आर्थिक स्थैर्यासाठी सहा सूत्रे

0
300
  • शशांक मो. गुळगुळे

कोविड-१९ चे कधी निर्मूलन होणार हे आजतरी खात्रीने सांगू शकणारी एकही व्यक्ती जगात नाही. जगात यापुढे वरचेवर साथी येत राहणार अशाही बातम्या माध्यमांतून वाचनात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर स्वतःचे व कुटुंबाचे आर्थिक स्थैर्य टिकून राहण्यासाठी खाली नमूद केलेली सहा सूत्रे अमलात आणायला हवीत.

कोविड-१९ मुळे जीवन अनिश्‍चित झालेले आहे. कोविड-१९ चे कधी निर्मूलन होणार हे आजतरी खात्रीने सांगू शकणारी एकही व्यक्ती जगात नाही. जगात यापुढे वरचेवर साथी येत राहणार अशाही बातम्या माध्यमांतून वाचनात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर स्वतःचे व कुटुंबाचे आर्थिक स्थैर्य टिकून राहण्यासाठी खाली नमूद केलेली सहा सूत्रे अमलात आणायला हवीत. कुटुंबा-कुटुंबाप्रमाणे, व्यक्ती-व्यक्तीनुसार आर्थिक नियोजन वेगवेगळे असू शकते, पण ही सहा सूत्रे सर्वांसाठी समान आहेत.

पहिले सूत्र ः कोणीही त्याला किंवा तिला मिळणार्‍या उत्पन्नातील किती रक्कम खर्च करू शकतो वा किती रक्कम वाचवू शकतो/बचत करू शकतो. वयोमानाप्रमाणे, जबाबदार्‍यांप्रमाणे याचे प्रमाण वेगवेगळे असणार. जो कोणी एकूण मिळणार्‍या उत्पन्नापैकी ५० टक्के रक्कम खर्च करून, ५० टक्के रक्कम वाचवीत असेल तर हे प्रमाण सर्वोत्कृष्ट मानता येईल. इतर वयोमानांपेक्षा तारुण्यात जास्त खर्च करण्याची प्रवृत्ती असते. पण कमीत कमी खर्च करून, जास्तीत जास्त बचत करायला प्राधान्य द्यायला हवे.

दुसरे सूत्र ः कोणीही स्वतःला विचारावे, दर महिन्याला मी जास्तीत जास्त किती बचत करू शकतो? विवाह होण्यापूर्वी बर्‍याच जणांना जास्त बचत करता येते; पण विवाहानंतर कुटुंबात वाढ झाल्यामुळे जास्त बचत होऊ शकत नाही. तुमच्या हातात येणार्‍या पगाराच्या किंवा अन्य मार्गे उत्पन्नाच्या किमान २० टक्के रक्कम बचतीत गुंतवली गेली पाहिजे असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे मत आहे. याशिवाय भविष्य निर्वाह निधीत दर महिन्याला नोकरदारांची अतिरिक्त गुंतवणूक होतच असते.

तिसरे सूत्र ः कर्जाच्या हप्त्यानंतर किती रक्कम खर्च करावी? बर्‍याच लोकांना घर घेण्यासाठी, घराच्या दुरुस्ती किंवा नूतनीकरणासाठी, घर बांधण्यासाठी, लग्नासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, आजारपणासाठी कर्ज घ्यावेच लागते. तुमच्या हातात येणार्‍या उत्पन्नाच्या घरकर्जाचा किंवा वाहनकर्जाचा किंवा अन्य कुठल्याही प्रकारच्या कर्जाचा हप्ता (एक कर्ज असो की अनेक) ३० टक्क्यांहून अधिक असता कामा नये असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. कर्जाच्या विळख्यात पडायचे नसेल तर कर्जाच्या हप्त्यांची कमाल रक्कम पाळलीच पाहिजे.

चौथे सूत्र ः कोणाहीकडे आपत्कालीन निधी किती असावा? कोणाचाही जो मासिक खर्च असतो त्याच्या सहा पट ते चौवीस पट इतकी रक्कम आपत्कालीन निधी म्हणून उपलब्ध हवी. तरुण अविवाहित व्यक्तीने सहा महिन्यांच्या खर्चाची रक्कम आपत्कालीन निधी म्हणून ठेवावी. ज्याच्यावर कुटुंबातील सदस्य अवलंबून आहेत व एकटाच कमावणारा आहे अशांनी १२ महिन्यांच्या खर्चाची रक्कम आपत्कालीन निधी म्हणून ठेवावी. ५० हून अधिक वय आहे आणि सेवानिवृत्तीनंतर फायदे मिळणार आहेत अशांनी २४ महिन्यांच्या खर्चाची रक्कम आपत्कालीन निधी म्हणून ठेवावी.

पाचवे सूत्रः जीवन विमा व आरोग्य विमा किती रकमेचा उतरवावा? जीवन विमा हा वार्षिक उत्पन्नाच्या दहा पट रकमेचा उतरवावा असे जाणकारांचे मत आहे. जीवन विमा शक्यतो वय कमी असताना उतरवावा, म्हणजे ‘प्रिमियम’ची रक्कम कमी भरावी लागते. जीवन विम्यात जास्त गुंतवणूक करू नये. कारण जीवन विम्यात फारच कमी परतावा मिळतो. पण कुटुंबाच्या आर्थिक हितासाठी जीवन विमा उतरवावाच! आरोग्य विमा तर अगोदरपासूनच गरजेचा होता. आता तर तो प्रचंड गरजेचा झालेला आहे. याचे नूतनीकरण दरवर्षी करावे लागते. जीवन विमा आणि आरोग्य विमा यांच्या भरलेल्या ‘प्रिमियम’वर प्राप्तिकरात सवलत मिळते.

सहावे सूत्र ः सेवानिवृत्तीनंतर जीवनासाठी काय तरतूद करावी? हा सर्वात कठीण प्रश्‍न आहे. कारण कोणालाही आपण किती जगणार हे कळत नाही. विमा कंपन्यांच्या पेन्शन योजना आहेत. तसेच नॅशनल पेन्शन सिस्टिम ही एक योजना आहे. अटल पेन्सन योजना आहे. यांपैकी जी योग्य वाटेल अशा पेन्शन योजनेत गुंतवणूक करावी. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर पेन्शनमार्गे उत्पन्न चालू राहील. उतारवयात स्वतःच्या हातात स्वतःचा पैसा हवा तरच अभिमानाने जगता येते. सेवानिवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधीची रक्कम हातात पडते. ती योग्य ठिकाणी गुंतविली तर या रकमेवरील व्याजही मिळते. सध्या भारतात ठेवींवरील व्याजाचे दर घसरत चालले आहेत. ग्रॅच्युईटीची रक्कमही मिळते. सध्याच्या कायद्याप्रमाणे ग्रॅच्युईटीची रक्कम २० लाख रुपयांपर्यंत मिळू शकते. सरकारी नोकर, निम्नसरकारी आस्थापनांतील नोकर, सार्वजनिक उद्योगातील बँकांतील, विमा कंपन्यांतील व अन्य कंपन्यांतील नोकर व मोठी ‘कॉर्पोरेट्‌स’ येथील कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीनंतरचे चांगले फायदे मिळतात. पण छोट्या-छोट्या खाजगी कंपन्यांत काम करणार्‍यांना सेवानिवृत्तीनंतर फारच कमी आर्थिक निधी मिळतो.

जे हाताच्या पोटावर काम करणारे कारागीर आहेत- सुतार, प्लंबर, रंगारी, रिक्षा व टॅक्सीचालक- त्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक निधी त्यांचे हातपाय चालायचे बंद झाल्यावर मिळत नाही. अशांनी सध्याच्या केंद्र सरकारच्या कालावधीत सुरू करण्यात आलेल्या अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करावी. तसेच सध्याच्याच केंद्र सरकारच्या काळात अमलात आलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना या अल्प प्रिमियम रकमेच्या पॉलिसीज उतरवाव्यात आणि असंघटित क्षेत्रातील मजुरांनी आपले व आपल्या पश्‍चात आपल्या कुटुंबाचे आयुष्य काही प्रमाणात आर्थिक बाबतीत सुसह्य करावे.