दीड कोटींहून अधिक बक्षीस ठेवलेला सीपीआय-माओवादी सरचिटणीस नंबाला केशवराव याचाही खात्मा; मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त
छत्तीसगडच्या नारायणपूर-बिजापूर-दंतेवाडा जिल्ह्यातील सीमावर्ती भागात काल सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 27 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले. या चकमकीत नक्षलवादी चळवळीचा कुख्यात बडा नेता नंबाला केशवराव उर्फ बसवराजू (70) याचाही खात्मा करण्यात आला. 2010 मध्ये 75 सीआरपीएफ जवानांची हत्या करणाऱ्या भयंकर नक्षलवादी हल्ल्याचा आणि 2013 च्या झीरम घाटीतील 27 जणांच्या हत्याकांडाचा तो सूत्रधार होता. त्याच्या मृत्यूने नक्षलवादी चळवळीला दशकभरातील सर्वात मोठा हादरा बसला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील दंतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील (ट्राय जंक्शन) अबुझमाड व इंद्रावती राष्ट्रीय उद्यान जंगल परिसरात मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आले होते. त्यात विविध राज्यांत दी कोटींहून अधिक बक्षीस असलेला नक्षलवादी चळवळीचा देशातील बडा नेता, सीपीआय-माओवादी सरचिटणीस तथा ‘पॉलिट ब्युरो’ सदस्य नंबाला केशवराव देखील असल्याची गोपनीय माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. त्यानंतर या पारिसरात 20 मे रोजी रात्रीच्या सुमारास दंतेवावाडा, बिजापूर, नारायणपूर आणि कोंडागाव जिल्ह्यातील पाचशेहून अधिक ‘डीआरजी’ व इतर सुरक्षा जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवले.
21 मे रोजी सकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारात 27 नक्षलवादी ठार झाले, तर एक जवान शहीद झाला. बसवराजू व्यतिरिक्त उर्वरित मृत नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, त्यात आणखी काही मोठे ‘कॅडर’ असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळावरून 27 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य, हत्यारे जप्त करण्यात आली.
कोण होता नंबाला केशवराव
उर्फ बसवराजू?
नंबाला केशवराव हा आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील जियान्नापेट गावचा
रहिवासी होता. त्याने वारंगल येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक उत्तीर्ण केले होते. महाविद्यालयीन जीवनापासूनच तो डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी राजकारणात सक्रिय होता. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या नंबालाने ‘आयईडी’ चा वापर यासारख्या लष्करी रणनीतींवर प्रभुत्व मिळवले होते. आंध्र प्रदेशात जेव्हा सीपीआय (एमएल) पीपल्स वॉरची स्थापना झाली तेव्हा तो प्रमुख संघटकांपैकी एक होता. त्याने जहाल नक्षलनेता मल्लोजुला कोटेश्वर राव उर्फ किशनजी, मल्लोजुला वेणुगोपाल आणि मल्ल राजी रेड्डी यांच्यासोबत बस्तरच्या जंगलात लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (एलटीटीई) च्या माजी सैनिकांकडून 1987 मध्ये ‘ॲम्बुश’ रणनीती आणि जिलेटिन हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले. 1992 मध्ये त्याची पूर्वीच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी) पीपल्स वॉरच्या केंद्रीय समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. 2004 मध्ये विलीनीकरणानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) ची स्थापना झाली. त्यावेळेस त्याला पक्षाच्या केंद्रीय लष्करी आयोगाचा प्रमुख तसेच पॉलिटब्युरो सदस्य बनवण्यात आले. त्याच्याकडे लष्करी रणनीती आणि स्फोटकांचा वापराचे विशेष कौशल्य होते. छत्तीसगड, महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये झालेल्या जवळजवळ सर्व मोठ्या नक्षलवादी हल्ल्यांमागे त्याचा हात होता.
अनेक हत्याकांडांमध्ये हात
पोलिस सूत्रांनुसार, आंध्र प्रदेशातील अराकू येथे तेलुगू देसम पक्षाचे नेते किदारी सरवेश्वर राव आणि छत्तीसगडमधील भाजपचे आमदार भीमा मांडवी यांच्या हत्येमागे बसवराजू याचा हात असल्याचे सांगितले जाते.
2010 मध्ये दंतेवाडात 75 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते, त्या घटनेमागेही बसवराजूचा हात होता.
झीरम घाटी हल्ला ज्यामध्ये माजी राज्यमंत्री महेंद्र कर्मा आणि छत्तीसगड काँग्रेस नेते नंद कुमार पटेल यांच्यासह 27 जणांचा मृत्यू झाला होता, त्यातही बसवराजूचा सहभाग होता.
गडचिरोलीतील लाहेरी, जांभूळखेडा सारख्या मोठ्या हल्ल्याचा सूत्रधार तोच होता.
पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडून सुरक्षा दलांचे कौतुक
या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा दलांचे कौतुक केले. या उल्लेखनीय यशाबद्दल आम्हाला सुरक्षा दलांचा अभिमान आहे. आमचे सरकार नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी आणि देशातील नागरिकांना शांतता आणि प्रगतीचे जीवन सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. अमित शहांनी देखील सुरक्षा दलांच्या कारवाईबद्दल अभिनंदन केले. भारताच्या नक्षलवादविरोधी लढाईच्या तीन दशकांमध्ये ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा आपल्या सुरक्षा दलांनी सरचिटणीस दर्जाच्या नेत्याला ठार मारले आहे, असे शहांनी म्हटले आहे.