पुण्यात कंटेनरची ४८ वाहनांना धडक

0
14

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावरील नवले पुलावर अपघातांचे सत्र कायम असून, रविवारी रात्री या पुलावर झालेल्या अपघातात कंटेनरचालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी त्याच्या धडकेने ४८ वाहनांचे नुकसान झाले असून, या अपघातात जखमी झालेल्यांपैकी सात ते आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची संख्या सुमारे ३५ ते ४० होती, त्यापैकी किरकोळ जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

बाह्यवळण मार्गावरुन सदर कंटेनर मुंबईकडे वेगाने निघाला होता. नवले पुलाजवळ तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने रात्री नऊच्या सुमारास एका मागोमाग ४८ वाहनांना धडक दिली. त्यानंतर तो रस्त्याच्या कडेला जाऊन धडकला. या अपघातानंतर परिसरात घबराट उडाली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला काढली, तसेच वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले. या अपघातात दुचाकी, कार, रिक्षा आणि टेम्पोचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर बाह्यवळण मार्गावर मोठी कोंडी झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना झाली नसल्याचे समोर आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकार्‍यांनी केलेल्या तपासणीनंतर ही माहिती समोर आली. चालकाने उतार असल्याने इंजिन बंद केले होते आणि गिअर न्यूट्रल करत तो कंटेनर चालवत होता; पण वेळेवर ब्रेक दाबू न शकल्याने त्याने ४८ गाड्यांना धडक दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली