करा सरस्वतीची उपासना

0
52

योगसाधना – ५२२
अंतरंग योग – १०७

  • डॉ. सीताकांत घाणेकर

ज्ञान प्रत्येक मानवासाठी आवश्यकच आहे. नाहीतर आजच्या भीषण कलियुगात ज्या घोर समस्या येतात, त्यामुळे आपण खचून जातो. निराशा येते. म्हणूनच योग, ज्ञानोपासना व शास्त्रशुद्ध योगसाधना गरजेची आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढेलच. पण मुख्य म्हणजे आत्मशक्ती वाढेल.

बालपणी आमच्या मराठी प्राथमिक शाळेत सरस्वतीपूजन दरवर्षी होत असे. त्यावेळी आमचे गुरुजी सरस्वतीचे चित्र काढून आणायला सांगत असत. आपल्यातील प्रत्येक जण चित्रकार नसतो. तरीपण आम्ही सर्व प्रामाणिक प्रयत्न करीत असू. त्यावेळी तो एक अभ्यासाचा भाग असे.
शाळेत पूजेच्या वेळी सर्वजण सरस्वतीचा श्‍लोक.. ‘याकुन्देन्दुतुषार….’ म्हणत असू. पूजा झाल्यावर प्रसाद घेणे.. वगैरे कर्मकांडं असे. सरस्वती ही विद्येची देवता आहे व तिची भक्ती केली तर विद्या चांगली येेते एवढीच समज त्यावेळी होती.
प्राथमिक शिक्षण संपून मग पुढील शिक्षण सुरू झाले. शाळेतून कॉलेजात गेलो. इथे दरवर्षी सरस्वतीपूजनाचा कार्यक्रम नव्हता. पण घरी दररोज तिन्हीसांजेला प्रार्थनेच्या वेळी इतर देवांच्या प्रार्थनेबरोबर ही प्रार्थनादेखील म्हणत असू. पण आता लक्षात येते की हे सर्व कर्मकांडात्मक होते. वय वाढत गेले, समजूत वाढली व विचार करण्याची सवय जडली. ज्ञानात भर पडली. चिंतन करणे किती जरुरी आहे हे पटले. तदनंतर धार्मिकतेतून आध्यात्मिकतेकडे कल वळला. शब्दार्थावर समाधान न मानता भावार्थ, गर्भितार्थ, आध्यात्मिक अर्थदेखील समजावा म्हणून तळमळ लागली. संशोधन सुरू झाले. हे सर्व ज्ञान झाल्यावर प्रत्येक श्‍लोक, स्तोत्र म्हणताना भावानंद, आत्मानंद अनुभवास येऊ लागला. अनुभवानंतर अनुभूती यायला लागली. या विषयाची गोडी व आवड निर्माण झाली.
आपण सरस्वतीच्या श्‍लोकाचा सुरुवातीच्या शब्दांचा अर्थ बघितला. आता पुढे पाहू..
एक शब्द आहे – ‘श्‍वेतपद्मासना’ – सरस्वती देवी श्‍वेत पद्माच्या आसनावर विराजमान आहे. श्‍वेत या शब्दाचा भावार्थ म्हणजे विशुद्ध चारित्र्य तसेच पद्म या शब्दालादेखील गूढार्थ आहे. पद्म चिखलात उगवते. तेच त्याचं जन्मस्थान आहे. पण त्या चिखलाचा पद्मावर काहीसुद्धा परिणाम होत नाही. ते अलिप्त राहते.
आज सर्व विश्‍वांत विविध तर्‍हेचा चिखल दिसतो – विकार, वासना, भ्रष्टाचार, अनैतिकता, षड्‌रिपूंचा थयथयाट. अशा ह्या कराल काळात.. घोर कलियुगात अलिप्त राहणे फारच कठीण वाटते. पण सरस्वतीच्या खर्‍या उपासकाला ते शक्य आहे. फक्त प्रामाणिक प्रयत्न व निष्ठा हवी.
बहुतेकजणांचे विचार वेगळे असतात. ते म्हणतात की सर्व समाज, विश्‍व बिघडले आहे. बिघडत चालले आहे. त्यामुळे समाजाबरोबर चालणे हे अपरिहार्य आहे. नाहीतर आपला नाश निश्‍चित होणार. समाज आम्हांला वाळीत टाकेल. ही त्यांची रडकी भाषा असते. त्यामुळे अशा व्यक्ती स्वतः निरुत्साही होतात व त्याचबरोबर इतरांनाही निरुत्साही करतात. स्वतःला सरस्वतीचा उपासक म्हणवणार्‍याला ही भाषा शोभत नाही.
खरा, सच्चा सारस्वत अशा घाणेरड्या प्रवाहात वाहत जात नाही तर संधी उभी करतो.
शास्त्र सांगते की छोटासा शिंपला जलबिंदूपासून मोती निर्माण करतो.
पू. पांडुरंगशास्त्री छान सांगतात हाच संदर्भ घेऊन सारस्वताचे जीवनगीत असते- ‘‘मी जीवनाच्या शिंपल्यामधील जलबिंदूपासून मोती निर्माण करीन. सुयोग नाही म्हणून रडणार नाही. अनुकूलता निर्माण करीन. प्रतिकूलतेच्या चिखलात जीवन-कमळ फुलवून दाखवीन’’.
खरेंच, आजच्या समाजात अशा तेजस्वी विचारांची प्रत्येकाला अत्यंत गरज आहे. नाहीतर अधोगतीकडे घोडदौड चालूच राहील व विनाश जवळ येईल.
श्‍लोकाच्या तिसर्‍या ओळीत सरस्वती देवीची महानता दर्शवली आहे. मुख्य मूळ त्रिदेव- ब्रह्मा-विष्णू-महेश देवी शारदेला वंदन करतात. नमन करतात. पुरुषप्रधान संस्कृतीत हा विचार मानणे जरा कठीण आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की मूलतः भारतीय संस्कृती पुरुषप्रधान नाही. अज्ञानामुळे किंवा विपरीत बुद्धीच्या व्यक्तींनी तसा अर्थ लावला.
मूळ संस्कृतीमध्ये म्हणतात – ‘यत्र नार्यस्तु पुज्यन्ते तत्र रमन्ते देवताः’
आता इथे संदर्भ वेगळा आहे. इथे देव का वंदन करतात हे जाणून घ्यायला हवे-

  • सरस्वतीच्या हातात पुस्तक व माळा आहे. कारण ही देवी ज्ञान व भाव यांचे प्रतीक आहे. पुस्तक ज्ञानाचे व माळा भक्तीचे प्रतीक आहे. भक्तीत भाव असायला हवा. नाहीतर आपली भक्ती फक्त कर्मकांडी राहणार. म्हणूनच जाणकार म्हणतात.. * देव भावाचा भुकेला
  • मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव
  • ब्रह्मा सर्जनहार, विष्णू पालनहार व महेश संहार करणारा आहे. या तिन्ही प्रक्रिया अत्यंत गरजेच्या आहेत. पण या कार्यात ज्ञान व भाव दिसायला हवा. नाहीतर त्यांच्या कृतीला दुर्गंध येईल.
    शास्त्रीजी समजावतात – ‘‘भावरहित सर्जन, ज्ञानाशिवाय पालन व समजल्याशिवाय संहार अनर्थ निर्माण करतात. म्हणून कोणत्याही कार्याच्या सर्जनात, ते कार्य टिकवण्यासाठी तसेच त्या कार्यात घुसलेले भ्रष्टाचार दूर करण्यासाठी ज्ञान व भाव दोघांचीही गरज आहे. आणि म्हणूनच कोणतेही महान कार्य करणार्‍या महापुरुषाने सरस्वतीला वंदन केलेच पाहिजे.’’
    आपण सामान्य मानव या त्रिदेवांपेक्षा कित्येक पटीने लहान आहोत- ज्ञानाने, भावाने, कर्माने… ते जर या देवीला वंदन करतात तर आपणही अवश्य करायला हवे. पण समजून उमजून- ज्ञानपूर्ण व भावपूर्ण जीवनाची दिशाच बदलून जाईल.
    विश्‍वातील प्रत्येक मानवाला विविध गोष्टींबरोबर ज्ञान व धन दोन्ही आवश्यक आहेत. ज्ञानदेवी सरस्वती व धनदेवी लक्ष्मी. आपण दोघींचे पूजन करतो. पण लक्षात ठेवायला हवे की धन कमावण्यासाठी ज्ञान नाही. ज्ञान असले तर कदाचित धन जास्त मिळेल पण ज्ञान फक्त जीविकेसाठी नाही तर जीवनासाठी आहे. जीवन सुंदर, आदर्श, ध्येयपूर्वक बनवण्यासाठी आहे.
    या संदर्भात पांडुरंगशास्त्री खंत व्यक्त करतात… ‘‘दुःखाची गोष्ट अशी आहे की आज सरस्वतीच्या मंदिरातही (शाळा, महाविद्यालये) जडतेची उपासना सुरू झाली आहे आणि म्हणूनच सरस्वतीने तेथून निरोप घेतलेला आहे. कारण जडता व शारदा एका जागी राहू शकत नाही’’.
    प्रत्येक व्यक्तीच्या पूर्वसंचीतानुसार त्याला ज्ञान मिळते. धन उपलब्ध होते. अनेकदा अशिक्षित व्यक्तीला सुशिक्षितापेक्षा जास्त धन मिळते. पण कुणालाही दुसर्‍याची संपत्ती पाहून मनात अस्वस्थता अथवा राग, द्वेष निर्माण होता कामा नये. त्याने पूर्ण निष्ठेने ज्ञानोपासना चालूच ठेवायला हवी.
    या विषयावर भाष्य करताना पू. पांडुरंगशास्त्री एक सुंदर व बोधप्रद सुभाषित सांगतात-
    १. निरक्षरे वीक्ष्य महाधनत्वं विद्यानवद्या विदुषा न हेया
    रत्नावतंसाः कुलटाः समीक्ष्य किमार्यनार्यः कुलटाः भवन्ति|
  • निरक्षर माणसाजवळ विपुल धन पाहून विद्वान माणसाने श्रेष्ठ अशा विद्येचा तिरस्कार करता कामा नये. रत्ने धारण केलेल्या कुणा कुलटेला पाहून आर्य स्त्रिया (श्रेष्ठ स्त्रिया) काय कुलटा बनणे पसंत करतात?
    हे सर्व ऐकले, वाचले की लक्षात येते की हे ज्ञान प्रत्येक मानवासाठी आवश्यकच आहे. नाहीतर आजच्या भीषण कलियुगात ज्या घोर समस्या येतात, त्यामुळे आपण खचून जातो. निराशा येते. म्हणूनच योग, ज्ञानोपासना व शास्त्रशुद्ध योगसाधना गरजेची आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढेलच. पण मुख्य म्हणजे आत्मशक्ती वाढेल.
    आपले योगसाधक या दृष्टीने समर्थ आहेतच याची मला खात्री वाटते.
    (संदर्भ ः पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रवचनांवर आधारित ‘संस्कृती पूजन’)