प्रजासत्ताकदिनी तिरंग्याच्या अपमानाने देश दुःखी ः मोदी

0
190

>> पंतप्रधानांचे ‘मन की बात’मध्ये खंत

दिल्लीत प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारी रोजी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितले. काल आकाशवाणीवर ‘मन की बात’ कार्यक्रमात देशातील नागरिकांशी संवाद साधताना मोदींनी वरील वक्तव्य केले.

यावेळी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी, मी नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलेलाच मुद्दा पुन्हा एकदा सांगू इच्छितो. शेतकरी आणि सरकार यांच्यात अंतिम तोडगा भलेही निघाला नसेल, पण सरकार शेतकर्‍यांसमोर पर्याय ठेवत आहे. शेतकर्‍यांनी यावर चर्चा करावी. शेतकर्‍यांपासून आपण फक्त एका कॉलच्या अंतरावर असल्याचे सांगितले.

दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान उफाळलेल्या हिंसाचारामुळे व लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमात भाष्य केले. यावेळी मोदी यांनी, आपल्याला येणार्‍या काळाला आशेने सामोरे जायचे आहे. नावीन्याने त्याचे स्वागत करायचे आहे असे सांगून आपण मागील वर्षी असाधारण संयम व धैर्याचा परिचय दिला. या वर्षात कठोर मेहनत घेऊन आपल्याला संकल्प पूर्ण करायचे आहेत. आपल्या देशाला अधिक गतीने पुढे न्यायचे असल्याचे आवाहन केले.

काल जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार होता. तसेच यंदाच्या नवीन वर्षातील हा पहिलाच कार्यक्रम होता. पंतप्रधान मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होत असतो.