महत्त्व ओंकारसाधनेचे

0
337

योगसाधना – ४९७
अंतरंग योग – ८२

  • डॉ. सीताकांत घाणेकर

आज बहुतेकजण इंद्रियसुखातच मग्न झाले आहेत. नश्‍वर असे शरीर हेच आपण सर्वस्व मानतो आहोत. त्या शरिराला जीवंत ठेवण्यासाठी जो प्राण लागतो त्याबद्दल आपण विचारच करत नाही. तसेच जो अजर, अमर, अविनाशी आत्मा आहे त्याबद्दल तर बहुतेकांना ज्ञानच नाही.

भारतीय संस्कृतीत ॐला पुष्कळ महत्त्व आहे. त्यावर विविध साहित्यात अनमोल माहिती उपलब्ध आहे. अनेक ऋषीमहर्षींनी त्यावर सखोल अभ्यास व चिंतन केले आहे. ॐची दुसरी दोन नावे म्हणजे- १. प्रणव २. उद्गीथ
‘प्रणव’ म्हणजे प्रकर्षाने केलेली स्तुती किंवा उत्तम स्तोत्र. उत्तम स्तोत्र म्हणजे परब्रह्माची स्तुती. पू. पांडुरंगशास्त्री म्हणतात-
‘‘परब्रह्माची स्तुती करताना सर्वच वाङ्‌मय अपुरे असल्याचे सिद्ध होते. तेथे शब्दचापल्य कामाला येत नाही.’’
‘यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह’- या विषयाचे चांगले आकलन व्हावे म्हणून ते एक सुंदर असा श्‍लोक नमूद करतात –

‘असितगिरिसमं स्यात्कज्जलं सिंधुपात्रे
सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी |
लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं
तदपि तव गुणानामीश पारं न याति ॥

  • ‘हे ईश, महासागराएवढ्या पाण्यात नीलगिरी पर्वत टाकून तयार होणार्‍या शाईने कल्पवृक्षाच्या लेखणीने पृथ्वीएवढ्या कागदावर सरस्वती देवी सदासर्वकाळ लिहित राहिली तरी तुझ्या गुणांचा पार लागणार नाही.’
    या सर्व गोष्टी वाचल्या की लक्षात येते हे सर्व महापुरुष किती सखोल विचार करतात- जास्त करुन आध्यात्मिक पैलूंवर. आपल्यातील बहुतेकजण हे फक्त वाचतात आणि विसरून जातात.
    ॐचे दुसरे नाव आहे ‘उद्गीथ’- त्याचा अर्थसुद्धा तसाच आहे. उच्च गीत किंवा उत्तम स्थिती. शास्त्रीजी पुढे म्हणतात-
    ‘‘शब्द जेथे पोचत नाहीत अशा त्या परब्रह्माचे उत्तम स्तवन करण्याच्या हेतूने ऋषींनी सर्व संकेत ज्याच्या साडेतीन मात्रांमध्ये सामावले जातील अशा ॐचा प्रवेश केला.’’
    ‘तस्य वाचकः प्रणवः’
  • ॐचा ध्वनी परब्रह्माचा वाचक बनला.
    या ‘उद्गीथ’- शब्दासंबंधी एक कथा छांदोग्य उपनिषदात आहे ती अशी…
    देव व दानव यांची युद्धे सदासर्वकाळ चालूच असतात. असुरांचा पराभव करण्यासाठी देवांनी ‘उद्गीथ’चा आश्रय घेतला. पण त्यांनी ‘उद्गीथ’चा स्पष्ट अर्थ ध्यानात घेतला नाही. त्यामुळे त्यांनी श्‍वासोच्छ्वास, वाणी, डोळे, कान, मन… यांचीच ‘उद्गीथ’ समजून उपासना केली. पण तिथे त्यांना विपरीत अनुभव आला. असुरांनी इंद्रियांवर पापाचा मारा करताच….
  • नाक सुगंधाबरोबर दुर्गंधही घेऊ लागले.
  • डोळे शुभाबरोबर अशुभही पाहू लागले.
  • कान जे ऐकायचे नाही तेही ऐकू लागले.
  • वाणी सत्याबरोबर असत्यही बोलू लागली.
  • मन संकल्प- विकल्पात भटकू लागले.
    शेवटी देवाना त्यांची चूक कळली. त्यांनी हृदयस्थ प्राणाची ‘उद्गीथ’ रूपात उपासना सुरू केली. आता असुरांचे प्रहार निष्फळ ठरले. शेवटी असुरांचा नाश झाला.
    त्याप्रमाणे निःस्वार्थरीत्या इंद्रियांचे रक्षण करणारा प्राण निष्पाप आहे आणि ‘प्रणव’ हे प्राणाचे प्रतीक आहे, हे सिद्ध झाले.
    खरे म्हणजे- ‘‘माणसाच्या जीवनाला आवश्यक अशी ऊब प्राणापासून मिळते व विश्‍वाच्या जीवनाला आवश्यक अशी उष्णता सूर्यापासून प्राप्त होते. सूर्य हा विश्‍वाचा प्राण आहे. अशा दृष्टीने पाहता अमृततत्वाच्या प्राप्तीची इच्छा करणार्‍याने प्राण व सूर्य यांची उपासना ओंकाररूपात केली पाहिजे’’- पांडुरंगशास्त्री आठवले.

आजदेखील आम्ही जर विश्‍वाकडे नजर टाकली की हेच दिसून येते की बहुतेक जण इंद्रियसुखातच मग्न झाले आहेत. नश्‍वर असे शरीर हेच आपण सर्वस्व मानतो आहोत. त्या शरिराला जीवंत ठेवण्यासाठी जो प्राण लागतो त्याबद्दल आपण विचारच करत नाही. तसेच जो अजर, अमर, अविनाशी आत्मा आहे त्याबद्दल तर बहुतेकांना ज्ञानच नाही. असले तर ते विपरीत ज्ञान आहे. काही तर आत्म्यांना मानतदेखील नाही. गीतेच्या दुसर्‍या अध्यायात (सांख्ययोग) श्रीकृष्ण आत्म्याच्या नित्यतेचे वर्णन करतात. त्या अध्यायात आत्म्याबद्दल पुष्कळ ज्ञान आहे. प्रत्येक साधकाने अभ्यासण्याजोगे आहे. शास्त्रीजी सांगतात की छांदोग्य उपनिषदात एक मुलभूत दांपत्याची कल्पना आहे. ते म्हणतात –
‘‘हे दांपत्य वाणी व प्राणाचेच आहे आणि दोहोंचे मीलन ओंकारातच होते. वाणी व प्राण यांच्या विशिष्ट संयोगानेच ओंकाराचा उच्चार होतो. दुसर्‍या भाषेत सांगायचे झाल्यास ओंकाररूपी बालकाला जन्म देऊन वाणी व प्राण यांचे दांपत्य जीवन कृतार्थ बनते.’’
हे वाचले की कळते- आमची भारतीय विचारसरणी किती उच्च आहे ते! छोट्या छोट्या अक्षरात अगाध तत्त्वज्ञान भरलेले आहे.
ते पुढे सांगतात – ‘‘बृहस्पतीनेही त्याची ‘उद्गीथ’रीत्या उपासना केली आहे.
बृहत् म्हणजे वाणी आणि तिचा पती म्हणजे प्राण. वेदामधील जो बृहस्पती तोच पुराणातील गणपती.
ज्ञानेश्वर महाराजांनाही गणपतीच्या विविध अवयवांमध्ये ओंकार दिसला. म्हणून ते म्हणतात-
‘ ‘अ’कार चरण युगुल, ‘उ’कार उदर विशाल
‘म’कार महामंडल, मस्तकाकारें…
हे तिन्ही एकवटले.., तेथ शब्दब्रह्म कवळले
ते मिया श्रीगुरुकृपा नमिले, आदि बीज|’
यालाच संबोधणारे आणखी एक भक्तीगीत आहे-
‘ॐकार स्वरूप गणेशाचे रूप- ‘अ’कार तो ब्रह्मा, ‘उ’कार तो विष्णु, ‘म’कार महेश…
असा हा साडेतीन अक्षरांचा ओंकार – मात्रांचा ॐ – प्रत्येक मात्रेचा वेगळा वेगळा अर्थ निघतो. ‘अ’कार या मात्रेत सृष्टीच्या व्यापकतेचा अर्थ आहे.
‘उ’कारात अंतरिक्ष आणि ‘म’कारात द्युलोक- देवलोक व्याप्त आहेत.
तसेच ‘अ’कार उत्पत्ति सूचक, ‘उ’कार स्थितीसूचक व ‘म’कार लयाचे सूचक आहे.
पू. पांडुरंगशास्त्री याबद्दल सांगतात- जिवात्म्याच्या तीन स्थितीत – विश्‍व, तेजस आणि प्राज्ञ ही अनुक्रमे अकार, उकार आणि मकार यांनीच व्याप्त होतात.

  • ओंकारात ‘अ’कारावर भर दिला तर आधिभौतिक ऐश्‍वर्याची प्राप्ती होते.
  • ‘उ’कारावरचा भार आधिदैविक सामर्थ्याचे सूचक.
  • ‘म’कारावर ध्यान केंद्रित केले तर ब्रह्माच्या साक्षात्कारात सहाय्यभूत होते. त्याच्याद्वारे जीवनाची सार्थकता साधता येते. जीवन अमृतमय बनते.
    प्रत्येक मानवाला आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक – या तिन्ही पैलूंची अत्यंत गरज आहे. मानव विविध कर्मे करतो. इंद्रियांकडून, मनाकडून, बुद्धीकडून. या तीनही कर्मांना ओंकार प्रभावी व तेजस्वी बनवतो. अर्थात त्याचा अंतर्बाह्य योग्य रीतीने विनियोग करणे आवश्यक आहे,
    शेवटची अर्धी मात्रादेखील गुह्य आहे. ती ह्या तिन्ही मात्रांच्या सहयोगाची सूचक आहे. ती प्रत्येकाची सहिष्णुता व सर्वव्यापी भागवत तत्त्वाची सूचना देते. तेजस्वी व पाप-पुण्यापासून अलिप्त अशा शांत आत्म्याचे ती प्रतीक आहे.
    ‘ॐ’चे तत्त्वज्ञान फार विस्तृत आहे. अनेक तत्त्वज्ञानींनी त्यावर विवेचन केलेले आहे. प्रत्येक योगसाधक अनेकवेळा ‘ॐ’चा उच्चार करतो. कधी फक्त ॐ, कधी अ-उ-म तर कधी विविध प्रार्थनांच्या सुरुवातीला किंवा मध्ये. प्रत्येक साधकाने जर ॐचा सखोल अभ्यास केला, शास्त्रशुद्ध वापर केला तर पुष्कळ आनंद मिळेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

आजच्या या भयानक अशा कलियुगात ओंकारसाधना अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रत्येक जाणकाराचे मत आहे.
सर्व योगसाधकांना याबद्दल ज्ञान आहेच म्हणा. ते तशी साधना अवश्य करीत आहेत याची मला खात्री आहे. नाहीतर फक्त ज्ञान काय उपयोगाचे? (संदर्भ ः संस्कृती पूजन- पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रवचनांवर आधारित).