कंगना राणावतचे मुंबईतील कार्यालय मनपाने पाडले

0
301

शिवसेनेशी दोन हात करत काल दि. ९ रोजी विविध सुरक्षेत मुंबईत आलेल्या कंगना राणावतचे पाली हिल मुंबई येथील कार्यालय मुंबई महापालिकेने पाडले. कंगनाचे हे कार्यालय बेकायदा असल्याचे सांगत ही कारवाई करण्यात आली. मुंबई आणि मुंबईचे पोलीस यांच्याविरोधात वक्तव्य केल्याने शिवसेना व कंगना यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असून कंगनाने शिवसेनेला आव्हान दिले.

या पार्श्‍वभूमीवर काल मुंबई पालिकेने पालिकेने मंगळवारी प्रशासकीय परवानगीची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस पाठवली होती. तेथे हजर असलेल्या कर्मचार्‍यांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. याबाबत उत्तर देण्यास कंगनाला २४ तासांची नोटिस देण्यात आली होती. कंगनाच्यावतीने ही कारवाई पुढे ढकलण्याची विनंती महापालिकेला करण्यात आली होती. मात्र, महापालिकेने त्याला नकार देत बांधकाम तोडले. दरम्यान, या विरोधात कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

न्यायालयाचे ताशेरे
दरम्यान, कंगनाचे वकील रिझवान सिद्धिकी यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात बांधकाम पाडण्यासंदर्भातील कारवाई थांबवण्यासाठी याचिका दाखल केली. त्यानंतर उच्च न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली. त्यामुळे सुमारे दोन तास सुरू असलेली ही कारवाई दुपारी थांबवण्यात आली. याबाबत आज दुपारी ३ वाजता सुनावणी होणार आहे. या कारवाईबाबत मुंबई पालिकेवर ताशेरे ओढत न्यायालयाने पालिकेकडे उत्तर मागितले आहे.