कॉलेजविश्व

0
58

बाला दत्तप्रसाद पटवर्धन
(१२वी, जीव्हीएम्स हायर सेकंडरी स्कूल)

नमस्कार! मी बारावीत शिकते आहे. दहावीचा फिजिकल क्लास माझा शेवटचा होता. त्यानंतर उच्च माध्यमिकमध्ये आम्ही फक्त प्रवेश किंवा निकालासाठी जातो. आमच्या टिचर्स किंवा क्लासमेट्‌सना आम्ही नीट ओळखतसुद्धा नाही. कारण दोन वर्ष ऑनलाइन गेली. शाळेत जाऊन अभ्यासात जास्त मन लागते, हे मात्र खरे! शाळेतील मजा-मस्ती, सहली, दररोजच्या गप्पा-गोष्टी, मित्र-मैत्रिणी, शिक्षकांसोबत संवाद… असं सगळं आम्ही गमावलंय. पण कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाची सवय मात्र आम्ही करून घेतली आहे. खूप नवीन गोष्टी शिक्षक व विद्यार्थ्यांना शिकायला मिळाल्या. यामुळे सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोरोनाचा प्रसार वाचला व दुसरे म्हणजे महामारीमुळे शिक्षण थांबले नाही.
लवकरात लवकर कॉलेज सुरू व्हावे असे मला वाटते. परीक्षा ऑनलाइन झाल्यात तरी चालेल.
…………………..

उत्कर्षा उमेश राऊत
(विद्या प्रबोधिनी वाणिज्य, शिक्षण संगणक आणि व्यवस्थापन महावि. पर्वरी)

थोडं चांगलं, थोडं वाईट. सुखदुःखाचं मिश्रण हा कोरोनाचा काळ. सुरुवातीला खूप मज्जा आली. ‘सांग सांग भोलानाथ… शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?’- हे मुलांचं स्वप्न आज साकार झालं होतं. शाळा, अभ्यास, परीक्षा सगळं बंद, फक्त मोबाईल आणि ऑनलाइन शिक्षण. मुलांचा आनंद गगनात मावेना. मग हाच कोरोना हळूहळू सर्वत्र पसरला. सरकारने लॉकडाउन् जाहीर केलं. लोक आनंदात आपल्या कुटुंबासोबत एकत्र राहू लागली. कोरोना प्रत्येकाच्या दारात येऊन पोहोचला. श्रीमंतांना गरिबी दाखवली. गरिबांना रस्त्यावर आणलं. करता करता माणसाचं आयुष्य हिरावून घेतलं. आता नकोसा वाटतोय तो कोरोनाचा काळ. प्रत्येकाच्या हृदयाला जोडलीय शाळेची नाळ.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी ….
१) नेहमी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा
२) आपले हात साबणाने स्वच्छ धुवावे
३) लोकांपासून २ मीटरचे अंतर राखावे
………………………………….

विशाखा विलास पालकर
(खांडोळा महाविद्यालय)

आज मला प्रश्‍नच असा पडला आहे की ऑफलाइन पद्धतीने सगळी विद्यालये कधी सुरू होतील? महाविद्यालयात बी.ए.ची पदवी प्राप्त करत असताना मध्येच कोरोना महामारीच्या आगमनाने सरळ चालणार्‍या पावलांना स्तब्ध करून ठेवले. महाविद्यालयातील मजा- मस्ती सोडूनच द्या, पण नेमके त्या ज्ञान प्राप्त करण्यासाठी आसुसलेल्या मनाला ऑनलाइन वर्ग आणि नवीन शिक्षणपद्धती स्वीकारताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आणि आजही तीच परिस्थिती आहे. आज बाजार, धार्मिक स्थळे, चित्रपटगृहे, हॉटेल इ. खुली असतात तर मग ग्रंथालये आणि विद्यामंदिरे पूर्णपणे का खुली केली जात नाही? मुळात ज्ञान ग्रहण करणे हे सर्वांत महत्त्वाचे. पुढे येणार्‍या संकटांना सामोरे जाण्यासाठी आपली पावलं डगमगून जाऊ नये म्हणून आज कोणत्याही क्षेत्राचा विचार करता शिक्षणाचा पाया भक्कम करणे फार गरजेचे आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक तांत्रिक गोष्टी जरी कळल्या तरी आम्हा विद्यार्थ्यांमधली सृजनशीलता आणि ज्ञान मिळवण्यातली जिज्ञासा कमी होताना दिसते. त्यामुळे ज्ञानमंदिरे सुरू झाली पाहिजेत, असे मनापासून वाटते.
कोरोनापासून आपले संरक्षण कसे केले पाहिजे, हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्‍न असावा असे मला वाटते, कारण सामाजिक अंतर आणि नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे हे आज प्रत्येकाला माहीत आहे. त्याचबरोबर शिक्षणही किती महत्त्वाचे आहे आणि ते अशा काळातसुद्धा सुरक्षितपणे आणि योग्यप्रकारे कसे प्राप्त करता येईल याच्यावरही आज प्रत्येकाने विचार करावा.
……………………………..

गौरांग वासंती गोकुळदास नाईक
(खांडोळा महाविद्यालय)
(८९७५०८१३६३)

काय दिवस होते ते यार! भरपूर अभ्यास आणि मग मज्जाच मज्जा. महाविद्यालयातील ते दिवस फक्त आठवणींचे गाठोडे बनून राहिले आहे आता. जवळजवळ दोन वर्षे सरली पण वर्गात प्रत्यक्ष गाठीभेटी होण्याचा मुहूर्त काही निघत नाही आणि तसा अभ्यासही घरी होत नाही. शिकायच्या धडपडीने का असेना पण स्वतःला एक वळण लागले होते, सकाळी लवकर उठून मग आईने दिलेली भाकरी अर्धीच खाऊन का असेना पण वेळेत वर्गात पोहोचायची एक शिस्त लागली होती. कारण उशीर झाला तर शिक्षकांकडून शब्दछडीचा भडिमार व्हायचा. पण खरं सांगू? या सगळ्यांमुळेच विद्यार्थीदशेत आवश्यक असलेली शिस्त अंगी लागली होती. पण आत्ता काय? लेक्चर घरच्या घरीच असल्यामुळे नाही म्हटले तरीही ह्या शिस्तीकडे कुठेतरी नक्कीच कमीजास्त होत आहे. शिक्षकांशी होणारा प्रत्यक्ष संवाद आणि त्यांच्याशी असलेले प्रामाणिक नाते कुठेतरी हरवत चाललेय. कोरोनामुळे सगळ्याच गोष्टींचा नाइलाज आहे. पण आत्ता मात्र स्थिती हळूहळू पूर्ववत होते आहेे. त्यामुळे निश्चितच प्रत्यक्ष वर्ग सगळ्या सुरक्षा नियमांचे पालन करत पुनः भरवूया. मिळून मिसळून मज्जेत शिकूया. आपापल्या वर्गात पुनश्च लवकरच भेटुया. तथास्तु!
………………………….

गायत्री शिरसुरला
(द्वितीय वर्ष, कला, खांडोळा महाविद्यालय)

आपल्या देशामध्ये विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयात जातात. पण या दोन वर्षात सर्वत्र पसरलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे जगभरातील सर्व व्यवहार व शिक्षण थोडेफार स्थगित झाले आहे. एक-दीड वर्ष झाले महाविद्यालयेच बंद आहेत. संपूर्ण देशाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा या परिस्थितीत विद्यार्थ्यांना घराच्या बाहेर पडणे अशक्य झाले आहे. खरे तर कॉलेज लाइफ म्हणजे आमच्यासाठी एक आनंदोत्सवच! पण आम्हाला तो आनंद अनुभवायला मिळालाच नाही. ऐकलं होतं कॉलेज लाइफ तरुण-तरुणींच्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो, सर्वांसाठी ती एक छानशी आठवण बनते जी आपण कधीच विसरू शकत नाही. पण जेव्हा आमची वेळ कॉलेज लाइफ अनुभवायची आली तेव्हा दुर्दैवाने या महामारीमुळे देशातील विविध महाविद्यालयात ऑनलाइन शिक्षण सुरू केले. आज व्हॉट्सऍप, गुगल मीट, झूम व्हिडिओ इत्यादी ऍपद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. या ऑनलाइन शिक्षणामुळे आम्ही आमच्या शिक्षकांना, मित्रांना भेटू शकत नाही. त्यांना समोरून नाही पाहू शकत. अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण हाच एक पर्याय आहे, हे मला समजतं. फ्रेशर्स म्हणून एक प्रकारे मनात खंत उत्पन्न झाली आणि ती अजूनही आहे. सुदैवाने ह्या कठीण परिस्थितीतून हळूहळू बाहेर पडतो खरे परंतु शिक्षणक्षेत्राला चांगले दिवस कधी येतील याची आम्हा मुलांना आतुरता आहे.