नवरात्रात उपवास कसा कराल?

0
44
  • वर्षा भिडे
    (आहारतज्ज्ञ)

उपवासाच्या दिवशी आहारात द्रव पदार्थांचे प्रमाण भरपूर ठेवा. चहा-कॉफीचे सेवन कमी ठेवून शहाळ्याचे पाणी, लिंबूपाणी आणि ताक यांचे प्रमाण जास्त ठेवा. थोड्या थोड्या अंतराने थोडा थोडा आहार सेवन करा. पुरेसा आराम करा व ध्यान करा.

प्राचीन काळापासून उपवास करण्याची शास्त्रीय पद्धतच अवलंबिली जात आहे. उपवासाच्या काळातील पौष्टीक आहारामुळे शरीर, मन आणि आत्मा यांच्यामध्ये योग्य समन्वय साधला जातो. उपवास काळात आपण स्वस्थ आणि उत्साही राहण्यासाठी आपल्या खाण्या-पिण्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. नवरात्रोत्सव हा नऊ दिवसांचा असून तो ७ ऑक्टोबरपासून सुरू झाला आणि महिषासुर राक्षसावर दुर्गामातेने मिळवलेल्या विजयाची आठवण सर्वांना व्हावी व त्याचा आनंद सगळ्यांनी साजरा करावा हा त्यामागचा उद्देश होय. या सणाच्या काळात अनेक जण देवीवरील श्रद्धेपोटी उपवास करतात.

उपवासाचे प्रकार आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम ः
१) जल उपवास ः नवरात्री काळात लोक फक्त पाणी पिऊन उपवास करतात. या प्रकारात पाण्याशिवाय इतर द्रव जसे चहा, कॉफी, दूध इत्यादी वर्ज्य केले जातात. यामध्ये अन्नसुद्धा ग्रहण केले जात नाही. बर्‍याच लोकांच्या क्षद्धा व संस्कृतीनुसार यामध्ये बदल दिसून येतात.
जल उपवासामुळे तुमच्या शरीरातील मृत पेशीं नष्ट होतात, नवीन पेशी तयार होण्याला प्रोत्साहन मिळते. उच्चरक्तचाप कमी होण्यास यामुळे मदत मिळते आणि कोलेस्टेरॉल कमी होते व रक्तवाहिन्यांचे आजार होण्याचा धोका कमी होतो, पण याचे काही दुष्परिणामही आहेत- जसे डोके हलके झाल्यासारखे वाटणे, गरगरल्यासारखे वाटणे. यामुळे खाण्याचे आजार (इटिंग डिसऑर्डर्स) होऊ शकतात. शिवाय यामुळे शरीरात आहारघटकांची कमतरता होऊ शकते.
२) केवळ एकभुक्त ः काही लोक नवरात्राच्या काळात केवळ एकच वेळचे जेवण घेतात, जे सूर्यास्तानंतर घेतले जाते. या उपवास प्रकारात लोक दिवसातून फक्त एकदाच जेवतात आणि जेवणाची वेळ ही दररोज सारखीच ठेवली जाते.
या उपवासामुळे शरीरातील विषारी घटकांपासून तुम्हाला मुक्ती मिळते आणि शरीरातील दाह कमी होतो. पण तुमच्या दोन जेवणांमधील अंतर जास्त राहिल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी बदलते आणि त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो. एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त आहाराचे सेवन करू शकते कारण भुकेवर त्यांना नियंत्रण मिळवणे कठीण होते आणि याचे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

  • दोन्ही वेळ उपवासाचे पदार्थच सेवन करणे ः
    या उपवास प्रकारात लोक त्यांच्या नित्याच्या जेवणाच्या वेळांवरच आहार घेतात, पण आहारावर बंधने असतात. यापैकी बरेच उपवासाचे अन्नपदार्थ भारतात सर्वसामान्यपणे वापरले जातात. पण काही ठिकाणी टोमॅटोचा समावेशसुद्धा उपवासाच्या पदार्थांत केला जातो.
    या उपवास प्रकारात केवळ विशिष्ट पदार्थच खाल्ले जातात, त्यामुळे शरीरात काही पोषक घटकांची कमतरता निर्माण होते.
    वरील सगळ्या प्रकारच्या उपवासांमुळे शरीराला फायदेच होतात, पण हे करताना अनुभवी व्यावसायिकांंच्या निरीक्षणाखालीच करावे कारण काही व्यक्तींना जास्त वेळ उपाशी राहणे सहन होत नाही.
    उपवासाचे पदार्थ जे उपवास काळात तुमचे पोषण करतात ः-
    १. साबुदाणा – साबुदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कर्बोदके असतात व त्यामुळे चांगली उर्जा मिळते. हा पचायला हलका असतो. दुधासोबत (खीर), शेंगदाणे, लिंबू टाकल्यावर त्याचे आहारमूल्य वाढते. साबुदाण्याची खिचडी ही नित्याच्या उपासामध्ये खाल्ली जाते.
    २. वरईचे तांदूळ किंवा भगर – वरई किंवा भगर किंवा सामा राईस तृप्ती व भरपूर पोषकता देते. यात फायबर जास्त प्रमाणात असतात आणि साखर तांदळापेक्षा तुलनेने कमी असते. त्यामुळे मधुमेहींसाठी योग्य. वरई हे ग्लुटेनमुक्त धान्य असून त्यात संतुलिक कर्बोदके, प्रथिने, फॅट्‌स व विटामिन्स आणि मिनरल्स असतात. उपवासात हा एक उत्तम पौष्टीक घटकांचा स्रोत गणला जातो.
  • मखना (लोटस सीड्‌स) – मखना फुलांमध्ये भपूर प्रमाणात प्रथिने व कर्बोदके असतात. हे तुप्तता देते, भूक भागवते आणि तहानही भागवते. हे एक उत्तम मॅग्नेशियमचे स्रोत असून यात स्निग्ध पदार्थ आणि सोडियम कमी प्रमाणात असते. बटाटा चिप्स खाण्याऐवजी मखना आणि शेंगदाण्यांचा पर्याय बरा.
  • कुटकी (बकव्हीट) – कुटकी सगळ्या आवश्यक पौष्टीक घटकांनी पुरेपूर असते. हे संपूर्ण दिवसभर पुरेल इतकी उर्जा शरीराला प्रदान करते. त्यात सगळी आवश्यक पौषक घटक असतात त्यामुळे उपवासात पोट भरल्याचे समाधान मिळते.
  • शिंगाडे (वॉटर चेस्ट नट) – उपवासात चालणार्‍या भाज्यांबरोबर शिंगाड्याच्या पीठाचा दोसा किंवा इडल्या खा. सगळ्या पोषक घटकांबरोबरच हे शरीराला क्षारता (अल्कधर्म) मिळवून देते. शरीरातील ताण कमी करते.
  • राजगिरा (अमरान्थ) – राजगिरा हे पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे. याच्यामध्ये सगळे आवश्यक अमिनो ऍसिड, कॅल्शियम, फॅट सोल्युबल विटामिन्स तसेच वॉटर सोल्युबल विटामिन्स असतात. उपवासामध्ये यातून संपूणतः पोषण मिळते.
  • भाज्या – दररोज तीन प्रकारच्या तंतुमय भाज्या खाव्या.
  • द्रव पदार्थ – उपवासाच्या दिवशी आहारात द्रव पदार्थांचे प्रमाण भरपूर ठेवा. चहा-कॉफीचे सेवन कमी ठेवून शहाळ्याचे पाणी, लिंबूपाणी आणि ताक यांचे प्रमाण जास्त ठेवा.
  • थोड्या थोड्या अंतराने थोडा थोडा आहार सेवन करा.
  • पुरेसा आराम करा व ध्यान करा.
    अशाप्रकारे या नवरात्रात स्वतःला आनंदी, निरोगी आणि सुखी ठेवा.