मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी

0
115

भारतातील अनेक हल्ल्यांचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात भारताच्या कूटनीतीला एका दशकानंतर यश आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (युएनएससी) काल दि. १ मे रोजी मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. भारताचा हा मोठा विजय मानला जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरील निर्णयाचे स्वागत केले असून भारताच्या १२५ कोटी जनतेचा हा विजय असल्याचे म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याची माहिती यासंदर्भात ट्विट करून दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या मंजूर यादीमध्ये मसूद अझहरचा आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून समावेश करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. युएनएससीत ज्यांनी भारताला साथ दिली त्या सर्वांचे त्यांनी आभारही मानले आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताकडून चौथ्यांदा मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे यासाठी प्रस्ताव मांडला होता. यापूर्वी तीन वेळा चीनने आपला विटो विशेषाधिकार वापरत या प्रस्तावाला विरोध केला होता. मात्र, यंदा पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या या मागणीला अमेरिका, फ्रान्स, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसह अनेक देशांनी पाठिंबा दिला. आंतरराष्ट्रीय दबावामुळे चीनला आपल्या भूमिकेत बदल करत नरमाईची भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे कायम पाकला पाठिंबा देणार्‍या चीननेच माघार घेतल्याने पाकिस्तानला चांगलाच दणका बसला आहे.

भारताने यापूर्वी २००९, २०१६, २०१९ मध्ये मसूद अझहरवर बंदी घालण्यात यावी यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडला होता. मात्र, यावेळी भारताच्या या प्रयत्नांना यश आले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर आता मसूद अझहर पाकिस्तान सोडून इतर कुठल्याही देशात जाऊ शकणार नाही. संयुक्त राष्ट्रांच्या कुठल्याही सदस्य देशाला मसूदला अर्थपुरवठा किंवा हत्यारे पुरवता येणार नाहीत. यामुळे मसूदची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे कंबरडे मोडले जाणार आहे.

भारताच्या कूटनीतीचे मोठे यश

>> १२५ कोटी भारतीय जनतेचा विजय : मोदी

मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताच्या प्रयत्नाला साथ दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय समुदायाचे आभार मानले असून हा भारताच्या १२५ कोटी जनतेचा विजय असल्याचेे म्हटले आहे. या निर्णयामुळे आता पाकिस्तान सरकारवरील देशांतर्गत दबावही वाढेल, असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी काल जयपूर येथील प्रचारसभेत बोलताना केले. यावेळी त्यांनी दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. गेल्या काही काळापासून पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण आणि तरुणांच्या बरबादीमुळे नागरिकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. हे सुजाण नागरिक पाकिस्तानच्या दहशतवादी दृष्टिकोनाचा विरोध करताना दिसत आहेत. मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित झाल्याने या प्रक्रियेला आणखीनच गती येईल. त्यामुळे पाकिस्तानातील नागरिकच सरकारवर दबाव आणतील, असे मोदी म्हणाले.