ऋतुचक्र

0
70
  • प्राजक्ता गावकर

ती नवतरुणी झालेली वसुंधरा ग्रीष्माच्या कडक ज्वाळांनी भाजून निघालेली असताना आपल्या सख्या प्रियतमाला आर्तपणे साद घालून आपल्याला प्रेममयी मधुर रस पाजण्याचे आवाहन करते आणि काय आश्‍चर्य!! तिच्या सादेला ‘ओ’ देत तिचा सखा मेघराजा….
………………………………

सारा आसमंत, सारी सृष्टी मन भरून न्हाऊन निघाली… रंगांच्या धारांत जसे राधाकृष्णाचे मीलन होते तसेच वसुंधरेचे व मेघराजाचे मीलन श्रावणात होते. मेघराजा वसुंधरेला श्रावणसरींनी अखंड भिजवून टाकतो. नवीनच लग्न झालेल्या नवविवाहितेप्रमाणे वसुंधरा हिरवा शालू नेसून लाजेने चूर चूर होऊन जाते. तिच्या अंगाखांद्यावरून त्या प्रेमाचे असंख्य कारंजे उसळून वाहतात.

नवीन बालकाप्रमाणे नवपाती जन्म घेते. त्या आपल्या बाळांना.. नवपातींना ती स्वतःच्या प्राणापलीकडे जपण्याचा प्रयत्न करते. खूप खूश असते ती. तिचे ते लोभस रूप पाहून कोकीळ आपल्या मधुर स्वरांनी तिला साद घालतो.

काहीतरी गुपित वसुंधरेच्या कानात सांगण्याकरिता पोपट आदी विहंग इकडून तिकडे बागडत असतात. वसुंधरेने आपल्या मस्तकावर, गळ्यात, हातात धारण केलेल्या फुलांना भ्रमर काय बरे सांगत असतील हे?? सारखे या फुलांवरून त्या फुलांवर बसून काहीतरी गुपित सांगून जाता जाता त्या सुमनांच्या अधरातील मधू अमृत आपल्या अधरांनी पिऊन जातात हे खास.

श्रावणात बरसणार्‍या त्या घननिळ्या मेघराजाने वसुंधरेला आपल्या प्रेममयी रेशीमधारांनी नखशिखांत भिजवून टाकलेले असते. किती किती सुंदर दिसते माता वसुंधरा! जिकडे पहावे तिकडे हिरवेगार मंडप, तोरण, ठिकठिकाणी फुलांचे गालीचे अंथरलेले, दुरून साजरे दिसणारे डोंगर… किती म्हणून गोडवे गावे!!
खरंच, श्रावणात सर्वांच्याच मनामनांत आनंदाचे कारंजे फुटतात. नवविवाहित स्त्रियांकरिता श्रावण मास म्हणजे नुसती पर्वणीच असते. त्यांना श्रावणात माहेरी जायला मिळते. नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन वगैरे सण उरकून माहेरच्या मायेने तृप्त झालेल्या मनाने त्या सासरी येतात. त्यावेळी एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू असते. माहेरून निघताना एका डोळ्यात आसू का… तर आता परत कधी माहेरची माया मिळेल या विचाराने आणि दुसर्‍या डोळ्यात हसू का… तर पतीमीलनाची ओढ तिला स्वस्थ बसू देत नाही. तृप्त झालेल्या मनाने ती सासरी येते आणि नव्या उमेदीने पुन्हा संसाराचा रथ हाकायला तयार होते.

मनाचे कारंजे आनंदाने थुईथुई नाचत असताना त्यात भर पडते ती श्रीगणेशाच्या आगमनाची. हरप्रकारे समजूत घालत माता पार्वती गणेशाला म्हणते, ‘‘बाळा गणेशा, इथे सर्व प्रकारची सुखं असताना तुला पृथ्वीची एवढी ओढ का बरे वाटते? रागावलास तर नाही ना आमच्यावर? तुझे पिताश्री तर काही बोलले नाही ना तुला की तुला त्या श्रावणाने मोहरलेल्या वसुंधरेचे वेड लागले?.. सांग ना बाळ!
मला तर तुझ्याशिवाय जराही करमत नाही. तुझ्याशिवाय इथे सारं ओस पडेल. केलेले लाडू, मोदक तसेच राहून जातील.’’ हे ऐकून गणेशाने विलक्षण प्रेमाने आपल्या हातांनी पार्वती मातेभोवती विळखा घातला.. तिच्या कुशीत शिरत लाडाने म्हणाला, ‘‘माते, मला तरी तुला सोडून कुठे करमतंय? पण पृथ्वीवर जावे लागणार हे खरेच. पृथ्वीवरचे लोक माझी अत्यंत आदराने वाट पाहतात. हे तर तुलाही माहीत आहे ना? पिताश्री मला कधीच वाईट बोलत नाही. आणि हे मात्र खरे की श्रावणाने मोहरलेल्या वसुंधरेचे वेड सर्वांनाच लागलेले असते. मग मी त्याला अपवाद कसा असणार? सांग ना माते, मी येणार म्हणून ती वसुंधरा नटते थटते. माझ्या स्वागतासाठी सर्व पत्रींची व्यवस्था करते. मग मी न जाऊन कसं चालेल?
फार नाही… कुणाकडे दीड दिवस, कुणाकडे पाच, सात, नऊ, अकरा आणि राहिलोच तर एकवीस दिवस राहावे लागणार. तू माझ्या जेवणाची अजिबात काळजी करू नकोस. तसे पाहिले तर जाताना बरे आहे की मूषकराजाला काहीच त्रास नाही पण येताना मात्र रथच घ्यायला लावतो मूषकराजाला’’. त्याचे बोलणे ऐकून पार्वती मातेने चमकून विचारले, ‘‘कारे बाळा रथ का मागवणार?’’ गणेश म्हणाला, ‘‘माते काय सांगू या भक्तांचा महिमा! करंज्या, लाडू, मोदक, पातोळ्या.. काय काय खायला घालतात म्हणून सांगू! एकवीस दिवसापर्यंत मग या पोटाचा नगारा होणार नाही तर काय? मी जर मूषकराजाच्या पाठीवर बसलो तर त्याची अगदी दयनीय अवस्था होईल. म्हणून रथ मागवावा म्हणतो!’’
‘‘पण माते, तुझा चेहरा असा खिन्न का झाला? माते, मी पृथ्वीवर गेल्यानंतर तू आणि पिताश्री एक दिवसासाठी माझ्याबरोबर राहायला या आणि पहा भक्तांचा लळा.’’
मग काय श्रावण संपता संपता श्रीगणेशाचे थाटात आगमन होते. ठरलेले दिवस मोठ्या मानाने राहून गणेश परत स्वगृही जातात ते पुढील वर्षी लवकर येण्याच्या बोलीवर.

नंतर येते ते देवीचे नवरात्र. नऊ तर्‍हेचा श्रुंगार करून प्रत्येक स्त्री ही नवदुर्गा नवचंडीका समजली जाते. दुष्टांना योग्य शासन करून सर्व जगाला अभय देणार्‍या नवदुर्गा देवीचे नवरात्र संपता संपता दहावा दिवस विजया दशमीचा म्हणजे दसरा! त्या दिवशी कुबेराने आपट्याच्या झाडावर स्वर्णवर्षाव केला. म्हणून दसर्‍याच्या दिवशी या सुंदर वसुंधरेवर उगवणारे सोन्याचे झाड म्हणजे आपट्याचे झाड. या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या झाडाच्या पानांची लूट लहान-थोर मुक्तपणे करतात. श्रावणात हिरवा शालू नेसून नटलेली वसुंधरा, शिशिराची चाहूल लागताच थंडीने कुडकुडत पानगळी टाकू लागते. पक्व झालेले आपले एक एक वस्त्र टाकू लागते. जीर्ण झालेली पाने, वस्त्रे गळून त्या जागी नवीन पालवी उमलू लागते. वसुंधरा आता वयस्कर रूप धारण करू लागते.

हळूहळू वसुंधरेच्या बालरुपाचा विकास होऊन त्याचे वसंत ऋतूत तारुण्यात पदार्पण होते. काही काळाने ती नवतरुणी झालेली वसुंधरा ग्रीष्माच्या कडक ज्वाळांनी भाजून निघालेली असताना आपल्या सख्या प्रियतमाला आर्तपणे साद घालून आपल्याला प्रेममयी मधुर रस पाजण्याचे आवाहन करते आणि काय आश्‍चर्य!! तिच्या सादेला ‘ओ’ देत तिचा सखा मेघराजा प्रचंड वाद्यवृंदांच्या आवाजात, मुसळधार सरींच्या पाठीवर स्वार होऊन सोसाट्याच्या पवन मित्राबरोबर, आपल्यासाठी तहानलेल्या आपल्या प्रियतमेला स्वतःच्या मिठीत घेण्यासाठी आपले शेकडो बाहू फैलावत जिवाच्या आकांताने येतो आणि मग आपल्या प्रेमरसाने आपल्या प्रियतमेला नखशिखांत भिजवून काढतो. मग पुन्हा ती वसुंधरा शालू नेसून नवरी होते आणि एक प्रकारचे न संपणारे ऋतुचक्र सुरू होते.