मगोचे तळ्यात मळ्यात

0
39

राजकारणामध्ये कोणीही कोणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो व सत्तेसाठी वाट्टेल तशा तडजोडी करता येतात हेच शेवटी खरे असते असे आम्ही मगो – भाजप नेत्यांमधील वाक्‌युद्धाच्या पार्श्वभूमीवर म्हटले होते. एकीकडे मुख्यमंत्री ज्या सुदिन ढवळीकरांना जाहीर व्यासपीठावरून ‘स्वार्थी’ संबोधतात, टीकेची झोड उठवतात, त्यांनाच दुसरीकडे विनय तेंडुलकर मनधरणी करून मुंबईत देवेंद्र फडणवीसांना भेटायला लावतात, याचा अर्थ हाच होतो. ज्या मगोला सरकारमधून हाकलले, ज्यांचा पक्ष फोडून दोघांना आपल्यात घेतले, अशा मगोशीच पुन्हा एकवार हातमिळवणी करण्यास भाजपचे श्रेष्ठी अजूनही अशी उत्सुकता दाखवत असतील तर त्याचा अर्थ भाजपचा स्वबळावर पुन्हा सत्तेत येण्याचा आत्मविश्वास आता डळमळू लागला आहे असा होतो. मगोशी युती केल्याशिवाय पर्याय नाही असे मानणारा भाजपमधील एक वर्ग अशा युतीसाठी आग्रही आहे आणि त्यामुळेच पक्षश्रेष्ठी अशा युतीची संभाव्यता अजूनही चाचपत राहिले आहेत. भाजपने तीनवेळा आम्हाला दगा दिला असताना चौथ्यांदा त्यांच्याशी हातमिळवणी करणे म्हणजे आत्मघातच ठरेल असे जरी ढवळीकर सांगत असले तरी उद्या गोवा भेटीवर येणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी युतीचे निमंत्रण दिले तर ढवळीकर ते नाकारू शकणार आहेत का?
भाजप आणि मगोचे नाते ‘तुझे माझे जमेना, पण तुझ्यावाचून करमेना’असे असल्याचे आम्ही यापूर्वी म्हटले होते आणि तसेच ते आहे. भाजपला सध्याच्या गोव्याच्या राजकीय दलदलीमध्ये विचारधारेच्या आधारावर सोबत घेण्याजोगा एकमेव पक्ष आहे तो म्हणजे मगो. त्यामुळे विरोधकांशी एकाकी लढण्यापेक्षा मगोसारख्या अजूनही काही मतदारसंघांमध्ये बर्‍यापैकी पाठिंबा असलेल्या पक्षाला सोबत घेतल्यास त्याचा फायदा सन २०१२ प्रमाणे पुन्हा होऊ शकतो ह्याची भाजप नेतृत्वाला जाणीव आहे. घाऊक पक्षांतरांतून सोबत आणलेल्या नेत्यांच्या बळावर आपण सहजपणे स्पष्ट बहुमताने पुन्हा सत्तेवर येऊ हा अतिआत्मविश्वास पक्षात काहींना जरी असला तरी त्याबाबत एकवाक्यता नाही. सरकारने ‘सरकार तुमच्या दारी’ सारखा जनसंपर्काचा प्रयत्न आता शेवटच्या क्षणी चालवला असला तरी राज्यात सरकारविरोधी वातावरण आहे हेही ते नाकारू शकत नाहीत. पक्षांतर्गत सर्वेक्षणेही हेच सूचित करीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत विरोधक एकत्र येण्याचा जसजसा प्रयत्न करीत आहेत, तसतशी भाजपची अस्वस्थता वाढत चालली आहे. त्यामुळे येणार्‍या काळामध्ये मोठ्या आश्चर्यकारक घडामोडीही संभवतात.
दुसरीकडे कॉंग्रेस पक्ष जरी स्वबळाच्या बाता मारत असला तरी राज्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने पालटत चालली आहेत. आधी आम आदमी पक्षाच्या दमदार आगमनाने आणि मोफत विजेसारख्या आश्वासनांनी निवडणुकीचे रंग पालटले होते. आता तृणमूल कॉंग्रेसच्या आगमनानंतर पुन्हा निवडणुकीचे रंग बदलले आहेत. तृणमूलसारखा पक्ष गोव्यात नवखा असला तरी प्रशांत किशोर यांच्यासारखे निवडणूक चाणक्य त्याच्या पाठीशी असल्याने कोणाला सोबत घ्यायचे त्याचे पक्के आडाखे त्यांनी बांधले आहेत. त्यामुळेच गोवा फॉरवर्ड, तृणमूल एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. मगोलाही त्या आघाडीत सामील व्हायला अर्थातच स्वारस्य आहे. परंतु येणार्‍या निवडणुकीनंतर कोणाची सत्ता येईल ह्याचा अंदाज येत नसल्याने सध्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्रपल्लवीला प्रतिसाद देत कुंपणावर राहणेच मगोने पसंत केलेले आहे. विरोधक एकजुटीने लढणार असतील तर मगो भाजपसोबत जाणे टाळील आणि विरोधक स्वतंत्रपणे लढणार असतील तर मतविभाजनाचा फायदा भाजपला मिळणार असल्याने मगोला भाजपशी हात जुळवायला आवडेल असे एकूण चित्र सध्या दिसते आहे. निर्णयाची हवी तशी फिरवाफिरवी करायला पक्षाच्या संसदीय समितीचा आधार आहेच. मगोचे आजवर बारा मतदारसंघांमध्ये काम आहे. येत्या निवडणुकीनंतर आपल्या टेकूची गरज सत्तेवर येणार्‍यांना भासायची असेल तर त्यासाठी पुरेशी संख्या यावी यासाठी इतर पक्षांशी हातमिळवणी करणे गरजेचे आहे याचे भान मगो नेत्यांना आहे. त्यामुळेच अगदी ‘आप’पासून भाजपपर्यंत आणि कॉंग्रेसपासून तृणमूलपर्यंत जो भेटायला येईल वा बोलावील त्याच्याशी चर्चा करण्यास मगोने दारे सताड उघडी ठेवलेली दिसतात. ती अर्थातच निवडणुकीनंतर कोणत्याही प्रकारे आगामी सत्तेत वाटा मिळवण्यासाठी आहे. ज्यांच्याशी निवडणूकपूर्व युती केली त्यांचे सरकार येत नसेल तर निवडणुकीनंतर मगो त्यांच्यासोबत राहील याची मुळीच शाश्‍वती नाही. शेवटी प्राधान्य सत्तेत शिरण्याला आहे! मगोचे तळ्यात मळ्यात हेच सूचित करते.