आठ वर्षांत केवळ ७ लाख २२ हजार जणांना सरकारी नोकरी

0
15

>> मोदी सरकारची लोकसभेत माहिती
>> २२.०५ कोटी बेरोजगारांनी केले अर्ज
>> सरकारी नोकरीसाठी धडपड कायम

दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे मोदी सरकारचे आश्‍वासन कधीच हवेत विरले असून, बेरोजगार तरुण-तरुणींच्या पदरी निराशाच आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोदी सरकारच्या गेल्या आठ वर्षांत बेरोजगारांची धडपड पाहायला मिळाली; मात्र अवघ्या १ टक्क्यापेक्षा कमी अर्जदारांची स्वप्नपूर्ती झाल्याचे समोर आले आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळातील २०१४-१५ ते २०२१-२२ या कालावधीत २२.०५ कोटी अर्ज सरकारी नोकरीसाठी प्राप्त झाले; परंतु त्यातील अवघ्या ७.२२ लाख म्हणजेच ०.३३ टक्के अर्जदारांना केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये नोकर्‍या मिळाल्या आहेत. केंद्र सरकारने नुकतीच याबाबत लोकसभेत ही माहिती दिली.

पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत मोदी सरकारच्या काळात किती जणांना सरकारी नोकर्‍या मिळाल्या, याची माहिती दिली. नोकरीसाठी २०१९-२० या वर्षी सर्वात जास्त म्हणजे १.४७ लाख अर्जदारांची सरकारी नोकरीसाठी शिफारस करण्यात आली. कोरोनाचा उद्रेक व्हायच्या आधीचे हे वर्ष होते. आठ वर्षांमधील एकूण भरतीपैकी म्हणजे ७.२२ लाखांपैकी सुमारे २० टक्के भरती याच वर्षी झाली. योगायोग म्हणजे त्याच वर्षी निवडणुकाही होत्या.

सर्वसाधारण कल असा दिसतो की, २०१९-२० चा अपवाद वगळता २०१४-१५ पासून सरकारी नोकर्‍यांमध्ये भरतीचे प्रमाण सातत्याने घटल्याचे दिसून आले. २०१५-१६ मध्ये १.११ लाख, २०१६-१७ मध्ये १.०१ लाख, २०१७-१८ मध्ये ७६,१४७, २०१८-१९ मध्ये ३८,१०० व २०२१-२२ मध्ये ३८,८५० जणांना सरकारी नोकरीत सामावून घेण्यात आले.

जितेंद्र सिंह यांनी संसदेत सादर केलेली माहिती दर्शवते की, २०१४ पासून तब्बल २२.०५ कोटी लोकांनी सरकारी नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यातील सर्वात जास्त म्हणजे ५.०९ कोटी अर्ज २०१८-१९ या वर्षी सादर करण्यात आले, तर सगळ्यात कमी म्हणजे १.८० कोटी अर्ज २०२०-२१ या वर्षी प्राप्त झाले. या संदर्भातील माहितीचा अभ्यास केला असता असे दिसून आले की, दरवर्षी सरासरी २.७५ कोटी अर्ज प्राप्त झाले आणि दरवर्षी सरासरी ९०,२८८ उमेदवारांना नोकरी दिली गेली. आठ वर्षांतील नोकरी मिळण्याचे प्रमाण अर्जांच्या तुलनेत ०.०७ टक्के ते ०.८० टक्के आहे.

आता १८ महिन्यांत १० लाख रोजगारांचे आश्‍वासन
विशेष म्हणजे गेल्या आठ वर्षांमध्ये अवघ्या ७.२२ लाख भारतीयांना सरकारी नोकरीत भरती केलेले असताना मागील महिन्यात १४ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या १८ महिन्यांमध्ये १० लाख तरुण-तरुणींना ‘मिशन मोड’ मध्ये रोजगार दिला जाईल, अशी घोषणा केली. सर्व खात्यांमधील व मंत्रालयातील मानवी बळाची पाहणी केल्यानंतर पंतप्रधानांनी ही घोषणा केली होती.

किती जणांना मिळाल्या नोकर्‍या?
वर्ष नोकर्‍या
२०१५-१६ : १.११ लाख
२०१६-१७ : १.०१ लाख
२०१७-१८ : ७६ हजार १४७
२०१८-१९ : ३८ हजार १००
२०१९-२० : १.४७ लाख
२०२१-२२ : ३८ हजार ८५०