पोटनिवडणूक जिंकली; खुर्ची वाचली

0
36

>> भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जींचा विजय

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी आपली मुख्यमंत्रिपदाची खुर्ची राखली आहे. भवानीपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी विजय संपादन केला. त्यांनी भाजपच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल यांचा तब्बल ५८ हजार मतांनी पराभव केला. त्यांच्या या विजयानंतर तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

भवानीपूरमधील पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी ५७ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. या निवडणुकीत बॅनर्जी यांच्यासमोर भाजपच्या प्रियांका टिबरेवाल आणि सीपीएमचे श्रीजीव विश्वास यांचे आव्हान होते.

ममता बॅनर्जी यांनी मतदानाच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. त्यांनी पहिल्या फेरीत १२ हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर जल्लोष सुरू केला. ममता बॅनर्जी यांना १ लाख १५ हजार मते मिळाली. दक्षिण कोलकात्याचा भाग असलेल्या भवानीपूर मतदारसंघातील सर्व प्रभागांतून बॅनर्जी यांना मताधिक्य मिळाले हे विशेष. इतक्या मोठ्या मताधिक्यांने मिळालेला हा विजय एक विक्रम आहे. या विजयानंतर बॅनर्जी यांनी भवानीपूरच्या सर्व मतदारांचे आभार मानले.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर झाला होता. त्यात ममतांच्या नेतृत्वाखाली तृणमूलला घवघवीत यश मिळाले होते; मात्र स्वत: ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममधून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतरही ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे सहा महिन्याच्या आत त्यांना विधानसभेवर निवडून येणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांनी आपल्या पारंपरिक मतदारसंघातून म्हणजे भवानीपूरमधून निवडणूक लढवण्यास प्राधान्य दिले. या ठिकाणचे आमदार सोभान देव चटोपाध्याय यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि ममता बॅनर्जी यांची वाट मोकळी करून दिली होती.