‘ऑलिम्पिक’मध्ये भारत अपयशी का?

0
92
  • अनिरुद्ध राऊळ

जपानची राजधानी टोकियोत २३ जुलैपासून रंगलेल्या ‘ऑलिम्पिक २०२०’ महाकुंभाची आज रविवार ८ ऑगस्टला सांगता होत आहे. कोरोना महामारीच्या सावटाखाली ही स्पर्धा संपन्न होऊनही, निश्‍चितच यशस्वी झाली आहे. सतरा दिवस चाललेल्या या खेळांच्या महाकुंभात चीन, अमेरिकेबरोबरच यजमान जपाननेही महासत्ता गाजवत पदकांची लयलूट केली. १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला मात्र पुन्हा एकदा मोठे यश मिळविण्यात अपयश आले. टोकियोत त्यांची मजल केवळ ७ पदकांचीच ठरली. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू यशस्वी का होत नाहीत याचा गांभीर्याने विचार करण्याची आज गरज आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे १२७ खेळाडूंचे पथक सहभागी झाले होते. हे भारताचे आतापर्यंतच्या ऑलिम्पिकमधील सर्वात मोठे पथक ठरले आहे. त्यामुळे या खेळाडूंकडून देसवासीयांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु त्यांनी त्या फोल ठरविल्या. मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग), लव्हलिना बोर्गेहेन (मुष्टियुद्ध), पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटन), रवी दहिया (कुस्ती) आणि भारतीय पुरुष हॉकी संघ वगळता अन्य सर्व खेळाडूंना टोकियोतून खाली हात परतावे लागणार आहे. असे असले तरी महिला हॉकी, मुष्टियुद्ध, गोल्फमध्ये मात्र खेळाडूंनी सरस कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांची पदके थोडक्यात हुकली खरी, पण प्रयत्न जोरदार होते ही जमेची बाजू होय!

ऑलिम्पिकचा इतिहास पाहता भारताने आतापर्यंत ९ सुवर्ण, ९ रौप्य व १५ कांस्य अशी मिळून एकूण ३३ पदके मिळवलेली आहेत. परंतु ९ सुवर्णपदकांपैकी ८ पदके ही सांघिक म्हणजे हॉकीत तर केवळ १ पदक हे वैयक्तिक प्रकारात अभिनव बिंद्राने २००८ च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत मिळवलेेले आहे. दोन रौप्यपदके ही नॉर्मन प्रीतचार्ड याने ऍथलेटिक्स प्रकारात तीही भारतीय ऑलिम्पिक संघटनेची स्थापना होण्यापूर्वी १९०० साली मिळवली होती. परंतु १९२७ साली भारतीय ऑलिम्पिक संघटनेची स्थापना झाल्यानंतर आतापर्यंत भारताची ऍथलेटिक्समधील पदकांची पाटी कोरीच आहे. भारतीय धावपटू ऑलिम्पिकमध्ये विदेशातील खेळाडूंच्या जवळही पोहोचलेले दिसून येत नाहीत (मिल्खा सिंग व पी. टी. उषा वगळता). कुस्ती, हॉकी, टेनिस, मुष्टियुद्ध आणि नेमबाजी वगळता ऑलिम्पिकमधील अन्य खेळप्रकारांत भारताला अजून एकाही पदकाला गवसणी घालता आलेली नाही. पदकांचे सोडून द्या, काही प्रकारांत तर भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिकच्या इतिहासात पात्रताही मिळवता आलेली नाही. चीनसारखा देश भारताच्या आजवरच्या ऑलिम्पिक पदकांपेक्षा जास्त सुवर्णपदके एकाच ऑलिम्पिकमध्ये प्राप्त करतोय. अमेरिकेच्या जलतरणपटू मायकल फ्लेप्सच्या एकट्याच्याच नावे २३ सुवर्ण, ३ रौप्य व २ कांस्यपदके आहेत. त्यामुळे आज आपला देश या विदेशी खेळाडूंच्या तुलनेत कितीतरी मागे असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

ऑलिम्पिकमध्ये आम्ही मागे का याचा विचार केल्यास, देशातील कुचकामी क्रीडाधोरणे आणि सरकारला देशात क्रीडासंस्कृती रुजविण्यात आलेले अपयश अशी कारणे सांगता येतील. ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धांत यश मिळवायचे असेल तर प्रथम केंद्र आणि राज्यसरकारांनी भविष्याचा विचार करून योग्य असे क्रीडाधोरण आखण्याची गरज आहे. त्यासाठी शालेय जीवनापासून त्याची आखणी झाली पाहिजे. चीन, जपान, अमेरिकेसारखे देश क्रीडाविश्‍वावर अधिराज्य गाजवतात याचे कारण, तेथील सुयोग्य अशी क्रीडाधोरणे व क्रीडासंस्कृती, आणि तेथील पालक व समाजाचाही अनेक ऑलिम्पिकपटू घडविण्यासाठी मिळत असलेला सहभाग.

मग भारतात असे का घडत नाही. कारण भारतीय पालकांचा कल केवळ क्रिकेट आणि फुटबॉलसारख्या बक्कळ पैसा मिळवून देणार्‍या खेळात आपल्या मुलांनी नाव कमवावे याकडेच आहे. ही मानसिकता बदलायला हवी. क्रिकेट, फुटबॉल सोडून भविष्यात ऑलिम्पिक खेळासाठी नवीन पिढी आतापासूनच तयार करण्यासाठी प्राधान्य द्यावे लागेल. त्याचबरोबर अन्य खेळांत प्रावीण्य मिळविण्यासाठी सरकारनेही सर्व राज्यांत साधन-सुविधांची उभारणी करतानाच त्यांना उच्च दर्जाचे देश-विदेशातील नामांकित प्रशिक्षक अगदी प्राथमिक स्तरापासूनच उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसे झाल्यास आणि क्रीडासंस्कृती रुजल्यास देशातील पालक आपल्या मुलांचे अन्य खेळांत भविष्य घडविण्यास पुढे येतील.
याव्यतिरिक्त आणखी काही कारणेही आहेत, यामुळे आम्ही पिछाडीवर पडलेलो आहोत. त्यात प्रामुख्याने खेळाडूंना देश-विदेशातील स्पर्धांत सहभागासाठी सरकारकडून न मिळणारा आर्थिक पाठिंबा, क्रीडा संघटनांवर असलेले राजकीय नेत्यांचे वर्चस्व, भ्रष्टाचार, जातीयवाद, खेळापेक्षा केवळ शिक्षण घेऊन नोकरी करण्याकडे असलेला कल, कॉर्पोरेट क्षेत्रांकडून अन्य केळांसाठी हवे तसे न मिळणारे प्राधान्य या गोष्टींचा समावेश आहे.

ऑलिम्पिकमधील भारताची पदके
पॅरिस ः १९००
१) नॉर्मन प्रितचर्ड रौप्यपदक पुरुषांची २०० मी. धावण्याची शर्यत
२) नॉर्मन प्रितचर्ड रौप्यपदक पुरुषांची २०० मी अडथळा शर्यत
ऍम्सटर्डम ः १९२८
३) भारतीय हॉकी संघ सुवर्णपदक पुरुष हॉकी
लॉस एँजेल्स ः १९३२
४) भारतीय हॉकी संघ सुवर्णपदक पुरुष हॉकी
बर्लिन ः १९३६
५) भारतीय हॉकी संघ सुवर्णपदक पुरुष हॉकी
लंडन ः १९४८
६) भारतीय हॉकी संघ सुवर्णपदक पुरुष हॉकी
हेलसिंकी ः १९५२
७) खाशाबा जाधव कांस्य कुस्ती
८) पुरुष हॉकी संघ सुवर्णपदक पुरुष हॉकी
मेलबर्न ः १९५६
९) भारतीय हॉकी संघ सुवर्णपदक पुरुष हॉकी
रोम ः १९६०
१०) भारतीय हॉकी संघ रौप्यपदक पुरुष हॉकी
टोकियो ः १९६४
११) भारतीय हॉकी संघ सुवर्णपदक पुरुष हॉकी
मॅक्सिको ः १९६८
१२) भारतीय हॉकी संघ कांस्यपदक पुरुष हॉकी
म्युनिक ः १९७२
१३) भारतीय हॉकी संघ कांस्यपदक पुरुष हॉकी
मॉस्को ः १९८०
१४) भारतीय हॉकी संघ सुवर्णपदक पुरुष हॉकी
ऍटलांटा ः १९९६
१५) लियांडर पेस कांस्यपदक टेनिक पुरुष एकेरी
सीडनी ः २०००
१६) कर्नाम मल्लेश्‍वरी कांस्यपदक वेटलिफ्टिंग (महिला ५४ कि.ग्रॅ.)
ऍथेन्स ः २००४
१७) राजवर्धनसिंग राठोड रौप्यपदक नेमबाजी (पुरुषांची डबल ट्रॅप)
बिजिंग ः २००८
१८) अभिनव बिंद्रा सुवर्णपदक नेमबाजी (पुरुषांची १०० मी. एअर रायफल)
१९) विजेंदर सिंग कांस्यपदक मुष्टियुद्ध (पुरुषांचा मिडलवेट गट)
२०) सुशील कुमार कांस्यपदक कुस्ती (पुुरुष ६६ कि. वजनी गट)
लंडन ः २०१२
२१) सुशील कुमार रौप्यपदक नेमबाजी (पुरुषांची २५ मी. रॅपिड पिस्तुल)
२२) सायना नेहवाल कांस्यपदक बॅडमिंटन (महिला एकेरी)
२३) मेरी कॉम कांस्यपदक मुष्टियुद्ध (फ्लायवेट)
२४) योगेश्‍वर दत्ता कांस्यपदक कुस्ती (पुरुष ६० किलो वजनी गट)
२५) गगन वारंग कांस्यपदक नेमबाजी (१० मी. एअर रायफल)
रिओ २०१६
२६) पी. व्ही. सिंधू रौप्यपदक बँडमिंटन (महिला एकेरी)
२७) साक्षी मलिक कांस्यपदक कुस्ती (महिलांची ४९ कि.ग्रॅ. वजनी गट)
टोकियो- २०२०
२८) मीराबाई चानू रौप्यपदक वेटलिफ्टिंग (महिला ४९ कि.ग्रॅ.)
२९) लव्हलिना बोर्गोहेन कांस्यपदक मुष्टियुद्ध (महिला वेल्दरवेट)
३०) पी. व्ही. सिंधू कांस्यपदक बॅडमिंटन (महिला एकेरी)
३१) रवीकुमार दहिया रौप्यपदक कुस्ती (पुरुष ५७ कि.ग्रॅ. वजनी गट)
३२) भारतीय हॉकी संघ कांस्यपदक पुरुष हॉकी
३३) बजरंग पूनिया कांस्यपदक कुस्ती (६५ कि.ग्रॅ. वजनी गट)