नमो अनादिमाया भगवती

0
286

– डॉ. रामचंद्र देखणे

आध्यात्मिक, पौराणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध अंगांनी शारदीय नवरात्राचे पदर उभे राहतात. आजही सामाजिक विकार, विकृती, विषमता, जातीयता, दांभिकता या सार्‍यानं गांजलेल्या समाजात आदर्श जीवनमूल्यं प्रस्थापित करण्यासाठी नवरात्रोत्सव साजरा करताना पुन्हा एकदा त्या आदिशक्तीला ‘बये, दार उघड’ असं आवाहन करायला हवं….

आपल्याकडे विविध देवतांची नवरात्रं साजरी होतात. या नवरात्रामध्ये देवानं आसुरी शक्तींविरुद्ध दिलेल्या कडव्या संघर्षाचं स्मरण करण्याचा परिपाठ बघायला मिळतो. आसुरी शक्ती ज्यावेळी समाजामध्ये उपद्रव माजवतात त्या त्या वेळी देवाला जागर करून त्यांचा नि:पात करावा लागतो. नवरात्रीच्या साजरीकरणामागेही हाच विचार दिसून येतो. युगानुयुगे लोटली तरी हा विचार कालबाह्य झालेला नाही.यामध्ये आदिमाया शक्तीची विविध रुपं पुजली जातात. वर्षभरामध्ये साजर्‍या होणार्‍या अनेक सण-उत्सवांमध्ये देवीच्या विविध रूपांमध्ये पूजा केली जाते. प्रथा-परंपरेप्रमाणे व्रतवैकल्यादी उपचार करून देवीची आराधना केली जाते. मात्र देवीचा वर्षभरातील सर्वांत मोठा जागर घुमतो तो शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने… सलग नऊ दिवस, नऊ रात्र देवीने असुरांविरुद्ध जागर मांडला, रणभूमीवर सूर-असुरांचा कडवा संघर्ष घडून आला, बलशाली असुरांनी देवीचा प्रतिकार करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला मात्र या दशभुजेच्या बाहुबलापुढे त्यांच्या शक्ती थिट्या पडल्या. विजयादशमीला आदिमाया आदिशक्तीने विजयपताका ङ्गडकावली आणि महिषासुराचा वध झाला. आधीच्या युगामध्ये घडलेली पुराणकथांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचलेली ही एक घटना पण तिचा प्रभाव आजदेखील पहायला मिळतो. आसुरी शक्तींचा सुळसुळाट प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक समाजरचनेमध्ये उपद्रवी ठरत असतो. त्यांचा पाडाव करण्यासाठी कोणा न कोणाला संहारकाचं रूप धारण करावं लागतं. सदर पौराणिक कथेमध्ये हे रूप सुकुमार, त्रिभुवनसुंदरी देवीनं घेतलं होतं. नऊ दिवस सुरू असणार्‍या युद्धामध्ये रणरागिणीचं रूप घेऊन तिने समस्त जगाला स्त्री-शक्तीचा परिचय घडवून दिला. तिचा हा विजयोत्सव शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आजही उत्साहात साजरा होतो. केवळ याच युद्धाची स्मृती म्हणून नवरात्र साजरं होतं असं नाही तर आसुरी शक्तींविरुद्ध दैवी शक्तींना युद्ध पुकारावं लागलं त्या प्रत्येक घटनेची स्मृती म्हणून नवरात्राचा जागर करणं हा आपल्या संस्कृतीच्या, समाजमनाच्या औचित्याचा भाग बनला असल्याचं दिसून येतं.  भगवान शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणिमल्ल या दैत्याचा संहार केला. त्याची स्मृती म्हणून खंडोबाचं नवरात्र सुरू झालं. रामाचं नवरात्रदेखील याच औचित्यानं साजरं होतं. अशी आणखीही काही उदाहरणं देता येतील.देवीच्या शारदोत्सवात आदिशक्ती भगवती विविध रूपानं नटली आहे. महाराष्ट्रात जगदंबा, भवानी या नावाने ती प्रसिद्ध आहे तर बंगालमध्ये तीच देवी दुर्गेचं रूप धारण करते. कर्नाटकमध्ये रेणुका किंवा यल्लम्मा तर म्हैसूर प्रांतात ती चामुंुडादेवी या नावानं प्रसिद्ध आहे. दुर्गेच्या रूपात महिषासुरमर्दिनी सिंहारूढ आहे. वैकुंठात महालक्ष्मी, गोलोकात राधिका, शिवलोकात पार्वती आणि ब्रह्मलोकात सरस्वती या रूपात ती नांदत आहे. तिच्यापासून प्रकृती पुरुषात्मक जगत उत्पन्न झालं आहे. ती दैवीरुपात आसुरांचा आणि आध्यात्मिक रूपात अज्ञानाचा नाश करते. महालक्ष्मी हे तिचं संपत्तीबल आहे. महासरस्वती हे तिचं ज्ञानबल आणि महाकाली हे तिचं सामर्थ्यबल आहे. म्हणूनच तिच्या सामर्थ्याची पूजा करण्यासाठी शारदीय नवरात्रोत्सवाची परंपरा अनंत काळापासून सुरू आहे. या उत्सवासंदर्भात अनेक पौराणिक, भावदर्शी आणि रसाळ लोककथा रूढ आहेत.महिषासुर नावाचा राक्षस अतिशय प्रभावी बनला होता. त्यानं स्वत:च्या सामर्थ्यावर सर्व देवांना आणि मनुष्यांना त्राहीमाम करून सोडलं. त्यातून देव-दानवांचा घोर संग्राम होऊन दानवांचा विजय झाला आणि त्यांचा मुख्य महिषासुर जगाचा स्वामी बनला. दैवी विचारांची प्रभा अस्पष्ट झाली आणि आसुरी वृत्ती वाढू लागली. या वृत्तीचा सर्वांनाच मोठ्या प्रमाणावर उपसर्ग पोेहोचू लागला. या आसुरी वृत्तीविरुद्ध लढण्यासाठी सर्व देवांनी आपल्या सामर्थ्याचं एकत्रीकरण करावं, असं आवाहन करण्यात आलं. त्यानंतर सर्व देवतांच्या शरीरातून महान तेज बाहेर पडलं आणि सर्वशक्तीमान अशी महादेवता प्रकट झाली. तीच दुर्गा होय. या दुर्गेचं मुख शंकराच्या तेजानं उत्पन्न झालं. यमाच्या तेजानं मस्तक, विष्णूच्या तेजानं कर, इंद्राच्या तेजानं कटीप्रदेश, ब्रह्माच्या तेजानं पाय, अग्नीच्या तेजानं डोळे, वायूच्या तेजानं कान निर्माण झाले. मार्कंडेय पुराणात दुर्गेचं असं वर्णन करण्यात आलं आहे. सर्व देवतांच्या तेजाचं आणि शक्तीचं एकत्रीकरण करून निर्माण झालेल्या या सर्वशक्तीमान देवतेचं सर्व देवांनी पूजन केलं. या देवतेला स्वत: आयुधांनी मंडित केलं. या दैवी शक्तीनं नऊ दिवस, नऊ रात्री अविरत युद्ध करून महिषासुराला ठार मारलं. आसुरी वृत्तीला नाहीसं करून दैवी शक्तीची प्रतिष्ठापना केली. तीच जगदंबेच्या रूपात विश्‍वकल्याणासाठी उभी ठाकली. एकनाथ महाराज म्हणतात-नमो अनादिमाया भगवतीमूळ पीठ निवासीस्वये ज्योती अविनाशीजगदंबे माये उभी राहीमोह महिषासुराचा करावया आघातअंबा कडकडोनी दात खाततो धाकाची निमाला निश्‍चितपूर्णानंद प्रकटला॥ या वर्णनावरून महिषासुरावर तुटून पडलेल्या त्या आदिशक्तीचं रूप किती सामर्थ्यशाली होतं हे लक्षात येईल. संत एकनाथांनी या शक्तीरुप जगदंबेचं सामर्थ्य जाणलं आणि जनहिताच्या रक्षणार्थ तिला आवाहन केलं. आदिमायेवरील गोंधळ, डाक, ङ्गुलवरा, भुत्या, रोडगा, अंबा, जोगवा इत्यादी रूपकांमधून देवीला समाजाविषयीचं गार्‍हाणं ऐकवून तिला सामाजिक स्वास्थ्य राखण्याची विनंती केली. अहंभाव टाकून विनम्रतेचा ङ्गुलवरा बांधला. आजही नवरात्राच्या पाचव्या किंवा सातव्या माळेला ङ्गुलवरा बांधण्याची परंपरा आहे. संत एकनाथांनी या ङ्गुलवर्‍याचे सुंदर रूपक उभं केलं आहे. प्रेमभक्तीच्या वाटचालीत बोधरूपी ज्ञानाची परडी हाती आली आणि नाथांनी या आदिशक्तीच्या भक्तीचा ङ्गुलवरा बांधला. देवीच्या उपासनेतील ङ्गुलवरा वेगळे रूपक देऊन जातो. नाथांनी म्हटलं आहे,जय जगदंबे, पूर्ण कदंबे, जग उद्‌बोधे, देह तुज अर्पिला,तुज म्या ङ्गुलवरा अर्पिला॥ देहभक्तीने ङ्गुलवावा आणि परमेश्‍वराच्या चरणी समर्पित करून, स्वत:चा अहंभाव टाकून विनम्रतेचा ङ्गुलवरा बांधावा हे या मागचं रूपक आहे. सर्व अहंकाराचं मूळ म्हणजे देह पण भक्तीने अहंभाव घालवून, अहंकाराचं आगर असणारा देहच देवीला अर्पण करून देहभावाचा ङ्गुलवरा बांधल्यावर अहंभाव राहिलच कसा? सामान्य माणसाकडे असतो तो अहंभाव, योग्यांकडे असतो तो सहंभाव तर संतांच्या ठायी असतो तो प्रेमभाव. प्रेमभाव जागा झाल्यावर द्वैत पळून जातं. नाथ महाराज पुढे म्हणतात,द्वैत सारूनि, परि तो मनिएकहरि अंकिला,तुज म्या ङ्गुलवरा बांधिला ॥ अहंभाव घालवून, द्वैत बाजूला सारून भक्तीने अद्वैताची अनुभूती घेत मी ङ्गुलवरा बांधत आहे असा त्याचा अर्थ होतो. नाथांनी एकीकडे भक्तीचा ङ्गुलवरा बांधला तर वासुदेव हरिनामाचा संबळ घेऊन भक्तीचाच गोंधळ घातला. गोंधळाची तीच परंपरा आजही अविरत सुरू आहे. हीच परंपरा जपत, हातातला संबळ वाजवत नवरात्रीमध्ये घरोघरी भुत्यांचं आगमन होतं आणि नवरात्रोत्सव साजरा केला जातो. आध्यात्मिक, पौराणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध अंगांनी शारदीय नवरात्राचे पदर उभे राहतात. आजही सामाजिक विकार, विकृती, विषमता, जातीयता, दांभिकता या सार्‍यानं गांजलेल्या समाजात आदर्श जीवनमूल्यं प्रस्थापित करण्यासाठी नवरात्रोत्सव साजरा करताना पुन्हा एकदा त्या आदिशक्तीला ‘बये, दार उघड’ असं आवाहन करायला हवं.