नवीन पिढीला समजून घेताना…..

0
282

– ऋचा केळकर
(वाळपई)

‘‘या नवीन पिढीला कुणाची गरजच नाही जशी, सदान्‌कदा त्या मोबाइलवर नजर खिळवून बसलेली दिसते. ना घरातल्यांशी संवाद ना बाहेर कुणाशी ओळख, कसा निभाव लागेल यांचा… देवच जाणे!’’

‘‘ही आजकालची मुलं… दिवसाचं घड्याळ उलटं फिरतंय यांचं. रात्री तीन तीन वाजेपर्यंत जागत बसायचं आणि सकाळी ११ वाजता उठायचं’’. बरं परिक्षेच्या दिवसांमध्ये… पहाटे उठणे जमत नाही म्हणून… रात्री जागून अभ्यास केला तर काही हरकत नाही, मी म्हणते. पण परीक्षा संपली की पुन्हा पूर्ववत दिनचर्या सुरू करता येते. पण नाहीच करत ती मुलं, सरळ झोप येत नाही, असं कारण सांगून तीच दिनचर्या पाळतात. आणि आताच्या कोरोनाच्या काळात, जेव्हा सगळ्या शाळा-महाविद्यालये बंदच आहेत, आतासुद्धा ही मुले रात्री तीनपर्यंत जागतात. काय करतात?… सगळेच काही जीवनाला उपयोगी असणार्‍या गोष्टी करत नसतील. काही निव्वळ मनोरंजनात्मक कार्यक्रम बघतात, काही गाणी ऐकतात, काही मित्रपरिवाराशी चॅट करत असतात तर काही अपवादात्मक पुस्तकांचं वाचन करत असतील. ही यांची दिनचर्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहेच, यात कुणाचेही दुमत नसावे. पण मग अनेक वेळा सांगूनही त्यात बदल करण्याकडे कल कुणाचा दिसत नाही याचेच आश्‍चर्य वाटते. त्यामुळे याच्या मुळाशी जाऊन.. असे का घडावे… हा विचार मनातून जाता जात नाही.

मला वाटतं, या मुलांच्या किंवा नवीन पिढीच्या अशा वागण्याला कारणे शोधायची असतील तर साधारणपणे ५० वर्षे आधी आपल्याला जावे लागेल. म्हणजे जेव्हापासून आपल्या समाजातली स्त्री ही अर्थार्जनाच्या उद्देशाने घराबाहेर पडली, तो या काळाचा टर्निंग पॉइंट म्हटला पाहिजे.
आता हे कसं, ते सांगते. प्रत्येक स्त्री ही लग्नापूर्वी स्वतःचा नोकरी-व्यवसाय व्यवस्थितपणे सांभाळू शकते. कारण त्यावेळी घरात तिची आई, बहिणी, निवृत्त झालेले वडील हे सगळेच घरातील जबाबदार्‍या सांभाळत असतात. त्यामुळे ती स्वतःला ऑफिसच्या कामात अगदी झोकून देते. जीव तोडून काम करते. कंपनीत बक्षिसी, वाहवा मिळवते. ही तिची प्रगती तिचे लग्न जमवताना कधी कधी बाधाही बनते तर कधी जमेची बाजू! पण जेव्हा ती मुलगी बोहोल्यावर चढते त्यावेळी तिला आपल्या पुढील व्यावसायिक प्रवासाची जरासुद्धा कल्पना नसते. लग्नानंतरचे सहा महिने ती आपल्या संसारात इतकी रममाण होऊन जाते की तिच्या करिअरवर त्याचा काय परिणाम झाला याचा विचारही तिच्या मनात येत नाही. पण जसजशी ती त्या सासरच्या घरात रुळते, तिची ओढाताण सुरू होते. ऑफिसमध्ये पोचण्याच्या वेळा बिघडतात, कामातील चुकांचे प्रमाण वाढते, त्यामुळे साहजिकच चिडचिड होते आणि तिची मनःस्थिती डगमगते. आणि तशातच जर तिला दिवस गेले तर काही केल्या नोकरी सांभाळून तिची मनःस्थिती आनंदी राहू शकत नाही. आता सुरुवात इथूनच होते. हे सर्व जुन्या-जाणत्या लोकांना माहीत आहे की गरोदर असताना स्त्रीचे मन आनंदी असणे किती गरजेचे आहे! नाहीतर गर्भाच्या वाढ-विकासामध्ये अडथळे उत्पन्न होतात. तो एक वेगळा विषय आहे पण खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर बाळाचा जन्म झाल्यावरही खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी करणार्‍या स्त्रीला खूप अल्पावधीची मॅटर्निटी लीव्ह मिळते. त्यामुळे त्या बाळाच्या भरणपोषणापासून तर संगोपनापर्यंत सगळ्याच गोष्टींमध्ये तिला तडजोड करावी लागते कारण तिच्यासमोर एकाच वेळी तीन मुख्य जबाबदार्‍या असतात- बाळ- नोकरी- नवरा व सासर! नोकरीमध्ये तर तिला कुणी सांभाळून घेणारे मिळेलच याची शाश्‍वती नसते. इकडे नवरा जरी समंजस असला तरी घरातल्या कामांच्या बाबतीत सासरची इतर मंडळी तिला सांभाळून घेतील याची गँरंटी नाहीच. मग तिला फक्त बाळाशी संबंधित गोष्टींमध्येच तडजोडीचा मार्ग दिसू लागतो कारण बाळ त्यावेळी बोलू शकत नसतं.

मग मला सांगा, ज्या वयात बाळाच्या, पर्यायाने अपत्यांकडे २४ तास लक्ष देण्याची गरज असते त्याच काळात आपण पालक त्यांना २०% वेळसुद्धा देतो की नाही याची शंकाच वाटते. तिथून त्या मुलांची दिवस-रात्रीची दिनचर्या बिघडायला सुरुवात होते. कारण सकाळी तर ती नोकरी करणारी आई- कुटुंबातल्या कोणत्याच सदस्याच्या कामी येऊ शकत नाही. ती फक्त स्वतःची तयारी आणि बाळ लहान असेल तर त्याची थोडीफार कामं… ज्यात तिचं पूर्ण लक्ष नसतंच, कारण अर्ध लक्ष तिचं घड्याळाकडे असतं. त्यानंतर दिवसभर त्या मुलाला दुसरंच कुणीतरी सांभाळतं. आईचासहवास लाभण्यासाठी मुलांना संध्याकाळ होण्याची वाट पहावी लागते आणि आई आल्यानंतरच खरा त्यांची दिवस सुरू होतो… कारण त्या वयात मुलांचे सर्वस्व आईच असते, फक्त आई. आणि ती त्यांना निवांतपणे संध्याकाळीच भेटू शकते. मग आता तुम्हीच सांगा, जर मुलांचा दिवस सायंकाळी ६ वाजता जर सुरू झाला तर जर आपण आठ तासांचा दिवस जरी धरला तरी तरी त्यांची रात्र केव्हा होईल?… तर रात्री २ वाजता. असं हे गणित आहे आजच्या पिढीच्या उलट्या दिनचर्येचं. कारण प्रत्येक मूल, मग ते मुलगा असो वा मुलगी, लहानपणापासून संध्याकाळी आपल्या आईची वाट डोळ्यात तेल घालून पाहात असतं. एकतर त्याला जोराची भूक लागलेली असते, दुसरं म्हणजे दिवसभर आई नसतानाच्या इतरांच्या तक्रारी आईला सांगायच्या असतात किंवा दिवसाचा वेळ कसा मजेत गेला, त्या गमतीजमती सांगायच्या असतात. आणि त्यानंतरच त्यांना आईचा सहवास प्राप्त होतो, आईचे प्रेम मिळते. वडलांचेही त्याच वेळेस मिळते हे ओघाने आलेच.
तर अशी घडली आहे नवीन पिढीची उलटी दिनचर्या, त्यामुळे त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. त्यांना देता न आलेला वेळ आता तरी पालकांनी भरून काढावा व त्यांना भरभरून प्रेम द्यावं.