पुढील तीन महिन्यांत अत्यंत सतर्क राहा

0
57

>> कोरोनाबाबत केंद्र सरकारचे जनतेला आवाहन

पुढील तीन महिन्यात विविध प्रकारचे सण असून या काळामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याचे आवाहन केंद्राकडून करण्यात आले आहे. देशभरात वेगाने लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जात असताना रोज आढळणार्‍या नव्या कोरोनाबाधितांचा आकडाही कमी होत आहे. मात्र तरीही तज्ज्ञ तिसर्‍या लाटेची शक्यता व्यक्त करत आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग जरी वाढला असला, तरी तिसर्‍या लाटेला टाळण्यासाठी पुढील तीन महिने नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये काल हे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणे गरजेचे असल्याचे मत आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केले. सध्या दिवसाला कोरोनाचे सरासरी २० हजार नवे बाधित आढळत आहेत. गेल्या आठवड्यात यापैकी ५६ टक्के रुग्ण हे एकट्या केरळमध्ये सापडले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

दरम्यान, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांत आपण अधिक सतर्क राहायला हवे. गर्दीची ठिकाणे किंवा विनाकारण प्रवास आपण टाळायला हवा. घरी राहून व्हर्च्युअल पद्धतीने सण-उत्सव साजरे करावेत, ऑनलाईन शॉपिंग करावी, असे आवाहन श्री. अग्रवाल यांनी केले आहे.

७१ टक्के नागरिकांना
कोरोनाचा पहिला डोस

दरम्यान, यावेळी लसीकरणाबाबत बोलताना अगरवाल यांनी, देशात आत्तापर्यंत ७१ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आलेला असून २७ टक्के नागरिकांना लशीचा दुसरा डोस देण्यात आलेला आहे अशी माहिती दिली. देशातील कोरोनाच्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत २२ हजार ४३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तींची संख्या ३ कोटी ३८ लाख ९४ हजार ३१२ एवढी आहे. सध्या २ लाख ४४ हजार १९८ सक्रिय रुग्ण आहेत. हे प्रमाण गेल्या ७ महिन्यांत सर्वात कमी आहे.