तत्त्वज्ञान समजणे महत्त्वाचे

0
255

योगसाधना – ४८८
अंतरंग योग – ७३

  • डॉ. सीताकांत घाणेकर

भारत देश हा फार भाग्यवान- इथे तर स्वतः भगवंत मानवरूपाने अवतरीत झाला. या अवतारांनी समाज प्रबोधनाचे विस्तृत कार्य केले.
समाजातील प्रत्येक मानवाला- भगवंताच्या लाडक्या लेकराला- सहज समजावे म्हणून विविध प्रकारांनी सोपे करून सांगितले….

भगवंतांनी रचलेले हे मायारूपी विश्‍व खरेच अद्भुत आहे. त्याची रचना अत्यंत गूढ आहे. त्यात विविध रहस्ये आहेत. त्यामागे सूक्ष्म तत्त्वज्ञानदेखील आहे. सामान्य मानव जो आपल्या गृहस्थाश्रमाच्या संसारात गुंतलेला आहे, एवढा व्यस्त आहे की त्याला या अशा विषयांबद्दल विचार येत नाही. मग जिज्ञासा, अभ्यास, चिंतन या फार दूरच्या गोष्टी. पण सृष्टिकर्त्याची प्रामाणिक इच्छा आहे की विश्‍वातील प्रत्येक मानवाने ज्ञान प्राप्त करून हे सर्व तत्त्वज्ञान थोडेतरी समजून घ्यावे. तरच त्यांचे जीवन सुखमय, शांतीमय होऊ शकते.
त्यामुळेच भगवंतांनी काही मानवांच्या मनबुद्धीत हा विचार रुजवला. त्या सर्वांनी अत्यंत कष्ट करून, तप करून ज्ञानाचा फार मोठा खजिना मिळवला. त्यांची यादी मोठी आहे. प्रत्येक क्षेत्रात अशा अनेक व्यक्ती आहेत – आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक… ज्यामध्ये ऋषी, संत, महापुरुष आहेत. तसेच काही प्रेषित आहेत. भारत देश हा फार भाग्यवान- इथे तर स्वतः भगवंत मानवरूपाने अवतरीत झाला. या अवतारांनी समाज प्रबोधनाचे विस्तृत कार्य केले.

समाजातील प्रत्येक मानवाला- भगवंताच्या लाडक्या लेकराला- सहज समजावे म्हणून विविध प्रकारांनी सोपे करून सांगितले- गोष्टीरूप, कथारूप, व्रतवैकल्ये, सणांच्या रूपात, त्याचबरोबर त्यांना मजा यावी, आनंद वाटावा ह्यासाठी काही कर्मकांडेसुद्धा त्याबरोबर जोडलीत. पण अज्ञानामुळे बहुतेकांनी फक्त कर्मकांडेच केलीत. त्यामागील रहस्य समजण्याचा प्रयत्न केला नाही.
अंतरंगयोगात आपला हाच विचार चालू आहे. आपण नवरात्री, दुर्गापूजा, दसरा याबद्दल बघितले. काही संस्थांचे प्रेरणास्रोत असलेल्या महापुरुषांनी काय समजावले हे बघितले. त्यातीलच एक म्हणजे प्रजापिता ब्रह्मकुमारी- अबू पर्वत, राजस्थान.
वाल्मिकी रामायणातील उत्तर कांडातील कथेनुसार लंका राक्षसांच्या आधिपत्याखाली होती. त्यानंतर विष्णूच्या भीतीमुळे राक्षस पळून गेले. विष्णूने धनाची देवता कुबेर याला तिथे राजा म्हणून नियुक्त केले. हा कुबेर पुष्पक विमानाने फिरत होता.

राक्षसांचे प्रमुख ‘सुमाली’ यांनी कुबेराला तसे फिरताना पाहिले. लंका राक्षसांना परत मिळावी अशी त्याला इच्छा झाली. म्हणून त्याने एक योजना आखली. त्याने आपली पुत्री कैकसी हिला विश्वश्रवा मुनी (कुबेराचे पिता) यांच्याकडे पाठवून विवाहाची इच्छा प्रदर्शित करण्यास सांगितले. मुनींना माहीत होते की ही राक्षस कुळातील आहे. पण तिची मागणी नाकारणे ही त्यांना असभ्यता वाटली. तसे त्यांनी सांगितलेही. त्याचबरोबर हेही सांगितले की पुत्रकामना घेऊन तू आली ज्यावेळी माझा यज्ञ चालू आहे, त्यामुळे आपले पुत्र दुष्ट होतील.
आणखी एक आख्यायिका जरा वेगळी आहे. त्याप्रमाणे विश्वश्रवा मुनी एक ब्राह्मण होते आणि सोमाली राक्षसकुळातील. ब्राह्मण सज्जन, सात्त्विक, परोपकार करणारे तर राक्षस दुर्जन, तामसिक, स्वार्थी, दुष्ट असत. त्यामुळे दोन्ही कुळात विवाहसंबंध होणे शक्य नव्हते. पण सोमालीचा इथे स्वार्थ होता. त्याला राक्षसांसाठी विविध विद्या हव्या होत्या. त्या विद्या ब्राह्मण योग्यता बघूनच देत असत. त्यामुळे त्याने कैकसीला सांगितले की तू राक्षस कुळातील आहे हे सांगू नकोस. ब्राह्मण कुळातील आहे म्हणून सांग. तुमच्या मुलांना मग वडिलांकडून विद्या प्राप्त करता येईल. त्याप्रमाणे घडले- श्वश्रवा मुनींनीलग्न केल्यानंतर त्यांना सत्य कळले. पण आता फार उशीर झाला होता.
कैकसीने आपल्या मुलांना राक्षसी संस्कार देऊन वाढविले. त्यामुळे रावण, कुंभकर्ण, त्यांची वृत्ती तशी झाली. अपवाद होता तो बिभीषणाचा. त्याने वडलांचे संस्कार उचलले. तो रामभक्त व प्रामाणिक ठरला.
अशा कथा ऐकल्या की कितीतरी प्रश्‍न मनात उठतात. पण शेवटी त्यामधून बोध घेऊन प्रत्येकाने आपले जीवन जगायचे असते. काही बोध म्हणजे….

  • आपण कुठले संस्कार घ्यावे हे प्रत्येकाने ठरवावे.
  • आजही स्वार्थामुळे अनेक सत्य गोष्टी काहीजण लपवतात व सज्जनांना फसवतात. म्हणून प्रत्येकाने अत्यंत दक्षता घ्यायला हवी.
  • दोन कुळांच्या संस्कारांचे दर्शन व त्याचे विविध परिणाम कथेत स्पष्टपणे दिसतात.
    सारांश – आपण बिभीषण व्हायचे की रावण, कुंभकर्ण व्हायचे याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला आहे.
    प्रजापिता या सर्व घटनांचा आध्यात्मिक अर्थ सांगतात-
  • सारा संसार महाद्विपाप्रमाणे आहे, ज्याच्या चारही बाजूंनी समुद्र आहे. तीच लंका आहे. पूर्वी पूर्वकल्पचे कलियुग होते जेव्हा इथे राक्षसांचे राज्य होते. तद्नंतर भगवंताने या राक्षस संप्रदायाचा नाश केला. मग धनधान्यसंपन्न दैवी राज्य. कुबेराचे राज्य स्थापित केले. म्हणजेच सत्ययुगाचे आगमन झाले. त्यानंतर त्रेतायुग आले. त्यावेळी रावण अर्थात् माया (विकार) यांचे राज्य आले. त्यांनी कुबेराला पळवून लावले. त्यावेळी स्वतः विष्णू राम म्हणून सृष्टीवर अवतरीत झाले. त्यांनी रावणाचा वध केला. त्यानंतर सज्जन, सात्त्विक बिभीषण राजा झाला. म्हणूनच ‘दशहरा’ साजरा केला जातो- विजयादशमी.
  • दैवी संस्कृतीचा आसुरी संस्कृतीवर विजय. तशीच माहिती ते रामाबद्दलही सांगतात- * एक गोष्टीरूप- दशरथ-कौसल्या सुत राम- महान व पावन राजा. मर्यादा पुरुषोत्तम राम. त्यांचे राज्य म्हणजे रामराज्य- जेथे सर्व प्रजा सुखी होती. पितापुत्र; भावाभावामध्ये प्रेम होते. स्वार्थ नव्हता.
  • दुसरा सर्व आत्म्यांचा परमपिता राम.- देवांचा देव महादेव – रामेश्‍वर. म्हणजे भगवान शिव- रामाचे ईश्‍वर.
    ‘राम’ हा शब्द अत्यंत पावन आहे. उत्तर भारतात दोन व्यक्ती भेटल्या की लगेच म्हणतात – राम- राम.; जय रामजीकी
  • हा आध्यात्मिक हृदयस्थ राम. हनुमान फार मोठा रामभक्त होता. म्हणून त्याच्या हृदयात राम दाखवला. त्याचप्रमाणे वानर व त्यांची वानरसेना. हे कुणी माकड नव्हते. त्यावेळच्या एका जातीचे ते नाव होते. जसे नागालँडमध्ये नाग जातीचे लोक राहतात ते काही सर्प नाहीत.
    त्यांना माकडासारखी शेपटी दाखवतात. एक आख्यायिका अशी आहे की ते जंगलात राहणारे लोक होते- जेथे घनदाट अरण्य होते. त्यांना कामासाठी परत परत झाडांवर चढावे लागत असे. त्यामुळे ते कंबरेला जाड दोरी (दोरखंड) बांधूनच फिरत असत. म्हणून त्यांना शेपूट आहे असे वाटत असे. हे वानर अतिशय चंचल असत ते ‘पत्थर बुद्धी’ होते. त्यांना ज्ञान देऊन ज्ञानाचा सेतू श्रीरामांनी बनवला.
  • सीता- राजा जनकाची मानलेली पुत्री. तिला ‘अयोनिज’ मानतात म्हणजे गर्भापासून तिची उत्पत्ती झाली नाही. शेतात नांगर फिरवताना एक लहान मूल सापडले. त्याबद्दल त्यांचे मत आहे की – सीता म्हणजे ज्ञानवान आत्मा. गीतेमध्येही शरीराला क्षेत्र व आत्म्याला क्षेत्रज्ञ म्हणून श्रीकृष्णाने संबोधले आहे.
    तेराव्या अध्यायात भगवंत सांगतात –
  • इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते |
    एतद्यो येत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥
  • हे कौन्तेय, या शरीरास क्षेत्र (शेत) असे म्हणतात. हे शरीर (माझे आहे) असे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ (संसारी जीव) असे तत्त्वज्ञानी म्हणतात.
  • क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत |
    क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्‌ज्ञानं मतं मम ॥
  • क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे जे तत्त्वतः ज्ञान तेच ज्ञान. (इतर व्यर्थ पांडित्य- असे माझे मत आहे.)
  • तत्क्षेत्रं यज्ञ याद्दक्च यद्विकारि यज्ञश्च यत् |
    स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु ॥
  • ते क्षेत्र म्हणजे काय, कोणत्या प्रकारचे, त्याचे विकार कोणते, त्यात कशापासून काय होते, तसेच तो क्षेत्रज्ञ कोण व त्याचा प्रभाव काय हे मी संक्षेपाने सांगतो, ऐक.
    इथे आध्यात्मिक अर्थ म्हणजे महाज्ञानी जनकाने बुद्धीरूपी क्षेत्रामध्ये ज्ञानाचा नांगर चालवला होता. त्यामुळे ज्ञानवान आत्मा (सीता) जन्माला आला.
    खरेंच, हे सर्व तत्त्वज्ञान वाचले की मती गुंग होते. थोडा वेळ बुद्धी चालत नाही. असे वाटते की या ज्ञानसागराच्या तळाशी जाऊन जी अनेक ज्ञानरूपी मोती आहेत, जो अखंड खजिना आहे त्याचे सतत दर्शन करीत रहावे. आत्मजीवन धन्य करावे. (संदर्भ ः भारतके त्यौहार- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय वि.वि. यांचे पुस्तक)