पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेतील चुकीबाबत राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त

0
5

बुधवारी पंजाब दौर्‍यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सुरक्षेत झालेल्या चुकीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चिंता व्यक्त केली आहे. याच संदर्भात काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीभवन येथे राष्ट्रपतींची भेट घेतली. तर उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी देखील या संदर्भात मोदींशी चर्चा केली. पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबद्दल नायडू यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी सुरक्षा प्रोटोकॉलचे नियम अधिक कडक पद्धतीने राबवले जावेत असे म्हटले आहे.

राष्ट्रपतीभवनने केलेल्या ट्विटमध्ये रामनाथ कोविंद यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो ट्विट करत, राष्ट्रपती कोविंद यांनी काल राष्ट्रपती भवनात पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बुधवारी झालेल्यासुरक्षेच्या प्रकरणातील चुकीची माहिती घेत गंभीर चिंता व्यक्त केल्याचे म्हटले आहे.

पंजाब सरकार उच्चस्तरीय
समिती स्थापन करणार

पंतप्रधान मोदी यांच्या बुधवारी पंजाब दौर्‍यामध्ये आढळलेल्या सुरक्षेतील त्रुटींबाबत पंजाब सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती तीन दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे. यासोबतच आज सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. न्यायालयाने याचिकेची प्रत पंजाब सरकारला देण्यास सांगितले. त्यावर आज शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

सुरक्षेचा वाद दुर्दैवी ः देवेगौडा
माजी पंतप्रधान एच. डी. देवीगौडा यांनी मोदींच्या सुरक्षेवरून उठलेल्या वादाला अत्यंत दुर्दैवी म्हटले आहे. याबात असं ट्विट करत त्यांनी, भारताच्या सर्वोच्च पदी असलेल्या व्यक्तीच्या सुरक्षेसंदर्भात कोणताच निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही असे म्हटलं आहे.

दोषींवर कारवाई करा ः सोनिया
पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून भाजप आणि कॉंग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. दरम्यान, दौर्‍यामध्ये सुरक्षेची कोणतीही त्रुटी नव्हती, असे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी म्हणाले. दरम्यान कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री चन्नी यांच्यासोबत यावर चर्चा करत दोषींवर कारवाई करण्यास सांगितले आहे. सोनिया गांधी म्हणाल्या, पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षतेची पूर्ण काळजी घेणे गरजेचे होती. पंतप्रधानांना पूर्ण सुरक्षाव्यवस्था पुरवणे गरजेचे होते. त्यामुळे दोषींवर कारवाई झाली पाहिजे.