स्मृतीतील ‘मुदांस’

0
23
  • शरत्चंद्र देशप्रभू

‘मुदांस’ म्हणजे बदल. रटाळ जीवनाला बदल हा हवाच. ऐदी जीवनशैली असणाऱ्यांना तर या बदलाचे महत्त्व फारच! एप्रिल-मे महिन्यात समुद्रस्नानाच्या निमित्ताने हा बदल म्हणजे ‘खारे उदक’ नहाण्याचा कार्यक्रम नियोजित केला जात असे. मोरजी, मांद्रे, हरमल या समुद्रकिनाऱ्यांवर पंधरा ते वीस दिवसांच्या मुक्कामाचा बेत आखला जात असे. आता सारेच गतस्मृतीत जमा झालेले आहे…

गोवा मुक्तिलढा तीव्र झाल्यावर पोर्तुगीज शासनाने 1954 साली गोव्यात येण्या-जाण्यावर निर्बंध लादले. यामुळे पासपोर्ट अन्‌‍ इतर तरतुदींचा कायदेशीर अडसर पार करून गोव्यात यावे लागत असे. गोवा मुक्तीपर्यंत म्हणजे 19 डिसेंबर 1961 पर्यंत हे निर्बंध लागू होते. परंतु या निर्बंधांमुळेच मुंबईकर नातेवाइकांचे निवडक कार्यासाठी येणे व्हायचे. यास्तव या छोट्या मुक्कामाचा दोन्हीकडील मंडळी मनमुराद आनंद लुटत असत. आरोब्याच्या पुरातन भव्य दिमाखदार वाड्यात प्रसंगी तीस ते चाळीस मुले जमत. सरंजामशाहीचा काळ असल्यामुळे नोकरचाकरांची, कुळांची गर्दी. किंबहुना कुटुंबसदस्यांपेक्षा कधीकधी दासदासींची संख्या जास्त असायची.


आरोबा म्हणजे त्याकाळी मागासलेला गाव. दळणवळणाची साधने नव्हती. वाडा अन्‌‍ गाव क्षेत्रफळाने छोटा. तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला. यामुळे आरोब्याला येणारा एकमेव मार्ग म्हणजे धारगळ-शिरगळमधून यायचे किंवा दोन्ही बाजूला वाहत असलेल्या नद्यांतून होड्यांद्वारे. मुंबईकरांना याचे फारच आकर्षण. दंगामस्तीत मुक्कामाचे दिवस कसे जात हे कळतच नसे. वाड्याला दोन्ही बाजूला उंच बुरुज. त्याकाळची संरक्षणानिमित्त टेहळणी व्यवस्था. शिवाय जाडजूड भिंतीना बंदुकीच्या नळ्या रोखण्यासाठी लांब-अरुंद-गोलाकार भोके. जणू निर्मित बिळे. याव्यतिरिक्त कुलूपबंद शस्त्रभांडार जे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला उघडले जात असे. सोने लुटणे म्हणजे आपट्याची पाने खुडण्यासाठी लाल वेष परिधान केलेल्या शस्त्रधारी सेवेकऱ्यांची पालखीसह भव्य मिरवणूक. पालखीत घराण्यातील एक छोटा इनामदार विराजमान. सारेच सांकेतिक स्वरूपाचे. पोर्तुगीज शासनाने आखून दिलेल्या नियमप्रणालीत. साऱ्या मुलांना या वाड्यातील काही सण अनुभवता येत. पालखीत बसण्याचा आमचा बालहट्ट पुरवला जात नसे. कारण तो हक्क आम्हाला नव्हताच हे सज्ञान झाल्यावर कळले.
छोट्या मुक्कामात मुंबईच्या नातेवाइकांची खास बडदास्त ठेवली जात असे. गरवून आणलेल्या ताज्या मुडदुशा, मानशीची मोठमोठी कोळंबी (वाघयो) अन्‌‍ मळ्यातील ताजा भाजीपाला. गोव्यातील गाई-म्हशीचे ताजे दूध, मूबलक प्रमाणात ताक, लोणी अन्‌‍ ‘घरावे’ तूप. हे वैभव पाहून मुंबईकरांचे डोळे विस्फारायचे.


त्यातच ‘मुदांस’च्या सोनेरी आठवणी. ‘मुदांस’ म्हणजे बदल. रटाळ जीवनाला बदल हा हवाच. ऐदी जीवनशैली असणाऱ्यांना तर या बदलाचे महत्त्व फारच! एप्रिल-मे महिन्यात समुद्रस्नानाच्या निमित्ताने हा बदल म्हणजे ‘खारे उदक’ नहाण्याचा कार्यक्रम नियोजित केला जात असे. मोरजी, मांद्रे, हरमल या समुद्रकिनाऱ्यांवर पंधरा ते वीस दिवसांच्या मुक्कामाचा बेत आखला जात असे. यासाठी काही जमीनदारांनी आपल्या हवापालटासाठी छोट्या वास्तू पण उभारल्या होत्या. ज्यांना ही सोय उपलब्ध नव्हती त्यांना तात्पुरत्या बिऱ्हाडांची किंवा ओळखीच्या गृहस्थांची वापरात नसलेली किनाऱ्यानजीकची घरे. काही स्थानिक कॅथलिक कुटुंबे पण आपली रिक्त घरे समुद्रस्नानासाठी आलेल्या लोकांना माफक भाड्यावर किंवा मोबदला न घेता पण देत. बहुतांश घरे ओसाड, झाडलोट न झालेली, पडझड झालेली- जणू भूतबंगलेच. आम्ही पण कैक वेळा दारे, खिडक्या नसलेल्या घरात बिऱ्हाड केल्याचे स्मरते. रंगसफेदी न केलेली, ओबडधोबड जमिनीची ही घरे म्हणजे आम्हाला त्याकाळी महालच वाटायचे. याचे एकमेव कारण म्हणजे समुद्राचे अनावर आकर्षण. समुद्रस्नानाची पण पूर्वतयारी करावी लागे. पापड, सांडगे, विविध प्रकारच्या बिया, मसाल्याच्या वस्तू, शिवाय अन्य ‘पुरुमेंत’ म्हणजे अळसांदे, कुळीथ, चवळी, विविध प्रकारच्या डाळी अन्‌‍ अन्य आता हद्दपार झालेले कडधान्याचे प्रकार. समुद्रस्नानाचा मुक्काम निश्चित झाल्यावर मुंबईकर नातेवाइकांचे आगमन सुरू होई. मग गडी-कामवाल्या चटया, अंथरुणे, पांघरुणे, उदराग्नीची काळजी घेणारा माल, खाद्यपदार्थ असा सारा लवाजमा त्यावेळच्या ‘कामिजांव’ने मोरजीला प्रस्थान ठेवायचा. भल्या मोठ्या ट्रंकच्या पेटीत भरून नेलेला चिवडा पण मला आठवतो. खाणारे अफाट अन्‌‍ मुक्कामाला असलेल्या सदस्यांची संख्या पण अफाट. कामिजांवचे एक बरे. किमान वीस ते पंचवीस माणसे तो आपल्या उदरात सामावणार. शिवाय खास म्हणजे स्पेशल भाड्याने आणलेला असल्यामुळे ‘किलिंडर’चे काही चालणार नाही. स्वतंत्र भाड्याचा असल्यामुळे हवे तेवढे आप्तेष्ट कोंबण्याचा पूर्ण अधिकार. या खटाटोपात ड्रायव्हरला माणसे अनिर्बंध कोंबण्यामुळे अफलातून अंगविक्षेप करत, कसरत करत गाडी चालवावी लागे. कामिज्यांव धीम्या गतीने, अरुंद खाचखळग्यांतून, तांबड्या रस्त्यावरच्या अडथळ्यांची शर्यत पार करत कसाबसा मोरजीला पोचत असे. तथाकथित बसस्टँडपासून बिऱ्हाडी जायला रस्ताच नसे. त्यामुळे पुढचा प्रवास शाकारलेल्या बैलगाडीतून. उरलेले सामान गड्यांच्या डोक्यावर. पुढे बैलगाड्या अन्‌‍ मागे पुरुष मंडळी अशी रणरणत्या उन्हातून मिरवणूक चालत असे. पंधरा-वीस दिवसांच्या मुक्कामाचा अलिखित, अनियमित परंतु ठरलेला कार्यक्रम. सकाळी म्हणजे चांगलेच उजाडल्यावर ‘मशेरी’ किंवा ‘माकडछाप’ पावडरने दात खसखसून घासणे अन्‌‍ ‘अशिष्टपणे’ तोंड खळखळून धुणे. किनारी भागातले पाणी जड अन्‌‍ गुळमट. या पाण्याने धुतलेला चेहरा, अंग चिकटच वाटायचे. बिऱ्हाड जरी समुद्रकिनाऱ्यावरून फर्लांगाच्या अंतरावर असले तरी समुद्र दिसायचा नाही. मध्ये उंच वाळूच्या टेकड्या म्हणजे टेंबं. यांच्यावर चढून मुले खाली घरंगळत जायची. प्राधान्य स्त्रियांना समुद्रस्नान करायचे. कारण नंतर स्वयंपाकाची तयारी करावी लागे. दहा-अकरा वाजेपर्यंत त्यांचे स्नान आटोपल्यावर- सूर्य चांगल्या डोक्यावर आल्यावर- पुरुष मंडळीचे स्नान गळाभर पाण्यात डुंबून. असे किमान पाच दिवस स्नान व्हायचे. काही लोक नऊ दिवस पण स्नान करायचे. या कालावधीत अंगाला गोड्या पाण्याचा स्पर्श पण होऊ द्यायचा नाही. कारण खाऱ्या पाण्याच्या परिणामांची प्रखरता कशी टिकेल? काही दुरून आलेली कुटुंबे- बहुधा कॅथलिक- पाच ‘न्हाणां’ एका दिवसात आटोपत. सकाळी सात ते रात्री सात या अंतरा-अंतराने ही पाच स्नाने ते कशीबशी आटोपती घेत.


मोरजी, मांद्रे, हरमल परिसरात कमीत कमी पन्नास बिऱ्हाडे लागत. संध्याकाळी किनारा फुलून गेलेला असे. सारीच मंडळी खारे पाणी न्हाऊन अंगाला आलेला चिकटपणा कमी करण्यासाठी पुनश्च खारा वारा अंगावर झेलण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर. या पंधरा दिवसांत मुलांच्या आनंदाला पारावार नसे. परंतु त्यांना समुद्रस्नान करण्याची एकच संधी मिळत असे. तेही गुडघाभर पाण्यात, उथळ पाण्यात जेथे लाटांचा डौल कमी झालेला असे! या पंधरा दिवसांत खवैय्यांची चंगळ. सकाळी पोहे, शिरा, पोळ्यांची भरपेट न्याहारी. दुपारी विविध प्रकारच्या ताज्या फडफडीत माशांची मेजवानी, तर रात्री कोळंबी, मोरी किंवा समुद्री खडपी कुर्ल्यांचे ‘तोणाक.’ पेज, ‘पचरशी’ भाकऱ्या किंवा वडे. मध्ये चघळायला चिंचोके, विविध तऱ्हेच्या बिया होत्याच. शिवाय आढीतले आंबे अन्‌‍ काजूच्या बोंडाचे तिखटमीठ लावलेले ‘करमट.’ सर्वसाधारणपणे गोव्यात साऱ्या किनाऱ्यांवर हे चित्र दिसत असे. थोडाफार फरक असे. परंतु आता हे ‘दायज’ अस्तंगत होत आहे. कारणे कोणतीही असो. प्रदूषण किंवा किनाऱ्यांचे व्यापारीकरण. परंतु ‘मुदांस’ला एक सांस्कृतिक, सामाजिक पार्श्वभूमी होती. तन आणि मन शुद्ध करण्याची नैसर्गिक प्रक्रिया साध्य होत असे.
पंधरा दिवसांच्या या स्नेहसंमेलनात कमावलेली ऊर्जा वर्षभराच्या खडतर जीवनातल्या समस्यांना भिडण्याची प्रेरणा अन्‌‍ शक्ती देत असे. आम्ही मोरजी, मांद्रे तसेच ताळगाव-पणजीला आल्यावर करंझाळे, मिरामारला समुद्रस्नान केले आहे. तसेच वडिलांची केप्याला बदली असताना बेतुल येथे ‘मुदांस’ केल्याचे आठवते. इथल्या ‘बापसरो’ या वाड्यावर केलेला मुक्काम सत्तर वर्षे होत आली तरी स्मरणकोशात रुतून आहे. बाप्पा नामक मासेविक्रेत्याच्या झोपडीवजा घरात आमचा मुक्काम होता. या झोपडीच्या मागे बेतुलची खाडी की साळ नदी होती, नक्की आठवत नाही. ही खाडी होडीने ओलांडून बेतुलच्या समुद्रकिनाऱ्यावर जायचे. भरती आल्यावर ही खाडी काठोकाठ भरायची. पाणी उफाळून येत असे अन्‌‍ झोपडीच्या मागे असलेल्या दगडी धडेला धडका देत असे.


आज थोड्याफार प्रमाणात समुद्रस्नानाची प्रथा चालू आहे. बागा, कोलवा, मोरजी, मांद्रे, पाळोळे, शिरदोण या ठिकाणी काही वयस्क मंडळी स्नान करण्यासाठी येतात. परंतु मुक्काम करण्याची परंपरा अस्तंगत झाली आहे. वाहनांनी लोक येणार. सकाळच्या किंवा दुपारच्या पर्वात स्नान आटोपल्यावर आपापल्या घरी परतणार.
आजच्या काळात समुद्रकिनाऱ्यांचे महत्त्व शतपटीने वाढलेले आहे. जगभरातून पर्यटकांचा ओघ गोव्याच्या दिशेने झेपावताना दिसत आहे. किनारे मोसमात गजबजून जातात. पावसाळ्यात पण पर्यटकांची तुरळक उपस्थिती दिसून येत आहे. परंतु समुद्रकिनाऱ्यांची आता रयाच गेल्याचे दिसून येते. वाळूची टेंबं भूईसपाट झाली आहेत. हॉटेल व्यवसाय फोफावला आहे. रात्री पण पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. बेकायदा बांधकामे, अनैतिक व्यवहार, अमली पदार्थांचा प्रसार अन्‌‍ गलिच्छपणामुळे गोव्यातील समुद्रकिनारे काळवंडून गेले आहेत. मोरजी, मांद्य्राची शुद्ध वाळू तसेच कोलवाची शुभ्र रव्यासारखी वाळू आता कुठे आहे? समुद्रकिनाऱ्यांवरील निवांत एकांताची जागा कर्णकर्कश संगीताने घेतलेली आहे. शॅक, हातगाडे अन्‌‍ इतर विक्रेत्यांनी किनाऱ्यावरील जागा व्यापून टाकल्याचे चित्र नजरेस पडते. समुद्रकिनारी भागातील जमिनीला सोन्यापेक्षा जास्त भाव आलेला आहे. आज समुद्रकिनाऱ्यांमुळे गोव्यात पर्यटक येताहेत, धंद्याला बरकत आलेली आहे, महसुलात भर पडते आहे, रोजगार वाढत आहे. पण दुसऱ्या बाजूने स्थलांतरितांचे लोंढे येत आहेत, गुन्हेगारीचे स्वरूप अन्‌‍ अवकाश बदलत आहे, चंगळवाद फोफावतो आहे अन्‌‍ मुख्य म्हणजे जे खारे पाणी औषधीयुक्त समजले जात असे तेच प्रदूषित होत चालले आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर सर्फिंग, क्रुझ अन्‌‍ अन्य विविध प्रकारचे पर्यटकांना आकर्षित करण्याचे प्रयोग केले जात आहेत. मांडवीच्या पात्रात कॅसिनो तरंगत आहेत. या साऱ्यातून किती घाण समुद्रात झिरपते किंवा सांडली जाते त्याचा अंदाज नाही किंवा बंदोबस्त केला जात नाही. यामुळे पाण्यातील जीवसृष्टी पण किती प्रमाणात बाधित होत असेल याचा ठोकताळा मांडला जात नाही. मागे कुठल्या तरी शासकीय संस्थेने दिलेल्या अहवालात अधोरेखित केले होते की ‘इ कोलय’ जंतूची चारशे प्रतिशत वाढ मिरामार-कलंगुट परिसरात झालेली आहे. यामुळे मत्स्यजीवन पण प्रदूषित झालेले आहे. हे प्रदूषित मासे, प्रदूषित पाण्यातील स्नान अन्‌‍ किनाऱ्यावर साचलेले घाणीचे साम्राज्य पाहून कुठला निज गोंयकार समुद्रस्नान करण्याचे धाडस करेल? यामुळे समुद्रस्नान फक्त पर्यटकांसाठीच, ते पण अकल्पित पातळीवर नववर्षाच्या पूर्वसंध्येला. बुडालेल्याला वाचवायला जीवरक्षक तैनात असणारच!