ग्राहकांना वीज बिले योग्य वेळी मिळणार

0
93

वीज मंत्री मिलिंद नाईक यांची ग्वाही
राज्यातील वीज ग्राहकांना पुढील महिन्याच्या शेवटापर्यंत वेळच्या वेळी वीज बिले देण्याचे काम मार्गी लागणार असल्याचे वीजमंत्री मिलिंद नाईक यांनी काल सांगितले.सध्या ग्राहकांना तीन-तीन महिने वीज बिले मिळत नाहीत व त्यामुळे त्यांची अडचण होते याची वीज खात्याला कल्पना आहे. मात्र, आता जास्त काळ त्यांची अडचण होऊ नये यासाठी आवश्यक ती पावले यापूर्वीच उचलण्यात आलेली आहेत. वीज बिलांचे संगणकीकरण करण्याचे काम जीईएलला (गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड) देण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच सर्व वीज ग्राहकांना संगणकावर तयार केलेली वीज बिले मिळणार असल्याचे नाईक म्हणाले.
एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत किमान दोन महिन्यांनी एकदा तरी वीज बिल देण्याची सोय करण्यात येणार असल्याचे मिलिंद नाईक यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सध्या राज्यातील काही भागातील लोकांना तीन-तीन महिने तर काही ठिकाणी चार-चार महिनेही वीज बिले मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होऊ लागली आहे. या ग्राहकांना मग एकाच वेळी हजारो रु. चे बिल फेडावे लागत आहे. वीज ग्राहकांमध्ये त्यामुळे प्रचंड नाराजी पसरलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर मिलिंद नाईक यांना काल त्यासंबंधी विचारले असता त्यांनी वरील माहिती दिली.