महाराष्ट्र सरकार घेणार केंद्राचे मत
राज्यातील स्त्री-भू्रण हत्येचा विषय गंभीर बनत चालला असल्याने महाराष्ट्र सरकार या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्याच्या विचारात असून त्याकरिता केंद्राकडून मत घेतलेे जाणार आहे.
स्त्री-भू्रण असल्यावरून सक्तीने गर्भपात केल्यास अशी प्रकरणे भा.दं.सं.च्या ३२० कलमाखाली गुन्हा म्हणून नोंद करण्याचा एक प्रस्ताव असून त्याबाबत लवकरच केंद्र सरकारकडून मत घेतले जाईल, असे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी विधानसभेत सांगितले. याविषयावरील एक लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निदर्शनास आणले की सध्या सक्तीच्या गर्भपाताकरिता प्रभावी शिक्षा नसल्याने भीती राहिलेली नाही. स्त्री-भ्रूण हत्या झाल्यास परिवारजनांना अटक का केली जात नाही, असाही प्रश्न त्यांनी केला.
त्यावर मंत्र्यांनी सांगितले की, गर्भवती स्त्री स्वत:च्या मर्जीने लिंगनिर्धारण चाचणीसाठी गेल्याचे सिद्ध झाल्याशिवाय कारवाई करता येत नाही मात्र तिला परिवारजनांनी तेथे नेले असल्यास त्यांच्यावर कारवाई होते.