दोन-तीन दिवसांत मान्सून राज्यात दाखल

0
20

>> हवामान विभागाचा अंदाज; मान्सूनसाठी अनुकूल वातावरण

येथील हवामान विभागाने मोसमी पाऊस येत्या २ ते ३ दिवसांत गोवा आणि कोकणात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मोसमी पाऊस गेल्या २९ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. मध्य अरबी समुद्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आदी भागात मोसमी पावसाची आगेकूच सुरू आहे. गोव्यात मोसमी पाऊल दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून, येत्या दोन ते तीन दिवसात मोसमी पाऊस दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे.

गोव्यात सामान्यपणे ५ जूनला मोसमी पावसाचे आगमन होते. यावर्षी केरळमध्ये पावसाचे तीन दिवस अगोदरच आगमन झाले आहे. त्यामुळे गोव्यात सुध्दा नियोजित तारखेच्या पूर्वी पावसाचे आगमन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने राज्यात आगामी दोन-तीन दिवसांत पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

राज्यात मार्च २०२२ ते मे २०२२ या तीन महिन्यांच्या काळात पेडणे भागात सर्वाधिक १४.५९ इंच अवकाळी पावसाची नोंद झाली. साखळी येथे ७.८० इंच, सांगे येथे ७.१० इंच पणजी येथे ४.७० इंच, मुरगाव येथे ३.५३ इंच पावसाची नोंद झाली.

देशात यंदा पाऊसमान सर्वसामान्य राहणार

नैऋत्य मोसमी पावसाने नुकताच भारतात प्रवेश केला असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी जून ते सप्टेंबर या कालावधीतील मोसमी पावसाचा अंदाज जाहीर केला. त्यानुसार देशात यंदा मान्सून सर्वसामान्य असणार असून, दीर्घकाळासाठी सरासरीच्या तुलनेत १०३ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाने यापूर्वी १४ एप्रिलला मोसमी पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला होता. त्यानुसार देशात सरासरीच्या तुलनेत ९९ टक्के पाऊस पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, सध्याची हवामानाची स्थिती लक्षात घेता पावसाच्या प्रमाणाचा अंदाज वाढवून तो १०३ टक्के करण्यात आला आहे. त्यात ४ टक्के कमी-अधिक होण्याची शक्यता देखील गृहीत धरण्यात आली आहे. १९७१ ते २०२० या कालावधीत भारतात पावसाची दीर्घकालीन सरासरी ८७ सेमी. आहे. या सरासरीच्या तुलनेत मोसमाच्या चार महिन्यांत १०३ टक्के पाऊस देशात पडणार आहे.

गोवा, कोकण आणि किनारपट्टीच्या भागांत पावसाचे प्रमाण सर्वसाधारण असणार आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात चार महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. देशामध्ये मध्य भारत आणि दक्षिणेकडील भागात सामान्य ते सामान्यपेक्षा अधिक पाऊस असेल. उत्तर-पूर्व भारत आणि पश्चिम भारतामध्ये सर्वसाधारण पाऊस होणार आहे. मिझोरम, त्रिपुरा, मणिपूर राज्यांमध्ये मात्र यंदा कमी पाऊस पडेल.