान वाटतो. जीवनात प्रगतीची गती भलेही कमी असू द्या पण सक्षम बना. जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा तुमचे ५००% देण्यासाठी कठीण परिश्रम करा आणि जेव्हा मजा करता तेव्हा ५००% मजा करा. जीवनातील ध्येय उच्च ठेवा, सक्षम बना पण तुमच्यात असलेल्या गोमंतकीय आत्म्याला, खर्‍या चैतन्याला दूर जाऊ देऊ नका.