भारतीय गायीचे अर्थशास्त्र

0
614
  • डॉ. उदय देशमुख

सरकारने विविध प्रकारच्या सवलती देऊनसुद्धा गोपालन हा तोट्याचा विषय बनला आहे. कारण आज गोपालन व शेती हे एकमेकांस पूरक व्यवसाय म्हणून बघितले जात नाहीत. बहुतेक लोकांना गायीच्या दुधाला मूल्य मिळते एवढेच माहिती असते; परंतु ‘गोमय’ आणि ‘गोमूत्र’ यांपासून दुधापेक्षाही अधिक अर्थलाभ करून घेता येतो, हे माहीत नाही. त्यामुळे स्वावलंबी गोशाळा आपल्या गोव्याच्या प्रत्येक गावात जर कार्यरत होऊ शकल्या तर गोव्यातील भटक्या गुरांचा विषय एका चांगल्या पद्धतीने सुटू शकतो आणि त्याचबरोबर स्वयंरोजगार व ग्राम विकासासाठी हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो.

 

‘गोमंतक’ वा ‘गोवा’- आपल्या राज्याच्या नावातच ‘गो’ आहे. हेच तर कारण नसेल की आज शहर असो किंवा गाव, समुद्रकिनारी व मार्केट, कचराकुंडी भोवती, रस्त्याच्या बाजूला, ग्राऊंड व फूटपाथवर सर्वत्र ‘गो’ वंशज दिसत आहेत. भारतीय संस्कृतीत गायीची पूजा केली गेली कारण ती चार पुरुषार्थ- धर्म, अर्थ, कर्म आणि मोक्ष पूर्ण करण्यात उपयुक्त ठरली. गोरानात फिरत, चरत गोमातेने गोमय (शेण) दिले, ज्यामुळे जमिनीचे आरोग्य टिकून राहिले. हा धर्म आहे. गोमातेने दूध दिले आणि बैल तयार केले, यातून पीक घेतले गेले, हा अर्थ आहे.

गोमातेच्या दुधात सॉलिड नॉन फॅट जास्त आहेत. हे विशेषतः बुद्धिमत्तेच्या विकासासाठी व मनुष्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. गायीचे दूध पिण्याने लोकांचे आरोग्य चांगले राहाते, हे कर्म आहे. गोमातेच्या स्पर्शाने मनुष्याला देवाकडून संपर्क साधला जातो, हे मोक्ष झाले. मनुष्याला गोमातेपासून चारही साध्य करण्यात मदत झाली.

पुरातन काळापासून भारताची समृद्धी गोधनावरच अवलंबून राहिली आहे. आदिकाळापासून भारतातील प्रत्येक घरामध्ये गाय होती. प्रत्येकजण गोमातेचे दूध पीत असे. या दुधामुळे माणसे निरोगी, बुद्धिमान आणि बलशाली होती. गोमूत्र आणि गोमय यांचा वापर शेतीमध्ये होत असे. त्यामुळे झाडेझुडपेही रोगमुक्त आणि सशक्त होती. भारताची अर्थव्यवस्था गोमातेवर आधारित होती.
गेल्या ५० वर्षांत गायीच्या अर्थशास्त्रात मोठे बदल घडले. पूर्वी गायी चारा त्यांचं पोट भरण्यासाठी खात. त्यांना अतिरिक्त अन्न देणे आवश्यक नव्हते. गवताचे रूपांतर दुधात आणि शेणात व्हायचे. शेणाचा वापर शेतीसाठी केला जायचा. देशी गायी सोडून दुग्धव्यवसायी संकरित गायी गोठ्यात फक्त स्टॉल ग्रेन फीडिंग करू लागल्या. परिणामी गवत चरण्यासाठी गाय उपलब्ध नाही. आता गाय फक्त पशुखाद्यावर अवलंबून राहिली. चरत नसल्याने शेणाची क्वालिटी घटली. उपलब्ध शेणखत हे ‘खत’ म्हणून पुरेसे नसल्याने शेतकर्‍यांना रासायनिक खतांचा अवलंब करावा लागतो. गाय वाढवण्याची गरज संपली, कारण सरकारी अनुदाने दुग्धव्यवसायासाठीच देण्यात आली. पूर्वीच्या गोचर जमिनी आज राहिल्या नाही. ट्रॅक्टर आला आणि आपण नांगर सोडले. शहरातील नोकर्‍यांमुळे गावातून पळ काढला गेला आहे. गावात कामगार उपलब्ध नाहीत. परिणामी गोमातेचा सांभाळ करणं कठीण आहे. गायींना चरायला आवडते, पण गोचर जमीन जवळजवळ विलुप्त झाली आहे. आणि दुर्दैवाने हा देशी गोवंश आज आपल्याला सर्वत्र भटकताना दिसत आहे.

देशी गोवंश भारतातून लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. दुधाची वाढती मागणी भागवण्यासाठी जर्सी, होलस्टिन फ्रेसीएन यांसारख्या विदेशी गायी मोठ्या प्रमाणात जोपासणे चालू आहे. विदेशी गायीच्या दुधात आरोग्याला अतिशय हानीकारक असे प्रथिन ‘बीसीम-७’ (बेटाकेसोमोरफीन-७) असते. याचा शोध १९९३ मध्ये न्यूझिलंडमध्ये शास्त्रज्ञांनी लावला अन् या दुधाला ए-१ प्रकारचे दूध असे म्हणतात. हे दूध मधुमेह, ऑटिसम, हृदयरोग, त्वचारोग, दमा, ऍलर्जी, रोगप्रतिकार शक्ती व पचन क्षमता कमी करणे यांसारखे विकार निर्माण करते. काहीवेळा या दुधामुळे जन्मजात बालकांचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो.

भारतीय वंशाच्या गायींच्या दुधामध्ये विषारी प्रथिन नसल्याने न्यूझिलंडसारख्या देशामध्ये भारतीय गायी जोपासण्यात येत आहेत. देशी गायीचे दूध आरोग्यदायी व रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे असते हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. या आपल्या देशी गायीच्या दुधाला ए-२ असे म्हणतात.
आज शेती न करता केवळ दुधासाठी गोपालन केल्यामुळे ‘गाय म्हणजे तोटा’ असे चित्र निर्माण झाले आहे. सरकारने विविध प्रकारच्या सवलती देऊनसुद्धा गोपालन हा तोट्याचा विषय बनला आहे. कारण आज गोपालन व शेती हे एकमेकांस पूरक व्यवसाय म्हणून बघितले जात नाहीत. बहुतेक लोकांना ‘गायीच्या दुधाला’ मूल्य मिळते एवढेच माहिती असते; परंतु ‘गोमय’ (शेण) आणि ‘गोमूत्र’ यांपासून दुधापेक्षाही अधिक अर्थलाभ करून घेता येतो, हे माहीत नाही.
भारतीय देशी गायीचे अर्थशास्त्र

१. केवळ दुधाची विक्री न करता तूप आणि ताक यांच्यापासून औषधांची निर्मिती केल्यास जास्त आय मिळते. सामान्यतः एक देशी गाय प्रतिदिन दोन लिटर दूध देते. तीस लिटर दुधाचे दही लावून, ते घुसळून, त्यातून लोणी काढून तूप केल्यास एक लिटर तूप मिळते. म्हणजे एका गायीपासून प्रतिमास दोन लिटर तूप मिळते. तुपापासून औषध बनवल्यास एका लिटरला सुमारे सहा हजार रुपये इतका दर मिळतो. म्हणजे एका महिन्यात केवळ तुपाद्वारे बारा हजार रुपये मिळू शकतात. तूप काढताना शिल्लक राहिलेल्या ताकापासूनही औषधी बनवता येते त्यातूनही आय मिळते.

२. दूध न देणारी भाकड गायसुद्धा तिचे गोमूत्र व गोमय (शेण) यांद्वारे गोपालकाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवू शकते. एक गाय एका रात्रीत तीन लिटर गोमूत्र देते. तीन लिटर गोमूत्रापासून दीड लिटर गोमूत्र अर्क बनतो. चांगल्या प्रतीच्या गोमूत्र अर्काचे मूल्य दोनशे ते तीनशे रुपये प्रति लिटर एवढे आहे. तर खर्च वगळता एका महिन्याला एक गाय रु. ९००० आय करून देऊ शकते.
गोमूत्र अर्क बनवल्यावर जो गाळ शिल्लक राहतो त्यापासून गोमूत्राच्या गोळ्या बनवता येतात. त्याला ‘घनवटी’ म्हणतात. १०० ग्राम घनवटीचे मूल्य रु. ३०० एवढे आहे. गोमूत्र अर्क आणि घनवटीद्वारे प्रतिमास रु. २७०००/- मिळू शकतात. याचप्रमाणे गो-मलम, केश शॅम्पू व साबणसुद्धा या गाळापासून बनतो.

३. गोमूत्राचा उपयोग शेतीला उपयोगी असे सेंद्रिय किटकरोधक बनवण्यासाठी करता येतो. १ लिटर किटकरोधकमध्ये ९ लिटर पाणी घालून १० लिटर द्रव बनतो, जो एक चतुर्थांश एकर भूमीमध्ये फवारणीसाठी पुरेसा होतो. याप्रमाणे एक एकर शेतीसाठी ४ लिटर गोमूत्र लागते, जे गोमाता आपल्याला दोन रात्रीत देते. म्हणजेच एकरी १००० रुपयांचे रसायन वापरून होणारे कार्य दोन रात्रीच्या गोमूत्राने साध्य होते. म्हणजेच प्रतिदिन ५०० रुपये या भावाने प्रतिमास रु. १५,०००ची बचत होते.

४. गोमय (शेण) औषधांमध्ये वापरतात. गोमय गौर्‍या बनवून त्यापासून गोमय भस्म बनवतात. एका दिवसाच्या (१० कि.ग्रा.) गोमायापासून अर्धा किलो भस्म बनते. या भस्माचे मूल्य रु. ३००/- प्रतिकिलो आहे. याप्रमाणे औषधी गोमय भस्माचे मासिक रु. ४५००/- उत्पन्न मिळू शकते.

५. गोमयापासून अन्य औषधे, गृहोपयोगी वस्तू आणि सौंदर्यप्रसाधने बनवू शकतो. याशिवाय गोमयापासून वेदनाशामक तेल, लेप, धुपबत्ती, डासरोधक उदबत्ती इत्यादी व्यवहारोपयोगी वस्तूही बनवता येतात. यांद्वारे जास्त अर्थिक लाभ होतो.

६. गोबरगॅसचा इंधनासाठी वापर करता येतो. आज गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडत आहेत. अशा परिस्थितीत गोबरगॅस हा अमूल्य असा इंधनसाठा आहे.

७. शेतीसाठी गोमयाचा वापर केल्यास शेतकरी फक्त रासायनिक खतांचा मोठा खर्चच नाही वाचवत तर रासायनमुक्त उत्पन्न काढून स्वतःच्या व समाजाच्या स्वास्थ्यउन्नतीसाठी एक उदाहरण होऊ शकतो.

८. कीटकांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गोमूत्राची फवारणी केल्यास कीटक मरून न जाता पळून जातात. गोमूत्राच्या फवारणीमुळे मित्र कीटकांच्या संख्येत वाढ होते आणि असे कीटक शत्रू कीटकांचा नाश करतात. गोमूत्र अत्यंत स्वस्त आणि सुरक्षित आहे. सेंद्रिय शेतीमध्ये येणार्‍या पिकांमध्ये नैसर्गिक आपदांना झेलण्याची क्षमता असते.

९. सेंद्रिय शेती खरोखरच लाभदायक आहे. आजकाल सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या अन्नधान्याला व भाजीपाल्याला मोठी मागणी असून भावही उत्तम आहे. गोपालन हा सेंद्रिय शेतीचा गाभा असल्याने सेंद्रिय शेतीसाठी गोपालन अनिवार्य आहे.

१०. गोपालन, सेंद्रियशेती तसेच पंचगव्य औषधी निर्मिती करण्यासाठी गोपालकाला गायीच्या पंचगव्यांची वैशिष्ट्ये आणि त्यांचे गुणधर्म माहीत असणे आवश्यक आहे.
एक गाय सामान्यपणे प्रतिदिन २ लिटर दूध, ३ लिटर गोमूत्र, १० किलो गोमय म्हणजे शेण देते. गोमूत्र आणि गोमय यांचा औषधे बनवण्यासाठी वर्षभरात ९ मास, तर शेतीसाठी कीटकरोधक आणि खाते बनवण्यासाठी ३ मास वापर करता येतो. गाय एकदा व्याल्यावर ७-८ महिने दूध देते. दूध, गोमूत्र आणि गोमय या सर्वांचा वरीलप्रमाणे सदुपयोग केल्यास एक गोमाता आपल्याला वर्षभरामध्ये न्यूनतम ३ लाख रुपयांचे निवळ उत्पन्न मिळवून देऊ शकते.

गो विज्ञान अनुसंधान केंद्रामध्ये मी जवळ जवळ २२ वर्षांपासून पंचगव्य आयुर्वेदमध्ये काम करत आहे. असाध्य व जुनाट रोगांवर पंचगव्य औषधे गुणकारी ठरत आहेत. यामध्ये कॅन्सरपासून, एकझेमा, सोरायसिस पूर्णपणे बरे झाले आहेत. गो-उत्पादने जसे गोनायल, धूपबत्ती, मच्छरबत्ती, साबण, गोमय शॅम्पू इत्यादी बनवण्याचे आम्ही मोफत प्रशिक्षण देत आहोत. गोमूत्रामध्ये अँटी-कॅन्सर, अँटी-मायक्रोबीएल, अँटी-फंगल गुणधर्म असल्याचे सिद्ध केले असून या संस्थेकडे ४ पेटंटही आहेत.
सावई-वेरे या लहानशा गावात लिव्ह सिनेरजी ट्रस्ट, ग्रामपंचायत वेरे-वाघुर्मे व गोवा राज्य पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गोलोक गोसेवा आश्रम’ यामार्फत भटक्या गुरांचा सांभाळ व संगोपन करून गोमूत्र, गोमय यांपासून विविध गोउत्पादने जसे गोमूत्र अर्क, गोनायल, धूपबत्ती, मच्छरबत्ती, साबण, गोमय शॅम्पू इत्यादी तयार करून येथे दोन वर्षे कार्यरत आहे. अशा स्वावलंबी गोशाळा आपल्या गोव्याच्या प्रत्येक गावात जर कार्यरत होऊ शकल्या तर गोव्यातील भटक्या गुरांचा विषय एका चांगल्या पद्धतीने सुटू शकतो आणि त्याबरोबर स्वयंरोजगार व ग्राम विकासासाठी हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो.